Saturday, November 17, 2012

हिंदुहृदयसम्राट



आज सकाळी झोपेतून उठलो तर बातमी कळली. लॅपटॉप उघडत असताना नकळत दादांना (माझे वडिल) फोन लावला गेला. बाळासाहेब गेले हे त्यांनी सांगितलं आणि त्यानंतरचे काही सेकंद दोघेही शांत राहिलो. अतिशय वाईट बातमी होती. वास्तविक पाहता मी आणि माझे वडिल कोणत्याच पक्षाचे समर्थक नाही. पण बाळासाहेबांबद्दल त्यांना आणि त्यांच्यामुळे मला प्रचंड आदर होता आणि राहील. दादांशी बोलताना मग नकळत अनेक गोष्टी समोर आल्या.
मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार होतोय हे साहेबांच्या लक्षात आलं. ते थांबवण्यासाठी एक लढाऊ संघटना उभी करायची ह्या हेतूने शिवसेना स्थापन झाली. शिवसेना हे नाव साहेबांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचविलं. पक्षाचं चिन्ह निवडतानादेखील आपला लढाऊपणा त्यातून दिसला पाहिजे ह्या हेतूने वाघ हे चिन्ह निवडलं गेलं. यथावकाश अनेक लोक शिवसेनेमध्ये येत राहिले. येणाऱ्यांची संख्या ही नेहमीच जाणाऱ्यांच्या संख्येहून जास्त होती. अगदी हॉटेलमध्ये असणाऱ्या पोरयापासूनते वरिष्ठ अधिकारी वर्गापर्यंत मी शिवसैनिक आहे असं अभिमानानं सांगणारे कित्येकजण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होते. कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांना भेटल्यानंतर त्यांची एक व्यंगचित्रकार म्हणून वाटचाल सुरु झाली आणि मार्मिकमुळे एक नविन पर्व सुरु झालं. त्याकाळी लोक मार्मिकची वाट पहायचे ते केवळ त्यात असलेल्या साहेबांनी काढलेल्या व्यंगचीत्रांमुळे आणि त्यांच्या असलेल्या राजकीय टीकाटिपण्णीमुळे.
हळूहळू शिवसेना ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि मग सबंध महाराष्ट्रामध्ये पसरली. एक प्रादेशिक पक्ष असूनही दिल्लीश्वरांना शिवसेनेबद्दल दरारा वाटत असे. मुंबईचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे राजकारण शिवसेनेला वगळून कधीही होऊ शकले नाही.
मुंबईमध्ये धुलिवंदन मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. पण ते करत असताना कोणत्याही महिलेला शिवसैनिकांनी त्रास दिला नाही आणि इतर कोणी देणार नाही याची काळजी देखील घेतली. याला कारण म्हणजे साहेबांबद्दल असलेली आदरयुक्त भीती आणि साहेबांचे संस्कार.
हा सिलसिला चार दशके सुरु राहिला. हे करत असताना राजकारणामध्ये ताणले गेलेले संबंध घरगुती संबंधांच्या आड येणार नाहीत याची पुरेपूर काळजी साहेबांनी घेतली. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार आणि त्यांची असलेली मैत्री. बाहेर त्यांना बारामतीचा म्हमद्या असं म्हणणारे साहेब त्यांचे परममित्र होते हे सर्वज्ञात आहे. सुप्रिया सुळे त्यांना आवर्जून काकाच म्हणायच्या. अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले होते. एकदा मुंबई पुणे प्रवासात एकमेकांना क्रॉस होत असताना छगन भुजबळांना कळलं की पलिकडे साहेब आहेत. गाडी थांबवण्यात आली. गाडीमधून त्यांची पत्नी उतरली आणि जावून साहेबांच्या पाया पडली. केवळ सत्तेसाठी भुजबळ शिवसेना सोडून गेले. पण त्यानंतरदेखील साहेबांनी कौटुंबिक संबंध तितकेच जपले.
मुंबई केंद्रशासित करायची असं घात केंद्राने आणि महाराष्ट्र सरकारने घातला होता. केवळ शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली. मुंबई सगळ्या भारतीयांची आहे असं म्हणणारा सचिन तेंडूलकरदेखील त्यांच्या तडाख्यातून सुटला नाही तिथे इतरांची काय कथा. अतिशय जिव्हारी लागणारी आणि झोंबणारी वक्तृत्व शैली. अगदी इंदिरा गांधींपासून ते नारायण राणेपर्यन्त साहेबांनी कधीच कोणाचीच पर्वा केली नाही.  जे वाटलं तेच बोलले. भुजबळांना लखोबा लोखंडे, राणेंना नाऱ्या ही नावे त्यांनीच दिली. मुसलमानांना लांडे हा शब्द जाहीरपणे वापरलेला हा पहिला आणि एकमेव माणूस. पाकिस्तानच्या सीमेवर उभं राहून सगळे भारतीय मुतले तर तिकडे पूर येईल असं बोलू शकणारा माणूस येणाऱ्या कित्येक दशकांमध्ये सापडणार नाही.
कधीही सक्रीय राजकारणात न येता साहेबांनी आपला पक्ष उभा केला. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल असा शब्द त्यांनीच पहिल्यांदा वापरला. महाराष्ट्रामध्ये साहेब म्हणून जन्माला आलेली केवळ ३ चं माणसे .यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार.
शिवाजी पार्कला सभा घेणं भल्याभल्यांना घाम फोडणार काम आहे. पण साहेबांच्या सभेला अगदी या टोकापासून ते त्या टोकापर्यंत मैदान भरलेलं असे.
त्यांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी योग्य होत्या असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यांनी घेतलेले सगळे निर्णय योग्य होते हेही म्हणणं चुकीचं ठरेल. पण ते बोलण्याची हे वेळ नव्हे.


एखादा राजकीय नेता जातो आणि अगदी रस्त्यावरच्या सामान्य माणसालादेखील वाईट वाटतं. आबालवृद्ध ढसाढसा रडतात हे चित्र इथून पुढे बरीच वर्षे दिसणार नाही.  मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा, मराठी मातीवर जिवापाड प्रेम करणारा, केवळ महाराज हेच दैवत मानणारा शिवसेनेचा हा ढाण्या वाघ, हिंदुहृदयसम्राट आज काळाच्या पडद्याआड गेला. या वाघाला माझं त्रिवार प्रणाम.

Thursday, November 1, 2012

पुण्याचा बस-डे



नुकताच पुण्यामध्ये बस-डे साजरा झाला. सकाळने हा उपक्रम सुरु केला आणि राबवलादेखील. आधी नुसती संकल्पना असलेला हा उपक्रम अनेक छोट्या मोठ्या लोकांच्या सहकार्याने पार पडला.
उपक्रम जेव्हा फक्त संकल्पना होता तेव्हापासून सकाळने सावकाश प्रसिद्धी करायला सुरुवात केली. हळुहळू काही प्रसिद्ध लोकांना पुढे केलं गेलं. या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले गेले. ते सकाळमध्ये छापले गेले. रोजच्या रोज या उपक्रमाची जाहिरात सकाळमध्ये येऊ लागली. मग देणग्या सुरु झाल्या. अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांनी जमेल तशी देणगी दिली. प्रचंड मोठा निधी जमा झाला. आणि अखेरीस हा दिवस पार पडला.
मी रोज सकाळचा ई-पेपर वाचतो. दुसऱ्या दिवशी पेपर उघडला तर पहिल्या पानावर बस-डे बद्दल बातम्या. तिथेसुद्धा कलमाडीसारख्या माणसाला व्यासपीठावर संधी दिली गेली याबद्दल वाईट वाटलं. दुसऱ्या पानावर तशाच बातम्या. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या..... २ नोव्हेंबरच्या ई-सकाळ च्या सगळ्याच्या सगळ्या १० पानांवर फक्त आणि फक्त बस-डे. साहजिकच माझ्या मनात विचार आला बाकीच्या बातम्यांना काही महत्व नाही का??
बस-डे हा उपक्रम निश्चित चांगला आहे. त्याच्यामागे असलेला हेतू चांगला आहे. त्यासाठी लोकांनी देणग्या देणंदेखील चांगलं आहे. पण हे सगळं केल्यानंतर एक वर्तमानपत्र म्हणून सकाळने इतर बातम्या न छापता केवळ आपल्या उपक्रमाचे गोडवे गाण्यात सबंध पेपर वाया घालवावा हे मनाला पटत नाही. बाकीच्या जगात जे काही झालं त्याला काहीच महत्व नाही का?? वर्तमानपत्र हे एक तटस्थ माध्यम आहे असं माझं मत आहे. असं असताना सकाळसारख्या माध्यम समूहाने बाकीच्या बातम्या न छापण्यापर्यन्त जाणे हे फारसं पटलं नाही. दुसरीकडे लोकसत्ताला सोनियांवर १५०० कोटी बळकवल्याचा आरोप केला गेला होता. (इथे लोकसत्ताची प्रसिद्धी करण्याचा हेतू नाहीये.) हा इतका मोठा विरोधाभास एक प्रश्नचिन्ह उभं करतो.
दुसरा मुद्दा असा की ज्या पद्धतीने अनेक सेलेब्रेटीजचे इंटरव्ह्यूज घेतले गेले. ज्यांनी बसने प्रवास केला ते लोक इथून पुढे कायम बसने प्रवास करणार आहेत का? केवळ एक दिवस प्रवास करून वाह वाह!!! छान छान असं म्हणणं सोपं आहे. जे लोक रोज बसने प्रवास करतात त्याच्या समस्या तेच जाणतात. एक दिवस बसने प्रवास करून काय कळणार आहे?? माझ्या एक मित्राने चांगला निर्णय घेतला. त्यानं ठरवलं की या दिवशी आपण बसने प्रवास करायचा नाही. कारण रोज हजारो लोक बसने प्रवास करतात. आपण केवळ आज बस-डे म्हणून प्रवास करायचा आणि उगाचच गर्दीमध्ये भर का टाकायची?? मला त्याचा निर्णय पटला. अजून कोण्या एक मित्राने लिहिलं होतं की केवळ मुख्य मार्गांवर जास्त बसेस सोडल्या होत्या. बाकी मार्गांवर नेहमीचं वाट पाहणं आणि गर्दीतून प्रवास यातून लोकांची सुटका झालीच नाही. ज्या देणग्या घेतल्या गेल्या त्याचा उपयोग खरोखर बससेवा सुधारण्यात झाला तर बर होईल. या अगोदर असे किती निधी आले आणि गेले. पुण्याची बससेवा अजूनही तशीच आहे.
असे बस-डे अजूनही झाले पाहिजेत हे मान्य. पण हे करत असताना सामान्य माणसाला विचारात घेउन करावं. उपक्रम निश्चितच विधायक आहे. पण तो केवळ उपक्रम राहू नये हीच केवळ इच्छा.