Thursday, November 8, 2018

आणि डॉ.काशिनाथ घाणेकर


नव्वदच्या दशकात रमणारे आम्ही त्याच्यापलीकडे फारसे कधी जातही नाही.नाटकं वगैरे सुद्धा अलीकडचीच बघतो. नाटकं वाचणारे तर खूपच कमी जण असतात.कॉलेजात पुरुषोत्तम, फिरोदिया केलेलं असलं तरी ते वयही उथळ असते. त्यामुळे साठच्या दशकांत आपल्या अभिनयाने नाटकं,सिनेमे अजरामर केलेले कलाकार आम्हाला एक तर माहित नसतात. चुकून माहिती असलेच तर ते फक्त ऐकून किंवा वाचूनच.     

माझ्या पिढीला डॉ. काशिनाथ घाणेकर माहित असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. मला खात्री आहे आजही अनेकांना ते माहीत नसतील.मात्र रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अशी नावं ऐकली की आम्हाला थोडा आपलेपणा वाटतो. मग कधीतरी कुणीतरी सांगितलेलं आठवतं, "हा रोल काशिनाथ घाणेकर करायचे." 

'शूर आम्ही सरदार' गाणं माहित नसलेला मराठी माणूस सापडणे केवळ अशक्य आहे. लहानपणापासून आपल्यातल्या अनेकांनी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत हे गायलं असेलच. अगदी गेला बाजार बाथरूममध्ये तर नक्कीच. या गाण्यात घोड्यावर बसलेला माणूस कोण? हा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तो माणूस आहे डॉ. काशिनाथ घाणेकर. 

तर अशा या भारी माणसावर चित्रपट येतोय आणि घाणेकरांची भूमिका सुबोध भावे करतोय म्हटल्यावरच हा चित्रपट पहायचा हे मनाशी निश्चित केलं होतं.

चित्रपट म्हणून आणि डॉ.काशिनाथ घाणेकर फारसा भारी नसला तरी मला कौतुक सुबोध भावेचं (मुद्दाम एकेरीत उल्लेख करतोय.) करावंसं वाटतं. चित्रपट म्हणायचं झालं तर सुबोध मला ठळकपणे आठवतो तो 'सनई चौघडे'मधला. त्यानंतर बालगंधर्व,लोकमान्य, कट्यार या चित्रपटांतून त्याने आपला उत्तम अभिनय दाखवला. आमच्या पिढीने ऐकलेले, वाचलेले हे लोक त्याने पडद्यावर साकारले. ही माणसं कशी होती हे त्याने आजच्या पिढीसमोर आणलं. अगदी काशिनाथ घाणेकर सुरू होतानाही टीप येतेच. आजच्या पिढीला काशिनाथ घाणेकर माहीत व्हावेत म्हणून हा चित्रपटप्रपंच. या सगळयासाठी त्याचं कौतुक करावसं वाटतं. अशाच भूमिकांमध्ये अडकून न राहता त्याने तद्दन व्यावसायिक सिनेमेही केले.

बालगंधर्व पाहिल्यानंतर माझा एक मित्र म्हणाला होता,

"भावे कष्ट घेतो."

त्याचं हे वाक्य मला मनोमन पटलं. बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार या सगळ्या चित्रपटांमध्ये त्याची मेहनत दिसते. अगदी सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या 'तुला पाहते रे' मालिकेतील विक्रांत सरंजामेही तरुणींना भुरळ पाडतो. काशिनाथ घाणेकरमध्येही सुबोधचे त्या भूमिकेसाठीचे कष्ट दिसून येतात. 'भूमिका जगणे' वगैरे शब्द थिटे वाटावेत इतक्या तन्मयतेने त्याने घाणेकर साकारले आहेत. हा चित्रपट फक्त सुबोधच्या अभिनयासाठी लक्षात राहील.त्याच्या संवादांसाठी लक्षात राहील. 'एकदम कडक!' हा त्याचा संवाद त्याच्या स्टाईलमध्ये महाराष्ट्रातल्या चहाच्या टपऱ्यांवरसुद्धा पुढचे काही महिने नक्की ऐकू येत राहील. घाणेकर स्टार झाल्यावर आपल्या चाहत्यांमध्ये मिसळताना वाजणार पार्श्वसंगीत विशेष लक्षात राहण्याजोगे आहे. सुबोधबरोबरच प्रसाद ओक आणि वैदेही परशुरामी यांच्या भूमिका तितक्याच वजनदार. प्रसाद ओकचे प्रभाकर पणशीकर ठळकपणे लक्षात राहतात.

चित्रपटात जाणवलेली अजून एक गोष्ट नमूद करतो. दिग्दर्शकाने घाणेकरांना रंगभूमीचा सम्राट म्हणून डोक्यावर घेतलेलं जसं दाखवलं त्याचप्रमाणे दारूमध्ये त्यांचा झालेला सर्वनाशही दाखवला.त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांना नाकारलेलंही दाखवलं. त्यांची ही बाजू जर प्रेक्षकांसमोर आणली नसती तर आज उद्या घाणेकरांसारखा नट होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पोरांना त्यांचं दारू पिणं, दारूच्या आहारी जाणं हे वाईट वाटलंच नसतं. घाणेकरांच्या दारूच्या व्यसनाचं उदात्तीकरण (ग्लोरीफिकेशन) केलं नाही त्याबद्दल दिग्दर्शकाचं विशेष अभिनंदन.

ठग्ज ऑफ हिंदुस्थानसारख्या बच्चन, आमीर खानसारखी स्टारकास्ट असलेल्या, यशराज फिल्मसारख्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटाशी टक्कर घेत व्हायकॉमने हा चित्रपट प्रदर्शित केला त्याचंही कौतुक. 'आपलं नाणं एकदम खणखणीत वाजणार' हा आत्मविश्वास असल्यानेच त्यांनी हे केलं असावं आणि ते खरंही ठरतंय. 

घाणेकर कसे होते हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट बघा. चित्रपट म्हणून नाही तर सुबोधच्या अभिनयासाठी मात्र नक्की बघा.

Wednesday, October 31, 2018

सूर्यवंशी सरांशी पहिली ओळख अकरावीत झाली. ते आम्हाला इंग्रजी शिकवत. आठवीत असताना इंग्रजीच्या व्याकरणाचा पाया डुंबरे सरांनी तयार करून घेतला. शाळेत नववी,दहावीला माकुणे सरांनी इंग्रजी विषय इंग्रजीतून शिकवला. पुढे अकरावी, बारावीला सूर्यवंशी सरांनी तेच केले. आपल्याकडे इंग्रजी विषय अनेकदा मराठीतून शिकवला जातो.सूर्यवंशी सरांनी ते करणे कटाक्षाने टाळले. कविता असो किंवा गद्य, त्याचा अर्थ त्यांनी कायम इंग्रजीमधूनच समजावून सांगितला.  त्यामुळे नकळतपणे आम्हाला इंग्रजी कानावर पडत असे. कधी कधी सर वर्गात येऊन एक दोन जणांना उभे करत.त्यांना एखादा विषय देऊन त्यावर इंग्रजीतून चर्चा करायला लावत.सुरुवातीला इंग्रजी बोलताना हसू येई.नंतर मात्र सवय होऊन गेली. बोलताना आम्हाला काही अडचण आली, योग्य शब्द सापडला नाही तर सर मदतीला असतच.मला या चर्चांचा पुढे बराच उपयोग झाला. मी माझं म्हणणं इंग्रजीतून मांडताना अनेकदा दोन वाक्यांच्या मध्ये 'म्हणजे' हा शब्द वापरे.तो आपसूक माझ्या तोंडी येई.सरांनी ते बरोबर पकडले आणि मला त्या ऐवजी 'आय मीन किंवा आय मीन टू से' हे वापरण्याचे सुचवले.मी आजतागायत ते करतो आहे.

आपल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन इंग्रजी बोलताना अडचण येऊ नये या भावनेतून सर आम्हाला इंग्रजी बोलायचा सराव करायाला लावत. या चर्चांचे विषयही आम्हाला आवडतील असे असत.कधी सचिनची बॅटिंग, कधी सध्याची राजकीय परिस्थिती तर कधी अगदी लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज असेही विषय असत.एक आठवण सांगतो. लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज या चर्चेत दोन्ही बाजूकडची मुलं आपली बाजू तावातावाने मांडत होती.सर आपल्या परीने तटस्थ राहून चर्चा पुढे नेत होते. सरांनी लव्ह मॅरेज केलेय हे माहीत असलेल्या मी एका मुद्द्यावर उभे राहून म्हटले,

"Even you chose to go ahead with Love Marriage. In that case, you should support us." 

माझं हे वाक्य ऐकताच सगळा वर्ग हास्यात बुडाला.सरांनाही हसू आवरले नाही आणि अखेरीस त्यांनी आमची बाजू घेतली.

बारावीनंतर जुन्नरमधून बाहेर पडलो.जुन्नरला गेल्यावर अधून मधून सरांना भेटणे होत असे.त्यावेळीही त्यांच्याशी इंग्रजीतूनच संवाद होई. बारावी संपून आता पंधरा वर्षे होतील.सर आजही संपर्कात असतात.माझे ब्लॉग नियमित वाचत असतात.काही चूक वाटली तर आवर्जून तसे सांगतातही. आज सर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा दाटून आल्या. सरांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.

Tuesday, October 30, 2018

पंधरा काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.माझी बहीण पूजाला मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्टला अॅडमिशन मिळाले.कॉलेजचं तर झालं पण राहण्याची व्यवस्था अजून झाली नव्हती. मरीन लाईन्सला असलेल्या मुलींच्या सरकारी हॉस्टेलला जेजेच्या विद्यार्थीनींसाठी काही जागा राखीव असतात. या जागाही लवकर भरतात. पूजाच्या अॅडमिशनला तसा  उशीर झाला होता.त्यामुळे हॉस्टेलला प्रवेश मिळेल की नाही याबाबत शंका होती. दादांना कुणीतरी सांगितलं,

"वळसे पाटलांना भेटा. ते करतील काम."

साहेब त्यावेळी महाराष्ट्राचे उच्चशिक्षणमंत्री होते. एक दिवस सकाळीच दादा साहेबांच्या मुंबईतल्या शिवगिरी बंगल्यावर गेले. भेट ३-४ मिनिटांचीच झाली. साहेबांनी काम होईल याची खात्री देऊन त्यांचे स्वीय सहाय्यक भोर यांच्या संपर्कात राहण्यास सांगितले.

त्यानंतर काय सूत्रे फिरली की काय झाले कल्पना नाही.दोन एक दिवसांनी भोर साहेबांचा दादांना फोन आला,

"उद्या मुलीला घेऊन हॉस्टेलला जा.तिथं सगळं होईल व्यवस्थित."

त्यांनी सांगितल्याप्रमाणे दादा आणि पूजा हॉस्टेलला पोहोचले.ते पोहोचतात तोच हॉस्टेलचा फोन वाजला. फोनवर बोलून रेक्टर मॅडम बाहेर आल्या आणि दादांना म्हणाल्या,

"तुम्ही गुंड का?"

दादांनी हो म्हणताच त्यांनी पूजा आणि दादांना ऑफिसमध्ये नेऊन पुजाचा हॉस्टेलच्या प्रवेशाची प्रक्रिया वेगात पार पाडली. 

आपल्या गावची एक मुलगी जे जे सारख्या कॉलेजला जातेय म्हटल्यावर तिच्या हॉस्टेलचं हे छोटंसं काम केलंच पाहिजे या भावनेने साहेबांनी पूजाचं हे काम करून दिलं.

आजही कधी पूजाच्या अॅडमिशनची आठवण झाली की साहेबांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा प्रसंग पुन्हा एकदा आठवला. 

साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Monday, October 22, 2018

द ड्रेनेज

परवा बाणेरच्या ड्रामालयला 'द ड्रेनेज' नावाची शॉर्टफिल्म पाहिली. गावावरुन एक माणूस स्मार्टफोन घ्यायला शहरात येतो. त्याचा जुना फोन देऊन नवा स्मार्टफोन विकत घेतो. नवा फोन घेतल्याच्या आनंदात गावाकडच्या आपल्या एका मित्राला फोन करतो. मी नवा फोन घेतलाय, टचस्क्रीन आहे असं कौतुक चाललेलं असतं. तितक्यात एका दुचाकीवाल्याचा धक्का लागून फोन त्याच्या हातातून खाली पडतो तो नेमका एका ड्रेनेजमध्ये. 

दहाच मिनिटांपूर्वी घेतलेला फोन ड्रेनेजमध्ये पडल्यावर त्या माणसाची काय अवस्था होते? तो फोन परत मिळवण्यासाठी तो काय काय करतो? या सगळ्याची गोष्ट म्हणजे 'द ड्रेनेज'. नंदू माधव यांनी भूमिकेला यथायोग्य न्याय दिला आहे. गावाकडचा माणूस, त्याचं शहरातील बावरत वावरणं, मोबाईल ड्रेनेजमध्ये पडल्यावर तो पुन्हा मिळवण्यासाठीची धडपड हे सगळं त्यांनी खूपच मस्त साकारलंय. एका प्रसंगात बरोबर त्यांचा फोन पडलेल्या ड्रेनेजच्या झाकणावर एक गाडी येऊन थांबते. एरवी कुणी असतं तर त्या गाडीवाल्याला सांगून गाडी दुसरीकडे लावायला सांगितली असती आणि फोन काढायचे प्रयत्न सुरु ठेवले असते.  बाजूला बसून गाडी कधी हलेल याची वाट बघत बसतात. यातून त्यांचा साधेपणाही जाणवला. 

तुम्ही म्हणाल एवढंच आहे का शॉर्टफिल्ममध्ये? तर नाही. शॉर्टफिल्म ज्याने लिहिली आणि दिग्दर्शित केली त्या विक्रांत बदरखेशी या निमित्ताने बोलायला मिळालं. शॉर्टफिल्मच्या शेवटच्या काही फ्रेम्समधून दिग्दर्शक त्याला द्यायचा असलेला संदेश देतो. मोबाईलचं व्यसन वगैरे विषय आजवर भरपूर चघळून झालेत. विक्रांत त्याही पलीकडे जाऊन विचार करतोय. गावात मोबाईलला रेंज नाही म्हणून विक्रांतच्या एका नातेवाईकाच्या शेतात मोबाईलचा टॉवर लावण्यात आला. त्याच महिन्याकाठी भाडंही सुरु झालं. मोबाईलला रेंजदेखील आली. मात्र त्यामुळे ही माणसं कुठेतरी शेती करायला आळसू लागली. हे सगळं कुठेतरी विक्रांतला खटकत होतं. आपल्या या नेहमीच्या जगासारखंच मोबाइलचंही एक जग आहे की काय? ते जग आपल्या जगाहूनही भयंकर आहे काय? या सगळ्या विचारांमधून 'द ड्रेनेज' ची  निर्मिती झाली. 

एका हलक्याफुलक्या विषयावर ही फिल्म आहे असे वाटत असताना शेवटची ३-४ मिनिटं मात्र तुम्हाला बराच वेळ विचार करायला भाग पाडतात. पंधरा मिनिटांत ही शॉर्टफिल्म तुम्हाला जिंकते. ड्रेनेजमध्ये केलेलं शूटिंग, आतमध्ये असलेला अंधार, घाण, त्यात शूटिंग करताना फवारलेले रूम फ्रेशनर आणि काय काय. हे सगळं करताना नक्की कसं केलं हे विक्रांतने सांगितलं तेव्हा त्याच कौतुक वाटलं. 

एक मुलगा अकोल्याहून पुण्यात येतो काय, स्पर्धा परीक्षांची तयारी करता करता लिहिता होतो काय, शॉर्टफिल्म लिहितो काय, आणि त्या शॉर्टफिल्मला जगभरातल्या अनेकानेक महोत्सवांमध्ये पारितोषिकं मिळतात काय!! एक लेखक, दिग्दर्शक म्हणून विक्रांतचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. चित्रपटांचा दर्जा खालावला असे म्हणणाऱ्या लोकांना द ड्रेनेजसारख्या फिल्म्स दाखवल्या की या क्षेत्राचं भवितव्य योग्य हातांत आहे याची त्यांना खात्री पटेल. 

टिप - ही शॉर्टफिल्म युट्युबवर उपलब्ध नाही. लवकर युट्युबवर येईल अशी शक्यताही नाही. वेळोवेळी या फिल्मचं स्क्रीनिंग पुणे, मुंबई आणि इतरही शहरांत होत राहील. तुमच्या शहरात आली की न चुकता पहा. 

Monday, October 8, 2018

अंधाधुन

आत्ताच अंधाधुन बघून आलोय. ट्रेलर न पाहता फक्त एका मित्राने सांगितलं भारी आहे म्हणून गेलो. बऱ्याच वर्षांनी एकट्यानेच चित्रपट पाहिला.हा चित्रपट पाहून कधी एकदा घरी जाऊन लिहीतोय असं आज झालं होतं. 

प्रेक्षकाला शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणे की काय म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण आहे हा चित्रपट. ब्लॅक कॉमेडी आहे. चित्रपटाची सुरुवात मिस करू नका. कारण ती मिस झाली तर अख्ख्या चित्रपटाची मजा जाईल. 

आयुष्यमान आधीच भारी अॅक्टिंग करतो. त्यात त्याला हा चित्रपट मिळाला ज्यात तो एक मुख्य पात्र आहे. त्याने आंधळ्याच्या (सॉरी आंधळ्याचं नाटक करणाऱ्या - हा स्पॉयलर नाही) भूमिकेत जीव ओतला आहे. तब्बू हे दुसरं मुख्य पात्र. तिच्याबद्दल न बोललेलंच बरं इतकी ती भारी आहे.तिचं वय जसजसं वाढत चाललंय तसतसा तिचा अभिनय जास्तच भारी होत चाललाय. राधिका आपटेने छोट्याश्या भूमिकेत हवा केली आहे. झाकीर हुसेन हा डॉक्टरच्या भूमिकेत मजा आणतो. 

तब्बूने केलेला एक खून आयुष्यमान पाहतो, त्याने आपल्याला पाहिलंय हेही तब्बूला माहित असतं. तरी चित्रपट तुम्हाला गुंतवून ठेवतो. का? ते चित्रपट पाहूनच माहित करून घेणे जास्त योग्य राहील. दिग्दर्शक श्रीराम राघवन फिल्म इन्स्टिट्यूटचा माजी विद्यार्थी असल्यामुळे पुण्यात चित्रीकरण करावे असे त्याला वाटले असू शकेल. संपूर्ण चित्रपट पुण्यात चित्रित झाल्याने सतत आपल्याला माहित असलेल्या जागा दिसल्या की काही भान नसलेले प्रेक्षक मोठ्याने "अरे गुडलक चौक आहे हा." वगैरे वगैरे ज्ञान पाजळत राहतात. (पुण्यात चित्रित झालेला चित्रपट पुण्यात पाहताना तरी हे ज्ञान पाजळु नये याचं त्यांना भान रहात नाही. असो.)

अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत चित्रपट तुम्हाला धरून ठेवतो. किती? तर माझ्याशेजारी बसलेलं १२-१३ वर्षांचं पोरगं निम्म्याहून जास्त वेळ खुर्चीच्या पुढच्या कडेवर बसलं होतं आणि संपूर्ण चित्रपटात न राहवून त्याने ५-६ वेळा 'फक' म्हटलं.   

हा चित्रपट शांतीत क्रांती करतोय. फक्त माऊथ पब्लिसिटीवर चालणार आहे. यावर्षीच्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. पाहिला नसाल तर विकेंडची वाट पाहू नका. पस्तावा होणार नाही याची खात्री माझी. 

Friday, October 5, 2018

समालोचनाचे दोन दिग्गज

रिची बेनॉ आणि टोनी ग्रेग हे दोघेही माझ्या पिढीला खेळाडू म्हणून तितकेसे आठवत नाहीत. दिग्गज समालोचक म्हणून मात्र निश्चित आठवतात. मला स्वतःला रिची बेनॉ यांची कॉमेंट्री फारशी आठवत नाही. टोनी ग्रेग यांची कॉमेंट्री न ऐकलेला माझ्या पिढीचा माणूस सापडणं मात्र अवघड आहे.

टोनी ग्रेग यांची कॉमेंट्री म्हणजे दर्शकांसाठी पर्वणी असे.एखाद्या फटक्याचे भरभरून कौतुक कसे करावे हे शिकावे तर त्यांच्याकडूनच.एखाद्या खेळाडूने सोपा कॅच सोडला तर सयंतपणे फक्त बोलण्यातून त्याची लायकी काढावी ती त्यांनीच.

भारतीय क्रिकेट रसिकांना टोनी ग्रेग जास्त लक्षात राहतील ते त्यांच्या शारजामधल्या कॉमेंट्रीमुळे. सचिन ऑस्ट्रेलियाच्या चिंध्या उडवत होता तेव्हा माईक टोनी ग्रेग यांच्याकडे होता हे बरंच झालं असं आता वाटतं. सचिनची तो स्फोटक खेळी  जगप्रसिद्ध करण्यात ग्रेग यांच्या कॉमेंट्रीचाही तितकाच मोलाचा वाटा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

आज रिची बेनॉ आणि टोनी ग्रेग या दोन दिग्गजांचा जन्मदिवस.आजच्या काही क्रिकेट समालोचकांची कॉमेंट्री ऐकून अक्षरशः कीव येते आणि या दोन दिग्गजांची आठवण आल्यावाचून रहात नाही.

क्रिकेटरसिक हे दोन आवाज येणारी अनेक वर्षे मिस करतील यात शंका नाही.

Friday, September 14, 2018

आवाज कुणाचा?

कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही मोठ्याने ओरडा, 

"आवाज कुणाचा?" 

तुमच्या आरोळीला प्रतिसाद म्हणून, "मेकॅनिकलचा." असं म्हणणारे आवाज सगळ्यात जास्त असतील. अर्थात मेकॅनिकलच्या पोरांचा त्यादिवशी मासबंक नसेल तर हं!  

प्रत्येक इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये अशीच परिस्थिती असते. पहिलं वर्ष सगळ्यांना सारखंच असल्याने फारसा फरक पडत नाही. दुसऱ्या वर्षांपासून मग त्या त्या शाखेचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरु होतो. डिपार्टमेंटच्या इमारती वेगवेगळ्या असतात. आमच्या कॉलेजला मॅकेनिकल डिपार्टमेंटचा पोर्च आहे. कॉलेज सुरु होण्याआधी तिथं सगळे जमायचे. वाटलंच तर लेक्चरला जायचे. दररोज लेक्चर्स सुरु होण्याआधी आमच्या कॉलेजात प्रार्थना होत असे. ही प्रार्थना सुरु असताना उभे राहणे अपेक्षित असे. एकदा प्रार्थना सुरु असताना मॅकेनिकल पोर्चला काही मुले शांतपणे बसून राहिली. पलीकडे असलेल्या ई अँड टीसीच्या पोर्चमध्ये उभ्या असलेल्या एका मॅडमने हे पाहिले. प्रार्थना संपल्यावर त्या न राहवून मेकॅनिकल पोर्चकडे आल्या आणि आम्हाला ओरडू लागल्या. एक तर आपल्या डिपार्टमेंटचे सोडून इतर शिक्षक माहित नसलेल्या आम्हाला त्या आमच्याशी बोलत आहेत हे कळायला दोन मिनिटं गेली. कळल्यानंतर ह्या आपल्या डिपार्टमेंटच्या नाहीत म्हणून त्यांच्याकडे कुणी लक्षही दिलं नाही. आपल्या बोलण्यावर मुलांची काहीच प्रतिक्रिया नाही बघून त्यांनी चिडून निघून जाणे पसंत केले. त्यानंतर मात्र पोर्चात हास्याचे फवारे उडाले हे सांगायला नकोच.  

कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकलची पोरं अतिशय टारगट म्हणून गणली जातात. लेक्चर्स बंक करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे मेकॅनिकलची पोरं वागतात. आपले ज्युनियर्स जर सिन्सीयरली लेक्चर्स करत असतील तर सिनियर्स येऊन त्यांना वेड्यात काढतात. इतकं की आपण लेक्चर्स करून मोठी चूक करतोय की काय असं त्या ज्युनियर्सला वाटू लागतं. हळूहळू मग तेही सिनियर्सचा कित्ता गिरवू लागतात. 'मासबंक' हा शब्द फक्त उच्चारायची खोटी की मेकॅनिकलची पोरं वर्गातून बाहेर असतात. इतर ब्रॅंचेसची पोरं लेक्चर्स इमाने इतबारे करत असताना मेकॅनिकलची पोरं मात्र निवांत असतात. 

किती निवांत? तर एकदा लेक्चर बुडवून पोर्चात बसलेल्या आम्हाला सर येऊन म्हणाले, 

"अरे इथे काय बसलात? चला सगळे लेक्चरला." एवढं सरांनी रंगेहाथ पकडल्यावर तरी लेक्चरला जावे. पण जातील ते मेकॅनिकलचे कसले? आमच्यातलेच एक दोन जण सरांना म्हणाले, 

"सर आज नको. उद्या आम्ही सगळे नक्की येऊ." काय बोलायचं आता? 

"उद्या नक्की यायचं." एवढं म्हणून सर बिचारे निघून गेले. 

हे लेक्चर बंक करणं दुसऱ्या वर्षांपासून सुरु होतं ते अगदी शेवटच्या वर्षापर्यंत सुरूच असतं. कॉलेजमधून घरी पत्रं वगैरे जातात पण पोरं पालकांनासुद्धा सांगतात, 

"ते पत्र फाडून टाका."

सबमिशन वगैरे प्रकार आपल्यासाठी नाहीच असं मेकॅनिकलची पोरं मानतात. वेळ आली की मग ज्याने एखाद्याने फाईल पूर्ण केली असेल त्याची फाईल संपूर्ण वर्ग कॉपी करतो. मग त्याचं काही चुकलं असेल तर सगळ्या वर्गाची तीच चूक होते. एखाद्या एक्सपेरिमेंटचे रिडींग सबंध वर्गाचे सारखेच असतात. इतर ब्रँचची पोरं दर आठवड्याला प्रॅक्टिकल करतात. मेकॅनिकलवाले सेमिस्टरच्या शेवटी एकाच दिवसात सलग बसून सगळे प्रॅक्टिकल करतात. चुकून एखाद्या विषयाचं प्रॅक्टिकल दर आठवड्याला झालं तर त्याचं जर्नल मात्र सेमिस्टरच्या शेवटीच पूर्ण केलं जातं. एखादा शहाणपणा करत मध्ये जर्नल घेऊन गेला तर प्रोफेसर लोकसुद्धा त्याला सेमिस्टरच्या शेवटी यायला सांगतात. मग एकाच दिवशी रांगेने सगळ्यांचे जर्नल तपासले जातात. आठ एक्सपेरिमेंट असतील तर आठ सह्या न करता, महिरप टाकून एकच सही केली जाते. 

बरं इतकं सगळं केल्यावर मार्क कमी पडले पाहिजेत. तसंही होत नाही. बऱ्याच पोरांना अगदी चांगले नाही तरी बरे मार्क पडतात. म्हणजे इतर ब्रँचची पोरं लेक्चर्सला बसून, जीवतोड अभ्यास करून जेवढे मार्क पाडतात तेवढे तर मेकॅनिकलची पोरं शेवटी शेवटी अभ्यास करूनही पाडतात. त्यामुळे आधीच मेकॅनिकलचा रुबाब असणाऱ्या पोरांना एखाद्या कॉम्प्यूटर किंवा इतर कुठल्या तत्सम ब्रँचच्या पोराने हटकले तर त्याची धडगत नसते. 

अभ्यास सोडून खेळाचा विषय घेतला तर तिथेही तेच. सगळ्या खेळांत मेकॅनिकलच विजेते. डायरेक्टर्स ट्रॉफी दर वर्षी मेकॅनिकलकडेच. नाही म्हणायला सिव्हिलवाले थोडीफार स्पर्धा करतात. पण त्यांच्यात अभ्यास करणारे फक्त अभ्यास करतात आणि खेळणारे फक्त खेळतात. 
कॉलेजच्या गॅदरिंगला दंगा करावा तर मेकॅनिकलच्याच पोरांनी. त्यांच्यासारखा दंगा कुणीच करत नाही. मग खुर्च्या हवेत फेकणे असो, खुर्च्यांवर उभे राहून नाचणे असेल, एखाद्याला विशिष्ट शब्दाने हाक मारणे असेल किंवा अजून काही. कॉलेजचं गॅदरिंग आपल्यासाठीच आहे अशा आविर्भावात मेकॅनिकलची पोरं वावरतात. 

या सगळ्या स्पर्धांमध्ये चियरिंगदेखील तेवढेच महत्वाचे असते. "आवाज कुणाचा?" असं म्हटलं की त्या त्या ब्रँचची पोरं आपल्या ब्रँचचं नाव घेऊन ओरडतात. या सगळ्यांत मेकॅनिकलचा आवाज सगळ्यात मोठा असतो हे सांगायला नकोच. माझ्या हॉस्टेलचा एक सिनियर केमिकल ब्रँचचा होता. त्याच्या ब्रँचच्या पोरांबरोबर चियरिंग करताना, "आवाज कुणाचा?" कुणी म्हटलं की त्याचे सगळे मित्र केमिकलचा म्हणायचे. हा एकटाच मेकॅनिकलचा म्हणायचा. त्यासाठी त्यांचा मारही खायचा. नंतर आम्हाला कायम सांगायचा, 

"मेकॅनिकल ब्रँच भारी असते राव. त्यावेळी ऍडमिशन मिळालं नाही म्हणून मी केमिकलला आलो. पण मेकॅनिकलबद्दल प्रेम अजूनही आहे." 

प्लेसमेंट सुरु होताना आम्हाला मार्गदर्शन करायला आमचे डीन आले. सगळ्याच ब्रँचची पोरं समोर बसली असताना डीनने आपल्या भाषणाची सुरुवात काही अशी केली, 

"खरं सांगायचं तर इंजिनीयरिंगच्या ब्रँच तीनच. एक सिव्हिल, दुसरी मेकॅनिकल आणि तिसरी इलेक्ट्रिकल. हे कॉम्प्युटर, ई अँड टीसी वगैरे सगळं खोटं आहे." 

त्यांचं हे वाक्य संपायची खोटी की मेकॅनिकलच्या पोरांनी अख्खा हॉल डोक्यावर घेतला. कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजच्या प्लेसमेंट हॉलमध्ये डीनसमोर पोरांनी शिट्ट्या मारल्याचा हा एकमेव प्रसंग असेल. इतर ब्रँचच्या पोरांची तोंड तेव्हा बघण्यासारखी झाली. 

इंजिनीयरिंगचा शेवटचा पेपर झाला तेव्हा आमच्यातला एकजण भर वर्गात उभा राहून ओरडला, 
"अरे आवाज कुणाचा?"

आपण परीक्षागृहात बसलो आहोत याचा विचार न करता आम्ही सगळे एका सुरात ओरडलो, 

"मेकॅनिकलचा."

ते होत नाही तोच काही जणांनी व्हरांड्यात सुतळी बॉम्ब फोडले. तेवढ्यावर न थांबता ढोल ताशे बोलावून त्याच्या तालावर नाचायला सुरुवात केली. कॉलेजच्या आवारात नको म्हणून सांगायला
आलेल्या सिक्युरिटी गार्डलासुद्धा नाचवले. पोरं इंजिनीयर झाली म्हणून तोही आनंदाने नाचला. त्यानंतर मात्र इतर सगळ्याच ब्रँचची पोरं एकत्र येऊन नाचली. कारण सगळेच इंजिनीयर झाले. आज दहा वर्ष झाली इंजिनीयरिंग पूर्ण करुन. माझ्या माहितीतला एक मुलगा नुकताच मेकॅनिकल इंजिनीयर झाला. एकदा सहज गप्पा मारता मारता त्याला विचारलं, 

"मग सध्या आवाज कुणाचा आहे?"

"प्रश्न आहे का हा सर? परीक्षांचे पॅटर्न बदलले, वेळही बदलली, मुलंही बदलली तरी आवाज कायम मेकॅनिकलचाच होता आणि मेकॅनिकलचाच राहील." हे त्याचं उत्तर ऐकून मीही गालात हसलो. 

Wednesday, September 12, 2018

पी.आर.

पी.आर. म्हटलं की जुन्नरकरांना डॉ. पी. आर. कुलकर्णीच डोळ्यासमोर येतात. लहानपणी एकदा काहीतरी निमित्त झालं आणि मी आजारी पडलो. दोन तीन दिवस उपचार करूनही काही फरक पडेना. मग दादा मला घेऊन पीआरकडे गेले. ती पीआर आणि माझी पहिली भेट. तशी माझा वर्गमित्र आणि आता जवळचा मित्र असलेल्या आदित्यचे वडील म्हणून ओळख होतीच. मात्र पेशंट म्हणून त्यांच्याकडे जाण्याची ही पहिलीच वेळ. नंबर आल्यावर मी दादांबरोबर आत गेलो. त्यांनी दादांना नमस्कार केला आणि विचारले, 

"बोला, काय होतंय?" 

पेशंटला हा प्रश्न विचारण्याची पीआरची शैली अशी काही आहे की पेशंटच्या चेहऱ्यावर आपले दुखणे सांगतानाही हसू येते. 

दादांनी त्यांना काहीतरी सांगितले असावे. त्यांनी समोरच्या टेबलावर मला झोपवून तपासले आणि काही गोळ्या लिहून दिल्या. 

"परत कधी येऊ?" म्हणून दादांनी विचारले तर ते म्हणाले, 

"परत कशाला येता आता? एवढ्यात बरा होणार आहे तो. बिनधास्त जा."

आपला पेशंट परत आपल्याकडे येऊ नये असे म्हणणारा हा अजब डॉक्टर आहे. तेव्हापासून अनेकदा पीआरकडून कधी डोकं फुटलं म्हणून, कधी डोळ्याच्या वर खोक पडली म्हणून, कधी गुडघा फुटला म्हणून पट्टी मारून घेणं हे नित्यनियमाचे झाले. त्यांचा दवाखानाही शाळेच्या जवळ असे.त्यामुळे काही झालं की मी आधी त्यांच्याकडे पळत असे. त्यांनाही कौतुक वाटे. मुलं म्हटलं की पडझड आलीच. त्यासाठी त्यांना रागावून काही होत नाही असंही हे पालकांना आवर्जून सांगत. 

दादा सांगतात त्याप्रमाणे पीआर जुन्नरमध्ये साधारणपणे १९७५-७६ मध्ये आले. जुन्नरमधल्या आपल्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी तेलीबुधवारातून केली. तेव्हा आठ आणे वगैरे फी घ्यायचे ते. पीआरचं पेशंटबाबतचे निदान अचूक असते अनेक जुने लोक आजही सांगतात. त्यामुळे योग्य उपचार होऊन पेशंटला गुणही येई. अल्पावधीतच पीआर जुन्नर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. अगदी लांब, मावळातूनसुद्धा पेशंट येऊ लागले. आजही त्यांच्याकडे तेव्हाचे काही पेशंट जे आता म्हातारे झाले आहेत ते येत असतात. कौतुकाने सांगतातही की "डाक्टर आठ आणे फी घ्यायचा तवापासून येतूय." याला कारण एकच. हा डॉक्टर आपल्याला नक्की बरं करणार ही श्रद्धा. 

आपल्याकडे येणारा पेशंट लवकरात लवकर बरा कसा होईल याच भावनेने पीआर त्याला तपासतात आणि औषधे देतात. बरं औषधं देताना भरमसाठ दिलीत असंही नाही. जेवढी गरजेची तेवढीच देणार. एमआरने सॅम्पल म्हणून दिलेली औषधे असतील तर एखादया गरीब पेशंटला तीच फुकट देऊन टाकणार. एखाद्या पेशंटकडे पैसे नसतील तर खुशाल पैसे न घेता "पुढच्या वेळी द्या" म्हणत त्याला जाऊ देणार. एखादा आजार दोन दिवसात बरा होणार असेल तर पेशंटला ते तसं स्पष्ट सांगतात. त्यासाठी त्याला उगाच दोन तीन दिवसांनी फॉलोअपला बोलावणे हा प्रकार अजिबात नसतो. बऱ्याचदा पेशंटला दोन दिवसात बरं वाटूनही जातं आणि 'डॉक्टर म्हणाले तेच बरोबर बरं का' अशा भावनेनं तो पुन्हापुन्हा येत राहतो. 

गेली पंचवीस एक वर्ष त्यांचा दवाखाना जुन्नरमधल्या ब्राह्मण बुधवार पेठ आणि सय्यदवाडा यांच्या सीमेवर आहे. सय्यदवाड्याच्या जवळ असल्याने साहजिकच मुसलमान पेशंट भरपूर असतात. मुसलमान स्त्रिया सहसा कुणासमोर आपला बुरखा उघडत नाहीत. पीआरसमोर मात्र त्यांना काहीही प्रॉब्लेम नसतो. कारण आहे डॉक्टरांवर असलेला विश्वास! आपल्या मुलाला/मुलीला डॉक्टर नक्की बरं करणार हा तो विश्वास आहे. 

पीआरची मला आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे त्यांचं शिट्टी वाजवणं आणि गुणगुणणं. पेशंट तपासता तपासता हा माणूस खुशाल शिट्टी वाजवत असतो. बरं ती शिट्टी काही हळू वगैरे नसते. चांगली जोरात असते. आता तर पेशंट लोकांनाही सवय झाली आहे. डॉक्टर गुणगुणत नसतील पेशंटलाही चुकल्यासारखे वाटत असावे. आदित्यमुळे माझे त्यांच्या घरीही येणेजाणे असते. घरी असतानाही पीआर मस्त शीळ घालत असतात. कधीकधी तर आदित्य, त्याची आई आणि मी काहीतरी गंभीर चर्चा करत असतो आणि पीआर मध्येच येऊन शिट्टी वाजवत आतल्या खोलीत जातात.    

डॉक्टर असले तरी पीआर श्रद्धाळू आहेत. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर त्यांच्या पहिल्या गाडीपासून ते आत्ता असलेल्या होंडा सिटीपर्यंत प्रत्येक गाडीवर पुढच्या काचेवर 'श्री' लिहिलेले असते. बाकी काहीच नाही. फक्त 'श्री'.  

पीआर म्हटलं की त्यांचा कंपाउंडर फारूकचा उल्लेख टाळता येत नाही. गेली कित्येक वर्षे फारूक त्यांच्याकडे काम करतोय. अगदी 'वन मॅन आर्मी' सारखं म्हटलं तरी हरकत नाही. डॉक्टरांना भेटायचं म्हणजे आधी फारुकला नमस्कार घालावा लागतो. अगदी आम्ही मित्रही आदित्यच्या घरी जाताना, "क्या फारुक, कैसे हो?" विचारल्याशिवाय वर जात नाही. तसं पाहिलं तर फारुक साधा कंपाउंडर पण पीआरने त्यालासुद्धा इतकी वर्षे जपलंय. आता त्यालाही वयपरत्वे काम जमत नाही. तरीही तो रोज जमेल तेवढा वेळ येऊन जातो. अनेक पेशंटलाही फारूक माहित असतो. त्यामुळे दवाखान्यात आलं की तेही फारुकची चौकशी केल्याशिवाय आत जात नाहीत. फारुकची जागा आता मनिषाने घेतली आहे. तीदेखील आपली जबाबदारी समर्थपणे निभावते आहे. 

डॉक्टर म्हटलं की लोक फोन करूनही सल्ला घेतात. काहीजण फोनवर औषधे विचारून दवाखान्यात येतच नाहीत. अशा महाभागांना बरेचदा फोन स्वतःच घेऊन पीआर "डॉक्टर बाहेर गेलेत" असं सांगून फोन ठेवून देतात. एकदोन वेळेस असं केलं की पेशंटलाही कळून चुकतं. 

लँडलाईनच्या जमान्यात बरेचदा रॉंग नंबरही येत. जुन्नरच्या भूषण हॉटेलचा असाच रॉंग नंबर पीआरकडे येत असे. रॉंग नंबर सांगूनही समोरचा माणूस ऐकत नसेल तर पीआर अनेकदा ऑर्डर घेऊन मोकळे व्हायचे. त्यानंतर तो फोन करणारा आणि भूषण हॉटेल यांच्यात काय संवाद होत असेल देव जाणे. 

स्वतः डॉक्टर असल्याने ते तब्येत सांभाळून असतात. रोजचे फिरणे कधीच चुकत नाही. अलीकडे कधी कंटाळा आलाच तर फिरायला जात नाहीत. आम्ही लहान होतो तेव्हा तर पंचलिंगाकडे पीआर आणि डॉ. निरगुडकर यांचे वेगात चालणे पाहण्यासारखे असे. अर्थात त्याचा फायदा दोघांनाही झाला.   

लोकांना डॉक्टर म्हणून माहित असलेले पीआर एक चांगले वाचकही आहेत. त्यांचं वाचन सतत सुरु असतं. चित्रपट आणि खेळातही ते रस घेतात. कित्येकदा आम्ही एकत्र क्रिकेट आणि टेनिसचे सामने पाहिलेले आहेत.  पाहताना पीआर आमच्यातलेच होऊन बोलत असतात. त्यावेळी मी डॉक्टर आहे किंवा आदित्यचा बाप आहे असा अविर्भाव कुठेही नसतो. देव आनंदचा ज्वेलथीफ त्यांनी पन्नास वेळा सहज पाहिला असेल. 

आता आदित्य त्यांचा वारसा पुढे नेतो आहे. पीआर स्वतः इतके यशस्वी डॉक्टर असताना आदित्यला स्वतःचा जम बसवायला सुरुवातीला अवघड गेले. अखेरीस तोही पीआरचाच मुलगा आहे. त्याचंही निदान त्यांच्या इतकंच अचूक आहे. (माझ्या दादांच्या हार्ट अटॅकचं निदान त्यानेच केलं होतं.) आदित्य जबाबदारपणे गाडा हाकतो आहे त्यामुळे आणि वयपरत्वे पीआरनी आता प्रॅक्टिस थोडी कमी केली आहे. जमेल तेवढी प्रॅक्टिस ते करतात आणि बाकीचा वेळ आपली नात रीवाबरोबर आणि वाचन करत घालवतात. 

काही माणसं अशी असतात की ती नकळतपणे आपल्या आयुष्यवर प्रभाव पाडून जातात. माझ्या मते प्रत्येकाचे फॅमिली डॉक्टर अशाच काही व्यक्तींपैकी एक असतात. त्या त्या पेशंटच्या बऱ्याच बाबी त्यांना माहित असतात. पेशंटही डॉक्टरांकडून वेळच्यावेळी मार्गदर्शन घेत असतात. म्हणूनच कदाचित त्यांना 'फॅमिली डॉक्टर' म्हणत असावेत. माझ्या बाबतीतही तसेच झाले. आज इतक्या वर्षांनी विचार करताना पीआरचा माझ्या आयुष्यातला थोडा का होईना वाटा नाकारता येत नाही. 

तुमच्या फॅमिली डॉक्टरबद्दल तुमचेही काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा.

Sunday, September 2, 2018

दळण

काल दळण पाहिलं. हो पाहिलंच.द मा मिरासदारांच्या एका कथेवर आधारित हे नाटक/एकांकिका आहे.

आधीही एकदा मी दळण पाहिलं होतं. साधारण चारेक वर्षांपूर्वी.काल एका मित्राला घेऊन गेलो. त्याची एकूण विचारसरणी आता परिचयाची झाली आहे.त्यामुळे त्याला आवडेल की नाही ही शंका होती. नाटक सुरू असताना मी बऱ्याचदा त्याच्याकडे बघत होतो. वेगवेगळ्या संवादांना, विनोदी पंचेसला त्याची काय प्रतिक्रिया येतेय यांच्याकडेही माझं लक्ष होतं.तो दिलखुलास हसत होता.दाद देत होता.ह्याला नाटकाला आणण्याचा आपला निर्णय योग्य ठरला याचा मला आनंद झाला.

चार वर्षानंतर दळण पाहताना मला त्याच्या सादरीकरणात कुठेही बदल जाणवला नाही. अमेय वाघ, आलोक राजवाडे,सिद्धेश पुरकर आणि अजून एक दोन जण हे दळणच्या पहिल्या फळीतले कलाकार सोडले तर बहुसंख्य कलाकार बदलले आहेत असे वाटते (कदाचित तसे नसेलही). असे असूनही इतक्या वर्षांनंतरही हे नाटक तेवढ्याच ताकदीने तुमच्या समोर येतं.

छोट्या गावातल्या शाळेत एक स्त्रीलपंट मास्तर येतो.त्याच्या त्या स्त्रीलंपटपणामुळे काय धमाल उडते हे नाटकात दाखवले आहे.

अमेय वाघ अभिनेता म्हणून आता बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. चित्रपटही केलेत. अमर फोटो स्टुडिओसारखं उत्तम नाटकही करतोय. या सगळ्या व्यापातून वेळ काढून तो दळण करतो याबद्दल त्याचं कौतुक वाटतं. दळणच्या प्रसिद्धीसाठी इंस्टाग्राम, फेसबुकवर वेगवेगळ्या कल्पक पोस्ट्स टाकून तो तरुणाईला हे नाटक पहायला येण्याचं आव्हान करत असतो.यातून त्याचं या नाटकावरचं प्रेम जाणवतं. बाकी मास्तरांच्या भूमिकेत तो जो काही बाजार उठवतो त्याला तोड नाही. "आईला म्हणावं मास्तरांनी बोलीवलंय." हा डायलॉग तो गेली दहा वर्षे त्याच टोनमध्ये म्हणतोय आणि प्रत्येक प्रयोगाला त्या डायलॉगसाठी टाळ्या आणि शिट्ट्या घेतोय.

आलोक राजवाडे शिवाच्या भूमिकेत रंग भरतो.सवांदफेकीची त्याची शैली टाळ्या घेत राहते. मास्तरांना हाक मारताना 'मास्तर' मधला 'मा' तो असा काही लांबवतो की प्रेक्षकांमध्ये फक्त त्या एका शब्दामुळे खसखस पिकते.

इतर कलाकार अमेय, आलोक यांना यथायोग्य साथ देतात.गंधारचं साधं पेटी आणि तबल्याचं संगीतही परिणामकारक गाण्यांमध्ये ठरतं. एकुणात हे नाटक ८० मिनिटे तुम्हाला धरून ठेवतं.

पुण्यात अधूनमधून या नाटकाचे प्रयोग होत असतात. वेळ मिळेल तेव्हा नक्की बघा.

Wednesday, August 29, 2018

श्रद्धा..

"ये किसका बॅग है?" एअरपोर्ट सिक्युरिटीला ड्युटीवर असलेल्या सीआयएसएफच्या माणसाने बेल्टवर स्कॅन होऊन आलेली एक बॅग हातात घेत विचारले.

"हमरा है जी." माझ्यासमोर उभ्या असलेल्या पन्नाशीतल्या एका बाईने आपली बॅग ओळखत उत्तर दिले.

"खोलो इसे. चेक करना पड़ेगा."

"क्या हुआ?" तिला बिचारीला कळेना नक्की काय झाले.

"खोलो तो पहले." त्याने पुन्हा फर्मावले.

तिने बॅगची चेन उघडली. त्याने वरुन  ढुंकून पहात काहीतरी शोधायचा प्रयत्न केला. ते बहुधा त्याला दिसले नसावे.

"इसमें लोहेका तुकडा है एक. ऐसे शेपका." हाताने इंग्रजी यु आकार हवेत काढत त्याने तिला सांगितले.

"हां हैं." तिने उत्तर दिले.

"उसे बाहर निकालो." बॅग तिच्याकडे सरकवत त्याने आदेश दिला.

तिने बॅगेत हात टाकून तो तुकडा बाहेर काढला. तो तुकडा म्हणजे घोड्याची नाल होती.

"यह अलाउड नही है ले जाना."

"काहे?" तिने भाबडेपणाने विचारले.

"अरे अलाउड नही बोले ना हम."

"बताओ अब क्या करे? इतने दूरसे लेकर आये थे हम.इससे भला हम क्या करेंगे? जाने दीजिये. बिनती करते है हम."

"अरे लेकिन यह लेकर नही जा सकते." त्याने पुन्हा सांगितले.

"हम कहाँ किसको मारनेवाले है.मंदिर गए थे नेपाल. वहासे लाये है बड़ी श्रद्धा से.महंगा भी है. ३०० में खरीदा था.और आप कह रहे यही रखो. भला ऐसे कैसे रखे?"

"साबसे बात करनी पड़ेगी." त्याने साहेबांकडे डोळे दाखवत सांगितले.

"अरे काहे साहब के पास भेज रहे हो.जाने दो.बिनती करते है.इससे भला हम क्या भी कर सकते है.भगवान की चीज है.श्रद्धा है हमारी बस और कुछ नही."

ही बाई घोड्याची नाल घेऊन तर आलीये.चेहऱ्यावरून साधी वाटतेय फारच. नाल तशीही देव्हाऱ्यात ठेवणार आहे. काय हरकत आहे असा विचार करत त्याने ती तिच्या उघड्या बॅगेत भिरकावली आणि म्हणाला,

"जाइये.श्रद्धा हमारी भी है बस यह नौकरी कभी कभी बीचमें आती है."

"बहुत धन्यवाद आपका." म्हणत तिने खुशीने बॅगची चेन लावली आणि आपल्या गेटकडे निघून गेली.

मी बाजूला उभा राहून गालात हसत आहे पाहून तो मला म्हणाला,

"क्या भी करे सर.सबको खुश रखना पड़ता है.बात आखिर श्रद्धा की है."

"जी बिलकुल." म्हणत मीही माझ्या गेटकडे चालू लागलो.

Tuesday, August 21, 2018

आंब्या

गेल्या वर्षी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने एका प्रकल्पांतर्गत शॉर्ट फिल्म महोत्सव भरवला होता. या महोत्सवासाठी मित्र संजय ढेरंगे याच्या 'आंब्या' ह्या शॉर्ट फिल्मची निवड झाली. निवडीचा आनंद साजरा करतोय तोच या महोत्सवात 'आंब्या' ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची बातमी आली. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, २५ हजार आणि भरभरून कौतुक एवढं सगळं आंब्याच्या वाटेला आलं. 

फिल्म पाहिल्यावर एका मित्राचे नाही तर एका दिग्दर्शकाचे कौतुक करावेसे वाटले. बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात लहान मुले पडण्याच्या घटना आपल्याकडे नवीन नाहीत. कित्येकदा बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या मुलाची अमुक तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका अशा बातम्या वर्तमानपत्रात येत असतात. आपणही त्या वाचतो आणि सोडून देतो. पण अशाच एखाद्या खड्ड्यात पडलेल्या मुलाच्या आईवडीलांची काय अवस्था होत असेल हा विचार क्वचितच आपल्या मनाला शिवतो. सरकारी पातळीवरदेखील याकरता फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. मग एखाद्या फिल्मच्या माध्यमातूनच हा विषय का मांडू नये अशा विचाराने संजयने ही फिल्म बनवली आहे. 

ऊसाच्या शेतात काम करताना चार सहा ऊसच एकत्र करून त्याची आपल्या बाळासाठी झोळी बनवणे, मुलाला यात्रेत खर्च करण्यासाठी १० रुपये दिले म्हणजे आपण खूप पैसे दिल्यासारखे वाटणे, मुलाच्या दोन्ही पायांत वेगवेगळ्या चपला असणे, यात्रेत गेल्यावर त्याने भेळीच्या गाडीवर ठेवलेल्या शेव, कुरमुऱ्यांच्या पिशवीवर फक्त हात फिरवणे असो, गोडीशेव खरेदी न करता फक्त ती केवढ्याला आहे असे विचारणे असो, या सगळ्या फ्रेम्समधून ऊसकामगारांची सध्या अवस्था किती बिकट आहे हेही संजयने दाखवले आहे. 

एक दिग्दर्शक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा किती बारकाईने विचार केला असेल हे जाणवत राहते. फिल्मच्या शेवटच्या फ्रेममध्ये वापरलेले पार्श्वसंगीत अंगावर काटा आणते. कमी वेळात जास्तीत जास्त परीणामकारक संदेश देणे हा मुळात कुठल्याही शॉर्ट फिल्मचा गाभा असतो. संजयच्या ह्या फिल्मने ते योग्यप्रकारे साधले आहे. नुकतीच ही शॉर्ट फिल्म युट्युबवर उपलब्ध झाली आहे. तुमच्या बिझी शेड्युलमधून ८ मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा. नक्की आवडेल. 

https://www.youtube.com/watch?v=JNjBRGm4lg0&t=2s

Thursday, August 16, 2018

अटलजी

जेव्हा कळू लागलं तेव्हा देशाच्या राजकारणात अटलजींचा दबदबा होता.त्याचवेळी महाराष्ट्र आणि दिल्लीत भाजप पकड घेऊ लागला होता.एखाद्या नेत्याने पंतप्रधान व्हावं असं मला पहिल्यांदा वाटलं ते अटलजींच्या बाबतीत.

त्यांची भाषणं लोकसभेत आणि प्रचार सभांमधूनच ऐकायला मिळाली. काय ते वक्तृत्व, काय ते हिंदी भाषेवरचे प्रभुत्व, टीका पण अशी की समोरच्याला वर्मावर लागणार पण तो दुखावणार मात्र नाही. विरोधकही त्यांना मनापासून दाद देत असत. आजवर अनेक नेते झाले. बोलताना कधी ना कधी या ना त्या नेत्याचा आपण एकेरीत उल्लेख करतो. अटलजींच्या बाबतीत मात्र हे कधीच झाले नाही. त्यांचा उल्लेख कायम आदराने 'अटलजी' असाच करण्यात येतो. 

त्यांचं १३ दिवसांचं सरकार पडल्यावर अनेकांना वाईट वाटलं. काय झालं होत नेमकं हे माझ्या बालबुद्धीला समजले नाही पण वाईट मात्र खूप वाटले. त्यानंतर पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अणूचाचण्या केल्या. त्यावेळी अमेरिका आणि जपानसारख्या देशांनासुद्धा त्यांनी भीक घातली नव्हती. या अणूचाचण्यांचा मला काय फायदा झाला असेल तर त्यावर भाषण करायची संधी मिळाली. त्यावेळी शाळांमधून विविध पातळीवर घेतल्या गेलेल्या भाषण स्पर्धांमध्ये अणूचाचण्यांचा विषय हमखास असे. परीक्षांमध्ये निबंधालाही विषय असे. भाषण केले असल्याने निबंध लिहायला फारशी अडचण येत नसे.

अलीकडे भाजपच्या पोस्टर्स वरून त्यांची छबी सोयीनुसार वापरली किंवा काढून टाकली जाते..त्याबद्दल एखादी बातमी वगैरे येत असते. आता मात्र भाजपच्या प्रत्येक पोस्टर वर त्यांची छबी झळकेल अशी आशा आहे.

भारतीय राजकारणातील एक पर्व संपले.श्रद्धांजली..💐💐

Saturday, August 11, 2018

बॉर्डर आणि गुंड कुटूंब

काल सुनील शेट्टीचा वाढदिवस झाला. सुनील शेट्टी आवडणारी माणसं तशी विरळाच. मीही सुनीलचा चाहता वगैरे नाही. मात्र त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका मित्राबरोबर बोलताना त्याच्या बॉर्डर या चित्रपटाची आठवण झाली आणि मन भूतकाळात गेलं.

बॉर्डरशी माझं नातं खूप वेगळं आहे. माझ्या वडिलांबरोबर पाहिलेला  माझ्या आयुष्यातला हा पहिला चित्रपट आहे. आईदादा साधारण ७७ साली जुन्नरला आले. तेव्हापासून ते २०१३ पर्यंतच्या जुन्नरच्या वास्तव्यात दादांनी थेटरात पाहिलेला हा एकमेव चित्रपट. आम्ही भावंड कधीतरी जात असू चित्रपट पहायला.बऱ्याचदा शाळेतूनही आम्हाला चित्रपट दाखवला जात असे.दादांबरोबर चित्रपट पहायची वेळ मात्र कधी आली नव्हती.

बॉर्डर आल्यावर माझ्या काही मित्रांनी तो पाहिला. शाळेत कधीतरी बोलताना त्यांनी तो भारी असल्याचं सांगितलं. मग मीही दादांकडे हा चित्रपट पहायचा म्हणून हट्ट धरला.एरवी कधीही न बधणारे दादा त्यावेळी मात्र कसे प्रसन्न झाले माहीत नाही. कदाचित भारत पाकिस्तान युद्धावर आधारित असल्याने त्यांनी होकार दिला असेल.

चित्रपट सगळ्यांनी जाऊन बघू असे बहुधा ताईने सुचवले.दादांनीही ते मान्य केले.त्यावेळी ऑनलाइन तिकीटविक्री वगैरे काही नव्हतं.त्यावेळीच काय,आजही जुन्नरला अनेकजण थेटरला जाऊनच तिकीट घेतात.

आम्ही रात्री नऊच्या शोला जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे जुन्नरच्या शेवंता थेटरला पोहोचलो. मी आणि दादा तिकीट खिडकीकडे गेलो.तिथे आधीच लाईनला उभे असलेले कल्याण पेठेतले दोन-तीन जण दादांना पाहून तोंड लपवून पळून गेल्याचे आठवते. दादांना पाहताच आत असलेले मॅनेजर ईनामदार बाहेर आले.

"साहेब बाहेर थांबू नका.आतमध्ये या तिकीट घ्यायला." म्हणत आम्हाला आतमध्ये घेऊन गेले.

दादांना कधी थेटरची वाट माहीतच नव्हती. त्यामुळे त्यांना तिथे पाहून मॅनेजर ईनामदारांनासुद्धा आश्चर्य वाटले.चित्रपट कसा आहे हे दादांना माहीत असणे शक्यच नव्हते. ईनामदारांनी चित्रपट चांगला असल्याचे दादांना सांगितल्याचे मला आजही ठळकपणे आठवते.

बॉर्डर एक चित्रपट म्हणून उत्तमच होता.त्या दिवशी तो पाहताना मजा आलीच.मात्र आज इतक्या वर्षानंतर आजही बॉर्डर कधीही टीव्हीवर लागला तरी चॅनेल बदलावेसे वाटत नाही.त्यातले 'संदेसे आते है' गाणं तर आजही कित्येकांच्या मनात घर करून आहे. इतकं लांबलचक गाणं असूनही ते ऐकताना कंटाळा येत नाही.

पुढे काही वर्षांनी दादांनी टू इन वन टेपरेकॉर्डर घेतला. त्यावेळी माझा हट्ट म्हणून त्यांनी ए साईडला येस बॉस आणि बी साईडला बॉर्डरची गाणी असलेली कॅसेट घेतली.ती अगदी अलिकडेपर्यंत माझ्या संग्रहात होती.

पुढे पुण्यात आल्यावर आई दादांबरोबर बरेच चित्रपट पाहिले. दादांबरोबर पाहिलेला पहिला चित्रपट म्हणून बॉर्डरची आठवण मात्र कायम राहील.

Monday, July 30, 2018

हाऊस ऑफ हायलाईट्सचा स्वप्नवत प्रवास

जुलै २०१४ मध्ये मायामी हिट संघाचा स्टार खेळाडू लेब्रॉन जेम्स क्लिव्हलँड कॅव्हेलियर्सबरोबर करारबद्ध झाला. मायामी हिटकडून खेळताना त्याने या संघाला एनबीएची दोन विजेतेपदं मिळवून दिली. याचदरम्यान एक मुलगा या संघाचा कट्टर समर्थक बनला. ओमर राजा त्याचं नाव. लेब्रॉन हिट सोडून गेल्यानंतर तो निराश झाला. यातूनच त्याने मायामी हिटच्या सामान्यांचे हायलाईट्स पहायला सुरुवात केली. हे हायलाईट्स पाहताना एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. ओमर आणि त्याचे मित्र मायामी हिटच्या सामन्यांतील काही क्षणांची वारंवार चर्चा करत. मात्र त्या क्षणांचे व्हिडीओ युट्युब, ईसपीएन यापैकी कुठल्याच वेबसाईटवर उपलब्ध नव्हते. आपल्या मित्रांबरोबर चर्चा करत असलेल्या या क्षणांचे व्हिडीओ कुठे ना कुठे तरी सापडतील या आशेतून ओमर कित्येक तास इंटरनेटवर घालवत असे. एक महिनाभर असे केल्यानंतर 'आपणच हे का करू नये?' असा विचार त्याच्या डोक्यातून आला. या विचारातूनच ऑगस्ट २०१४ मध्ये जन्म झाला हायलाईट फॅक्टरी या इंस्टाग्राम अकाउंटचा. आठवड्याभरातच ओमरला हे नाव नको असे वाटले म्हणून त्याने ते बदलून नाव ठेवले, 'हाऊस ऑफ हायलाईट्स'. तिथून सुरु झाला एक स्वप्नवत प्रवास. 

हाऊस ऑफ हायलाईट्स सुरु केले तेव्हा ओमर फ्लोरिडामध्ये विद्यार्थीदशेत होता. सुरुवातीला स्वतः तयार केलेल्या क्लिप्स आपल्या अकाऊंटवरून शेअर केल्यानंतर ओमरने लोकांकडून व्हिडीओ स्वीकारणे सुरु केले. ही कल्पना तात्काळ यशस्वी झाली. ओमरला इंस्टाग्रामवर रोज २००-३०० मेसेज येऊ लागले. प्रत्येक मेसेजमध्ये येणारा व्हिडीओ ओमर स्वतः पाहून मगच हाऊस ऑफ हायलाईट्स वर अपलोड करू लागला. हळूहळू हाऊस ऑफ हायलाईट्स लोकप्रिय होऊ लागले. सुरुवातीला शेकडोमध्ये फॉलोअर्स असणाऱ्या या अकाउंटला आता हजारोंनी फॉलोअर्स मिळू लागले. अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीने ओमर खुश होता. साधारण सात आठ लाख फॉलोअर्स असताना २०१६ मध्ये ब्लिचर रिपोर्ट या प्रसिद्ध वेबसाईटचे लक्ष हाऊस ऑफ हायलाईट्सकडे गेले. ओमर अजूनही शिकतच होता. तो ग्रॅज्युएट होण्याआधीच ब्लिचर रिपोर्टने त्याला हाऊस ऑफ हायलाईट्स विकत घेण्याची ऑफर दिली. शिवाय हे अकाउंट ब्लिचर रिपोर्टसाठी त्यानेच चालू ठेवावे असे सांगून त्याला नोकरीही दिली. 

इंस्टाग्रामवर हे अकाउंट सुरु केल्यापासून ओमरने एकही दिवस सुट्टी घेतली नाहीये. ओमर रोज सकाळी साधारण ८ वाजता उठतो. उठल्या उठल्या सगळ्यात आधी तो आपले दोन फोन चेक करतो. ओमरच्या सहा सात तासांच्या झोपेच्या अवधीमध्ये त्याला हजारो नोटिफिकेशन्स आलेले असतात. उठल्यापासून ते मॅनहॅटनमधील आपल्या ऑफिसला जाईपर्यंत त्याला आलेले प्रत्येक नोटिफिकेशन वाचतो, त्यातले नको ते डिलीट करतो. रात्रीतून ओमरला इंस्टाग्रामवर साधारण ७००-७५० मेसेज आलेले असतात. ऑफिसला पोहोचून तो त्याला आलेला प्रत्येक मेसेज पाहतो आणि गरज पडेल तिथे रिप्लाय देखील करतो. जिथे जाईल तिथे ओमर हाऊस ऑफ हायलाईट्सचे काम करत असतो. अगदी चित्रपटगृहात देखील व्हिडीओ क्लिप एडिट करून त्याने अपलोड केल्या आहेत. ओमरच्या ऑफिसमध्ये २ टीव्ही आहेत. प्रत्येक टीव्हीवर किमान ३ सामने सुरु असतात. म्हणजे एका वेळी ६ सामने पाहत ओमर आपले काम करत असतो. ओमरच्या मदतीला चार जणांची टीम आहे. मात्र आजही हाऊस ऑफ हायलाईट्सवर अपलोड होणारा प्रत्येक व्हिडीओ ओमरने ओके केल्याशिवाय अपलोड होत नाही. 

ब्लिचर रिपोर्टने टेक ओव्हर केल्यापासुन हाऊस ऑफ हायलाईट्सचे फॉलोवर्स साधारण दिवसाला १२,००० या वेगाने सतत वाढतच आहेत. नुकतेच या पेजचे १ कोटी फॉलोअर्स झाले. यामध्ये अगदी लेब्रॉन जेम्स, द रॉक, स्टेफ करी, रोनाल्डो यांसारखे दिग्गज देखील आहेत.

३० जुलै २०१८ रोजी फॉलोअर्सची संख्या 
हाऊस ऑफ हायलाईट्स - १ कोटी 
ईसपीएन - १ कोटी ४ लाख 
स्पोर्ट्ससेंटर - १ कोटी २० लाख 

हाऊस ऑफ हायलाईट्सच्या व्हिडीओजला ईएसपीएन आणि स्पोर्ट्ससेंटर सारख्या नावाजलेल्या अकाउंट्सपेक्षा जास्त हिट्स मिळत आहेत. 

जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलेल्या लोकांना काही कारणास्तव एखादा सामना बघता आला नाही तर त्यातील नेमक्या क्षणांचे व्हिडीओज हाऊस ऑफ हायलाईट्सवर नक्की उपलब्ध असतात. सुरुवातीला अमेरिकन फुटबॉल आणि एनबीए या खेळांवर लक्ष असलेल्या या पेजने आता इतरही खेळांचे व्हिडीओ पुरवायला सुरुवात केली आहे. या पेजची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे सामने प्रत्यक्ष पाहणारे प्रेक्षकच ओमरला त्यांनी रेकॉर्ड केलेले व्हिडीओ पाठवतात. त्यातील योग्य ते व्हिडीओ थोडेफार एडिटिंग करून हाऊस ऑफ हायलाईट्सवर अपलोड केले जातात. 

ब्लिचर रिपोर्टबरोबर काम करायला सुरुवात केल्यापासून ओमरला त्यांचे कंटेंटदेखील वापरता येऊ लागले आहे. नुकतेच हाऊस ऑफ हायलाईट्सचे ट्विटर हँडल आणि युट्युब चॅनेलही सुरु झाले आहे. कुठलीही जाहिरात न करता त्यांचे ट्विटरवर ३८,००० आणि युट्युबवर २,६०,००० सबस्क्रायबर्स आहेत. अजूनही ओमर व्हिडिओजवर काम करत असला तरी इथून पुढे ब्लिचर रिपोर्टसाठी वेगवेगळे कंटेंट बनवण्याची त्याची मनिषा आहे. मी स्वतः हे पेज सुरु झाल्यापासून फॉलो करत आलोय. हाऊस ऑफ हायलाईट्सची एकही पोस्ट मिस करण्याजोगी नसते. तुम्हीही दर्दी क्रिडारसिक असाल तर इंस्टाग्रामवर हे पेज नक्की फॉलो करा. 

Thursday, July 26, 2018

काटेकर

जरा उशीरच झाला पण काल सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन पाहून संपवला. नवाझुद्दीन, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, राधिका आपटे असे बाप लोक असताना ही मालिका विशेष असणार यात शंका नव्हती. ट्रेलर पाहून ज्या अपेक्षा वाढल्या होत्या त्या संपूर्ण सिझन पाहिल्यानंतर पूर्णदेखील झाल्या. 

सैफ अली खानने रंगवलेल्या सरताज सिंग ह्या पोलिस अधिकाऱ्याला येणाऱ्या एका निनावी फोनवरून मालिकेचे सारे कथानक उलगडत जाते. मालिकेचे कथानक मुंबईत घडल्याचे दाखवल्याने अनेक पात्रे मराठी आहेत. या सगळ्यांत सरताज सिंगबरोबर असणारा हवालदार काटेकर मला भावला. काटेकरची भूमिका मराठी अभिनेता जितेंद्र जोशीने केली आहे. भूमिकेचे सोने करणे म्हणजे काय हे जितूने या भूमिकेतुन दाखवून दिले आहे. 

वेब सिरीजमध्ये सेन्सॉरचा प्रश्न येत नसल्याने आणि अंडरवर्ल्डशी निगडीत कथानक असल्याने ह्या मालिकेत शिव्यांचा भरणा आहे. काहीतरी धक्कादायक घडणे, आपल्या नको असलेली गोष्ट करावी लागणे, न आवडणारा माणूस अचानक समोर येणे, आश्चर्याचा धक्का बसणे या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी काटेकर एकच वाक्य वापरत असतो. ते वाक्य म्हणजे, 'आई झवली'. हे वाक्य बोलण्याची त्याची स्टाईल इतकी बाप आहे ना की पाहणाऱ्याला काटेकर म्हणजे आपणच आहोत की काय असे वाटून जाते. आपल्यातले अनेकजण रोजच्या व्यवहारात बोलताना शिव्यांचा सर्रास वापर करतात. मी देखील मित्रांबरोबर बोलताना शिव्या वापरतो. बोलत असताना वर लिहिलेल्या गोष्टींना प्रतिक्रिया म्हणून अशाच काही शिव्या वापरल्या जातात. त्यातलीच ही 'आई झवली' असल्यामुळे कदाचित काटेकर माझ्यासारख्या अनेकांना आपला वाटला. 

सरताजसाठी काम करणारा काटेकर आपल्या बायकोपेक्षा आपल्या कामाशी आणि साहेबांशी जास्त बांधील आहे. एका प्रसंगात बायकोबरोबर श्रुंगार करणारा काटेकर सरताज साहेबांचा फोन आला म्हणून तसाच उठून ठाण्यात जातो तेव्हा त्याची कामावरची निष्ठा दिसून येते. आपल्या पोलिसाच्या नोकरीमुळे आपल्या बायकामुलांना वेळ देता येत नाही म्हणून त्याचे मन त्याला खाते. मात्र तक्रार न करता काटेकर कर्तव्य बजावण्याला प्राधान्य देतो. आपल्या साहेबाच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या तणावामुळे वाईट वाटून साहेबाने बायकोशी पुन्हा एकदा जुळवून घ्यावे म्हणून तो साहेबाची विनवणी देखील करतो. एका केसमध्ये साहेबाची बाजू बरोबर असूनही त्याचा बकरा केला जातोय हे लक्षात येऊन त्याला वाईटही वाटते. मात्र भ्रष्ट व्यवस्थेमध्ये हे असेच चालू राहणार असे सांगत तो साहेबाची समजूतही काढतो. साहेबाचे नशीब फळफळावे म्हणून त्याला एक मोठी केस मिळणे कसे गरजेचे आहे हे त्याला सांगत राहतो. तणावाच्या वेळी एखादं हलकंफुलकं वाक्य बोलून साहेबाचा आणि स्वतःचा मूडही ठीक करतो. बाकी स्टारकास्ट इतकी तगडी असताना, भूमिका फारशी महत्वाची नसतानादेखील काटेकर प्रेक्षकांना आपला वाटतो. म्हणूच संपूर्ण मालिकेत साईड रोल करणारा काटेकर मालिका संपल्यानंतरही लक्षात राहतो.

मागे जितेंद्रचे दोन स्पेशल पाहिले तेव्हा त्याच्याबद्दल लिहिले होते. आज काटेकर पाहून पुन्हा एकदा त्याच्याबद्दल लिहावेसे वाटले. ही संपूर्ण मालिकाच कशी भारी आहे हे अनेकांनी लिहिले आहे, म्हणून त्याबद्दल लिहिण्यात अर्थ नाही. अजून पाहिली नसेल तर नक्की पहा. काटेकर नक्की आवडेल. 

Sunday, July 15, 2018

तू दारू नाय पिली तर घाबरतो कशाला?

परवा एका नातेवाईकाला पोहोचविण्यासाठी एअरपोर्टला गेलो होतो. इंटरनॅशनल फ्लाईट असल्याने पाहुण्यांना सोडून माघारी यायला १:३०-२:०० झाले. त्यातच मानखुर्दजवळ एवढ्या रात्रीही ट्रॅफिक जॅम झालं. इतक्या रात्री ट्रॅफिक का याची चौकशी केल्यावर कळलं की पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. शुक्रवारची रात्र असल्याने पार्टी करून येणाऱ्या तळीरामांना धरून त्यांची तपासणी करण्याचं काम चाललं होतं. हळूहळू आमचीही गाडी पुढे सरकत होती. आमच्या गाडीच्या पुढे असणारी गाडी पोलिसांच्या समोर गेली. गाडीत २-३ तरुण असल्याचे मागून दिसले. ते पिऊनच आले होते. पोलिसांनी त्यांना गाडीतून बाहेर यायला सांगितले. ब्रेथ अॅनालायझर पुढे करून एक पोलीस तरुणाला म्हणाला,

"ह्याच्यात फुक मार."

तो तरुणही या असल्या तपासण्यांमध्ये तयार असावा. त्याने फुंकण्याच्या ऐवजी हवा आत घेतली.साहजिकच पोलिसाला काही सिग्नल मिळाला नाही.

"अरे आत वढू नको.फुक त्याच्यात." पोलिसाने त्या तरुणाला पुन्हा सांगितले.

त्याने पुन्हा एकदा हवा आतच ओढली.पुन्हा काही सिग्नल मिळाला नाही. पोलिस वैतागला. 

"अरे बाळा, हवा आत नको ना वढू. ह्याच्यात फुक मार.तू दारू नाय पिली तर घाबरतो कशाला?"

"अहो मी तेच करतोय मामा.नाय जमत तर काय करू. तुम्ही दाखवा एकदा." तरुणाने पोलिसाला विनंती केली.

पोलिसानेही लगेच त्याच्या हातातून ब्रेथ अॅनालायझर घेत त्यात फुंकर मारली. त्याने फुंकर मारताच अॅनालायझरचा अलार्म जोरात वाजला. तो वाजताच ते तरुण हसायला लागले. पोलिसाचा जोडीदार असलेला दुसरा पोलिस डोक्यावर हात मारत म्हणाला,

"तू कशाला आय घालायला फुकला का त्याच्यात?"

"आयला राव माझ्या लक्षातच आलं नाही. आता काय करायचं?"

"काय करतो आता.सोड त्याला. इथून पुढं आपली गप्प घाला."

"जा बाबा." म्हणत त्या पोलिसाने तरुणांना जायची परवानगी दिली. 

आपली युक्ती यशस्वी झाल्याचे कळून ते तरुणही खुशीत पुढे निघून गेले.

Monday, July 2, 2018

मराठी भाषका जागा हो! इंटरनेटचा धागा हो!!

मराठी भाषका जागा हो!  इंटरनेटचा धागा हो!!

आज गुगल सर्च संमेलनाला हजर राहण्याची संधी मिळाली. पुण्यात नोंदणी करायला एक दिवस उशीर झाल्याने इंदोरमधल्या संमेलनासाठी नोंदणी केली.


सध्या भारताकडे सगळेच उद्योग एक आगामी बाजारपेठ म्हणून बघत आहेत. गुगलही त्यापैकीच एक. इंटरनेटचा वापर वेगाने वाढणाऱ्या देशांमध्ये भारताचा नंबर बराच वर लागतो. यातही पहिल्यांदा इंटरनेटचा वापर करणारे लोक भारतामध्येच जास्त आहेत. या सगळ्या लोकांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी गुगलचा हा खटाटोप सुरू आहे.

इंग्रजी वाचणाऱ्या, इंग्रजीमध्ये गुगल सर्च करणाऱ्या लोकांची संख्या आता फारशी वाढणार नाही हे गुगलने वेळीच ओळखून आता आपला मोर्चा प्रादेशिक भाषांकडे वळवला आहे. यातही हिंदी, तामिळ, बंगाली आणि तेलगू या भाषांना त्यांनी प्रथम पसंती दिली आहे. हळूहळू इतरही भाषांकडे ते वळणार आहेत. आपली वेगवेगळी उत्पादने या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी गुगल आता प्रयत्नशील आहे. यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये लिहिणाऱ्या, किंवा प्रादेशिक भाषांमध्ये लिहिलेला मजकूर प्रकाशित करणाऱ्या लोकांची मदत घ्यायची असे त्यांनी ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील ११ शहरांमध्ये गुगल सर्च संमेलन भरविण्यात आले आहे. लक्षात घ्या, जे गुगल एकेकाळी भारताला खिजगणतीतही धरत नसे, तेच गुगल आता भारतीय प्रादेशिक भाषांसाठी पायघड्या घालत आहे ही फार मोठी गोष्ट आहे. 

गुगलची सर्च आऊटरिच टीम या शहरांमध्ये जाऊन तिथल्या प्रादेशिक भाषांमधील 'कंटेंट क्रिएटर्स'ना भेटते आहे.एक दिवसाच्या या वर्कशॉपमध्ये गुगल सर्च नक्की कसे काम करते? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे नक्की काय? ते करत असताना काय करावे आणि काय करू नये या विषयांवर पहिल्या सत्रात माहिती देण्यात आली..

त्यानंतर गुगलचे येऊ घातलेले उत्पादन 'क्वेश्चन हब' याविषयी माहिती देण्यात आली. इंटरनेटवर लोक काय शोधत आहेत? कोणत्या प्रश्नांची उत्तरे गुगलवर उपलब्ध नाहीत? हे या 'क्वेश्चन हब'मार्फत गुगल आपल्या पार्टनर्सला कळविते. मग हे पार्टनर्स त्या त्या प्रादेशिक भाषेमध्ये ती माहिती लिहून प्रकाशित करतात. सध्या हे उत्पादन हिंदी ह्या भारतीय आणि बहासा या इंडोनेशियामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेत उपलब्ध आहे.

मोबाईल इंटरनेटकर्त्यांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेऊन बऱ्याच वेबसाईट्स आता मोबाईल फ्रेंडली व्हर्जनसुद्धा आणत आहेत. या मोबाईल फ्रेंडली वेबसाईट्स तयार करताना काय दक्षता घेतली पाहिजे यावरही एक सत्र पार पडले. (भारतात एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ९९% लोक आपल्या मोबाईलवर इंटरनेट वापरतात.) 

या संमेलनामध्ये सहभागी लोकांसाठी सर्वाधिक आवडता विषय होता गुगल अॅडसेन्स. या उत्पादनाद्वारे गुगल तुमच्या वेबसाईटवर काही जाहिराती दाखवते. तुमच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या लोकांनी या जाहिरातींवर लोकांनी क्लिक केले की तुम्हाला पैसे मिळतात असा साधा फंडा. कोणत्याही वेबसाईटवर अॅडसेन्सद्वारे जाहिराती दाखवणे वाटते तितके सोपे मात्र नाही. अॅडसेन्ससाठी नोंदणी करणाऱ्या केवळ १०-१२% वेबसाईटला गुगलची परवानगी मिळते.ही परवानगी मिळाल्यानंतरही गुगलने घालून दिलेले नियम पाळावे लागतात. कृत्रिम क्लिक्स, रोबोटचा वापर असे प्रकार आढळल्यास गुगल तुमच्या वेबसाईटला कायमचे बाद करू शकते. एखाद्या भाषेतील अधिकाधिक वेबसाईट्सने असेच गैरप्रकार केले तर गुगल त्या भाषेतील अॅडसेन्ससाठीचा सपोर्ट बंदही करू शकते. त्यामुळे अॅडसेन्स वापरताना काय दक्षता घेतली पाहिजे हेही गुगलच्या लोकांनी सांगितले.

सध्या अॅडसेन्स फक्त इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध आहे. मराठीमध्ये कधी येणार असे विचारले असता आम्ही त्यावर काम करत आहोत आणि लवकरच आम्ही मराठीसाठी देखील अॅडसेन्स लाँच करू असे सांगण्यात आले. मराठीआधी इतर भाषांना प्राधान्य का? असा प्रश्न विचारल्यावर, इतर भाषांमध्ये मराठीपेक्षा जास्त प्रमाणात कंटेंट क्रिएशन  होते. तामिळ, तेलगू वापरकर्ते त्यांच्या भाषेत लिहितात, गुगल सर्च करतात. त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले असे सांगण्यात आले.

मित्रांनो म्हणूनच मराठीमध्ये कंटेंट क्रिएशनची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मराठी भाषकांची संख्या देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब दिलासा देणारी असली तरी नुसतं मराठी बोलून भागणार नाही तर मराठीत लिहावे सुद्धा लागणार आहे.तरच इतर प्रादेशिक भाषांसमोर आपण टिकू शकणार आहोत. मराठी आणि हिंदी भाषांची लिपी देवनागरी असल्याचा फटका नकळतपणे मराठीला बसतोय असे मला वाटते.जवळपास सगळ्याच मराठी भाषकांना, वाचकांना हिंदी बोलता आणि वाचता येते.त्यामुळे शोधत असलेली माहिती हिंदीमध्ये उपलब्ध असली तरी आपण त्यावर समाधान मानतो आणि शांत बसतो. भारतातील सर्वाधिक इंग्रजी भाषक महाराष्ट्रामध्ये नोंदवले गेले आहेत. इंग्रजी आपली मातृभाषा आहे असे सांगितलेल्या २.६ लाख लोकांपैकी जवळपास १ लाख लोक महाराष्ट्रातील आहेत. इथे मात्र आपण तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांना मागे टाकले आहे. विकिपीडियानेदेखील आपले लेख प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. तिथेही सध्या हिंदी आणि तामिळ भाषेत सर्वाधिक लेख उपलब्ध आहेत.तेलगू आणि बंगाली भाषांनी तिथेही आपल्याला मागे टाकले आहे. 

इतर राज्यांतले लोक आपल्या भाषेचा अभिमान बाळगत त्यांच्या इंटरनेटवरील रोजच्या बोलण्यात, लिहिण्यात आपली मातृभाषा वापरत असताना आपण त्यात मागे राहतोय की काय अशी शंका येतेय. आत्ताच यावर कृती केली नाही तर असेच सतत वाट पाहत बसावे लागेल. म्हणून मित्रांनो इथून पुढे इंटरनेटवर लिहिताना, बोलताना, वाचताना मराठीचा जास्तीत जास्त वापर करा आणि इतरांनाही सांगा. भविष्य इंटरनेटवर बेतलेलं असताना तिथे मराठी मागे रहायला नको ही काळजी आपण नाही तर अजून कुणी घ्यायची?  

Saturday, March 17, 2018

शिक्षक आणि त्यांचे पेटंट डायलॉग

शाळेत किंवा कॉलेजात असताना बरेच शिक्षक आपल्याला शिकवून जातात.यातून काही शिक्षक त्यांच्या शिकविण्याच्या उत्तम पद्धतीसाठी, काही जण त्यांच्या विद्यार्थीप्रियतेसाठी शाळा,कॉलेज सोडल्यानंतरही बरीच वर्षे आपल्या लक्षात राहतात. काही शिक्षक त्यांच्या बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे लक्षात राहतात. माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील अशाच काही शिक्षकांबद्दल थोडेसे.

संस्कृतचे डुंबरे सर त्यांच्या अचूक व्याकरणासाठी जसे प्रसिद्ध होते तसेच एक दोन वाक्ये बोलली की "इकडे लक्ष द्या!" असे एका ठराविक टोनमध्ये म्हणण्यासाठी देखील प्रसिद्ध होते. आम्ही आठवीत जाण्यागोदरच ते निवृत्त झाले होते. त्यांच्या संस्कृतच्या शिकवणीला मात्र मी जात असे. आज इतक्या वर्षांनंतरही सरांचे "इकडे लक्ष द्या" कानात जसेच्या तसे ऐकू येते.

मराठी आणि इतिहास शिकविणाऱ्या थोरात बाईंना शिकवताना  'विशेषतः' आणि 'या ठिकाणी'  हे शब्द वापरण्याची सवय होती. शिकविण्याच्या ओघामध्ये त्या बरेचदा हे दोन शब्द वापरत असत. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर त्यांचा तास असेल आणि कंटाळा आला की आम्ही, आज बाई किती वेळा विशेषतः आणि किती वेळा या ठिकाणी हे शब्द म्हणाल्या याची मोजदाद करत असू.

गणिताचे कापसे सर त्यांच्या खुसखुशीत बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते..एखाद्या विद्यार्थ्याला ओरडताना,"तुला काही कळते का? योग्य धोरणाने, विचार करत काम करावे."असा सल्ला त्यांना द्यायचा असे. तो देताना ते त्यांच्या ठराविक शैलीमध्ये, "ए कळतं कै..धोरण धर धोरण." असं म्हणत. त्यांचा हा डायलॉग विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होता. इतका की बरेच जण बोलताना एकमेकांना "ए धोरण धर." असे म्हणत. मलाही सवय होती असे म्हणायची. एकदा घरी काहीतरी करत असताना मी चुकलो आणि दादा मला म्हणाले, "धोरण धर धोरण." दादांचं ते बोलणं ऐकून माझी हसून पुरेवाट झाली.

भूगोलात बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती असते.अमुक प्रदेशात अमुक प्रकारची जमीन, तमुक प्रदेशात तमुक प्रकारचे वृक्ष असे बरेच काय काय असते. हे शिकवताना भूगोलाच्या पिसे सरांना वाक्याचा शेवट 'पहावयास मिळते' या शब्दांनी करायची सवय होती. कधी कधी लागोपाठ पाच सहा वाक्यांचा शेवट 'पहावयास मिळते'ने होत असे. सरही त्याअगोदरचे वाक्य बोलून एक छोटा पॉज घेत आणि विद्यार्थी नेमके त्याचवेळेस सरांसोबत एकसुरात पहावयास मिळते असे म्हणून वाक्य संपवत. एकदा या एकसुरात पहावयास मिळते म्हणायचा अतिरेक झाला. सर चिडले आणि पहिल्या बाकापासून सगळ्यांना बडवायला सुरुवात केली. माझं नशिब चांगलं म्हणा किंवा अजून काही, माझ्यासमोरच्या बाकापर्यंत येऊन सर थांबले आणि पाठीमागे बसणारे आम्ही ५-६ जण मारापासून वाचलो. 

गणिताचे ढोले सर गणित सोडवायला देत आणि मग एकेक विद्यार्थ्याने सोडवलेले गणित तपासत बाकांच्या रांगांमधून फिरत असत. सरांनी आपली वही तपासावी अशी सगळ्यांचीच इच्छा असे. सरही कोणाला नाराज करत नसत. वही तपासली की त्यावर बरोबरची टिक करून "करेक्ट" असे ते म्हणत. कधी कधी बऱ्याच वह्या त्यांच्या पुढ्यात असल्या की सगळ्या वह्यांवर टिक करत करत "करेक्ट, करेक्ट" असे एक विशिष्ट टोनमध्ये म्हणत सर त्याचा फडशा पाडत. बऱ्याचदा ते "करेक्ट" हे "करेक्" असेच ऐकू येई. सरांनी आपली वही तपासली म्हणून मुलांना मात्र आनंद होई. 

भूगोलाच्या ताठे सरांच्या तासाला तर हास्याचे फवारे उडत. सर भूगोल उत्तम शिकवतच पण एखाद्या खोडकर मुलाला हाक मारण्यासाठी ते विशिष्ट शब्द वापरत. मस्ती करणाऱ्या पोरांना ते "ए काठमांडू" "ए नरुट्या" अशा शब्दांनी पुकारत. तासाला लक्ष देणारी इतर मुले म्हणजे 'भारत' देश आणि त्यांच्यापेक्षा वेगळा असा तो खोडकर मुलगा नेपाळमधला 'काठमांडू' म्हणजे भारतापेक्षा वेगळा असा विचार या शब्दांच्या वापरामागे असावा की काय अशी आता शंका येते. 

गणित आणि शास्त्र विषय शिकवणारे एस. डी. पानसरे सर त्यांच्या टापटीपपणाबद्दल प्रसिद्ध होते. ते ओतूरवरून स्प्लेंडरवर शाळेत येत. व्यवस्थित इन केलेला शर्ट,पायात शूज, क्वचित चामड्याची चप्पल आणि रे बॅनचा काळा गॉगल असा त्यांचा वेष असे. सर शाळेत येताना कमीतकमी ७-८ पोरं तरी रोज त्यांची ऐटीतली सफारी वळून वळून बघत असत. पानसरे सरांचा टापटीपपणा त्यांच्या शिकविण्यातही डोकावे. मुलांना वहीमध्ये काहीतरी लिहून देत असताना त्याचा प्रत्यय येत असे. एखाद्या विषयाचे हेडिंग लिहिले की, 

"डॅश करा. ती ओळ सोडून द्या. खालच्या ओळीला घ्या." हे त्यांचे वाक्य हमखास ठरलेले असे. 

त्यामुळे सगळ्याच मुलांच्या वह्या दिसायला चांगल्या दिसत. नंतर अभ्यास करतानासुद्धा वाचायला सोयीस्कर पडे. 

व्ही. डी. पानसरे सरांना वर्गातल्या सगळ्या मुलांचा सातबारा माहित असायचा. ते स्वतः जुन्नर तालुक्यातले असल्यामुळे कोण कुठल्या गावचा, कुणाचे वडील काय करतात, कोणाची कसली शेती आहे याची यथासांग माहिती त्यांना असे. मग मुलांना वर्गात हाक मारतानाही ते त्यांच्या गावाच्या नावाने हाक मारत. मग 'थोरांदळ्याचे गुंड', 'डेहण्याचे तिटकारे','भागडीचे उंडे', 'नळवण्याचे देशमुख' अशी नावे घेऊन मुलांना हाक मारली जाई. 

चायल सर पर्यवेक्षक असताना आम्हाला भूगोल शिकवायचे. बऱ्याचदा कामामुळे त्यांना तास घेणे जमत नसे आणि मग अभ्यासक्रम मागे राही. त्यासाठी शनिवार,रविवारी ते ज्यादा तास घेत. ह्या ज्यादा तासांना नोट्स देताना ते फळ्यावर लिहून देत. फळा पूर्ण भरला की दुसऱ्या वर्गात जाऊन त्या वर्गाच्या फळ्यावर लिहून ठेवत. मग मुलांची या वर्गातून त्या वर्गात पळापळ होत असे. चायल सरांना दोन्ही हातांनी लिहिता येत असे. त्यामुळे त्यांचा फळ्यावर लिहिण्याचा वेगही प्रचंड असे. 

संस्कृतचे जोशी सर शिकवताना जरा मुलांची गडबड जाणवली की "यत्किंचतही आवाज नकोय." या त्यांच्या वाक्यामुळे अजूनही लक्षात राहतात. संस्कृतचे काळ शिकवताना  'मि वः मः,  सि थः थ, ति तः अन्ति' हे ते एका विशिष्ट लयीत म्हणत आणि आमच्याकडूनही म्हणून घेत. आज इतक्या वर्षांनंतरही झोपेतून उठूनसुद्धा मी आणि माझे अनेक वर्गमित्र  'मि वः मः,  सि थः थ, ति तः अन्ति' ना चुकता म्हणू शकतो. 

त्रिकोणामिती शिकवताना साइन, कॉस, टॅन साठी वेगवेगळ्या कोनांच्या किंमती लक्षात रहाव्यात म्हणून दाते सर त्याचे कोष्टक बनवून कंपासपेटीमध्ये लावायला सांगत. ते कोष्टक आमच्याकडून म्हणूनही घेत. हे अगदी इंजिनियरिंग होईपर्यंत माझ्या लक्षात होते. 

गणित आणि शास्त्र विषय शिकवणारे साबळे सर फळ्यावर लिहिताना वेगवेगळ्या रंगाचे खडू वापरण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे अक्षर फळ्यावर आणि कागदावर तितकेच सुंदर असे. आकृत्या अतिशय रेखीव असत. एखाद्या विद्यार्थ्याने फळ्यावरचे वाचताना चूक केली तर त्या विद्यार्थ्याला, "तुझ्या डोळ्यात काय शेंबूड भरलाय काय रे?" असे म्हणून मोकळे होत. सबंध वर्ग मग हसत बसे. आजकालचे शिक्षक असे बोलले तरी विद्यार्थ्यांच्या आधी पालक तक्रार करतील. 

साबळे सरांसारखेच बेल्हेकर सरदेखील वेगवेगळ्या रंगाचे खडू वापरत. तेही फळ्यावर सुंदर आकृत्या काढून विषय सोपा करून समजावत. बेल्हेकर सरांना परफ्युमची फार आवड असे. ते आमच्या वर्गाच्या शेजारून जरी गेले तरी आमच्या वर्गात घमघमाट येत असे. त्यांच्या परफ्युमच्या आवडीची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा असे. 

इंग्रजीचे माकूणे सर हा विषय इंग्रजीमध्येच शिकवत. आम्हाला कायम इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहन देत. आज आम्ही जे काही बरेवाईट इंग्रजी बोलतो त्यासाठीची पायाभरणी काहीप्रमाणात त्यांनीच केली होती. माकूणे सर आमच्या वर्गाचे प्रिय असण्यासाठी अजूनही एक कारण होते. आमच्या वर्गात सगळ्यांनाच लिहायचा कंटाळा होता. माकूणे सरांचा नियम असा असे की तुम्हाला एखादा शब्द नविन वाटला तरच त्याचा अर्थ वहीत लिहून घ्या. त्यामुळे सहसा आमच्या इंग्रजीच्या वह्या फार भरत नसत. सरांना फळा स्वच्छ लागे. त्यांच्या अगोदर तास असलेल्या शिक्षकाने फळा साफ केलेला नसेल तर त्यांची चिडचिड होई. मग चार पाच मिनिटे फळा व्यवस्थित पुसून मगच ते शिकवायला सुरुवात करत. शिकवताना थोडी गडबड ऐकू आली तर, "You chit-chatters. Don't murmur." असे म्हणून मुलांना गप्प करत. 

कॉलेजला असताना फिजिक्स शिकवायला डुंबरे सर होते. त्यावेळेस डुंबरे सर आणि इंगळे सर हे दोघे ज्युनिअर कॉलेजला फिजिक्सचे दादा लोक होते. दोघांनी कधीच शिकवताना हातात पुस्तक घेतल्याचं मला आठवत नाही. डुंबरे सर एखादा मुद्दा शिकवून झाला की तो मुलांना समजलाय की नाही याची खात्री करण्यासाठी सतत "ओके?" असा प्रश्न विचारायचे. त्यातला ओ बऱ्याचदा सायलेंट असायचा. ऐकायला फक्त "के?" एवढंच यायचं. त्यांच्या आवाजात ते ऐकायला मजा यायची.

अकरावीला फिजिक्सला चव्हाण सर होते. तेही पुस्तक न घेता शिकवायचे. शिकवताना "सोपं सोपं असतं रे सगळं." असं म्हणून ते मुलांना धीर देत. एकदा काहीतरी झाले आणि शिकवताना ते चुकले. आपण चुकलोय हे लगेच त्यांच्या लक्षातही आले आणि चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी वर्गात कोणाकडे पुस्तक आहे का याची चाचपणी केली. एका मुलाने दिलेले पुस्तक घेऊन त्यांनी आपली चूक सुधारली आणि आपली चूक मान्यदेखील केली. तेवढयात आमचा वर्गमित्र रोहन कबाडी त्यांना म्हणाला, 

"जाऊ द्या हो सर. सोपं सोपं असतं सगळं." 

हे ऐकून त्यांचा पारा चढला आणि रोहनला वर्गाबाहेर जावे लागले. 

आज इतक्या वर्षांनंतरही हे शिक्षक अजूनही लक्षात राहिले याला कारण त्यांची शिकवण्याची पद्धत. ज्यांचे नाव लिहिले नाही ते लक्षात नाहीत असे नाही पण हा ब्लॉग लिहिण्याच्या ओघात वर नमूद केलेल्या शिक्षकांची आवर्जून आठवण झाली. तुमचेही शाळेतले असे कोणी शिक्षक असतील तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

Wednesday, February 14, 2018

"आपली तारीख किती आहे? २३ एप्रिल ना??

कॅबमध्ये बसल्या बसल्या ड्रायव्हरचा फोनवर बोलतानाचा आवाज कानावर पडला. 

"सर ट्रिप स्टार्ट करतो." एवढं मला सांगून तो पुन्हा फोनमध्ये गुंतला. 

"चालतंय ना मग. मी माझ्या बाजूनी सगळं घेतो उरकून. २३ ला सकाळी ९ ते ११ ची वेळ ठरवू. मी महाराजांना पण तसं सांगून ठेवतो. ओके,ओके. तुम्ही नका काळजी करू." असे म्हणत त्याने फोन ठेवला. 

उबरवर त्याचं रेटिंग ४.८ बघून मी त्याच्याशी बोलायला उत्सुक होतो. सुरुवात करायची म्हणून मी विचारलं,

"उबर फुल टाइम बिझनेस का?"

"नाय ओ सर. उबरमध्ये मजा नाय राहिली आता. मी साईड बिझनेस म्हणून करतो."

"अरे!!! मग मेन बिझनेस कोणता तुमचा?" मी आश्चर्यचकित होत विचारलं. 

"हे काय हेच आत्ता फोनवर बोलत होतो ते."

"मला समजलं नाही नक्की कशाबद्दल बोलत होतात तुम्ही ते. काहीतरी नियोजन चाललं होतं इतकंच लक्षात आलं." मी त्याला सांगितले. 

"आता बघा, हा फोन तळेगावरून होता. तिथं एका पार्टीच्या मुलाचा बड्डे आहे. त्यानिमित्त त्यांना किर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे." 

"मग तुम्ही किर्तन करता की काय?" मी हसत विचारले. 

"नाय ओ. मी किर्तन त्यांना अरेंज करून देतो."

"म्हणजे नक्की काय?" माझा पुढचा प्रश्न तयार होता. 

"म्हणजे मी ह्या सगळ्याचं इव्हेंट मॅनेजमेंट करतो असं म्हणा ना." त्याने माझी मदत केली. 

"वाह!! छानच की. मग तुम्ही अरेंज करून देणार म्हणजे काय काय करणार?" असं विचारत मी पुन्हा चर्चेचा चेंडू त्याच्याकडे तटवला. तोही तयारच होता. 

"म्हणजे बघा आत्ता फोन केलेल्या पार्टीने मला सांगितलं की त्यांचं बजेट ३० हजार आहे. मग आता मी तेवढयात सगळं बसेल अशी व्यवस्था करून देणार. २३ एप्रिलला सकाळी ९ वाजता महाराज आणि त्यांचा लवाजमा तिथं पोहोचणार. त्यांचं काय हाये ते किर्तन बिर्तन उरकणार आणि पुढच्या कार्यक्रमाला जाणार."

"मग तुम्ही हे महाराज कुठून शोधणार?" मी पुढचा प्रश्न विचारला. 

"अहो आता झालेत कॉन्टॅक्ट बरेच. मी गेली चार पाच वर्षं हे करतोय. म्हणजे तुमची जशी गरज असंल तसं. तुम्ही म्हणाले आम्हाला सप्ताह करायचा तर आपण ते करतो. तुम्ही म्हणाले सात दिवस सकाळ संध्याकाळ कीर्तन पाहिजे तर आपण ते पण करून देतो."

"पण ह्याचा खर्च जास्त असेल ना?"

"तुमचं बजेट असंल तसं सगळं करतो आपण. आता कधी कधी एखाद्या गावाचा कार्यक्रम असतो. मग गावकरी म्हणतात, आमचं ५ लाखाचं बजेट आहे. आम्हाला अमुकच महाराज पाहिजे. मग त्यानुसार आम्ही कामाला लागतो."

"पण हे महाराज लोक कधी कुठं जाणार हे कोण ठरवतं?"

"अहो बुकिंग असतंय सर. आता बघा की एप्रिलच्या कार्यक्रमासाठी गड्यानी मला फेब्रुवारीतच फोन करून बुकिंग केलंय.आता मी महाराजांना सांगितलं की ते त्यांच्या डायरीत नोंद करून ठेवणार. सर एकेक दीडदीड वर्षं आधी लोकं बुकिंग करून ठेवतात."

"पण मग यातून तुम्हाला कितपत शिल्लक पडते?" मी जरा नाजूक प्रश्न विचारला. 

"आता बघा हे सगळे कार्यक्रम, काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था, काही ठिकाणी सप्ताह असं सगळं धरून महिन्याकाठी ५०-६० हजार रुपये शिल्लक पडतात मला."

"अरे वाह!! चांगले पैसे मिळतात."

"हां बरं चाललंय आपलं. त्यानिमित्ताने आपल्या हातून देवाची सेवा पण होती.. नाय का?"

मी नुसतेच हं म्हटले. 

"हे बुवा लोकं किती पैसे घेतात मग?"

"रेट असतात सर यांचे. म्हणजे जो बुवा फेमस त्याचा रेट जास्त. एका प्रवचनाचे लाख लाख रुपये घेणारे पण बुवा आहेत."

"हे बुवा लोक कुठंही जायला तयार होतात का?" मी अजून एक प्रश्न विचारला. 

"अहो सर पैसा मिळतोय म्हटल्यावर कोण नाही जाणार. जायला यायला गाडी, खायप्यायाची चंगळ असल्यावर कुणीपण जाईल की. जुन्नर,आंबेगाव आणि खेड तालुक्यांनी ह्याचं जास्त प्रस्थ आहे. पार येडी झालीत लोकं. दशक्रिया आली की बोलव महाराज, वाढदिवस आला की बोलव महाराज हे असंच चालू आहे. तुम्हाला सांगतो सर ह्याच्यातून काहीकाही महाराज लोकं मोक्कार गबर होऊन बसलेत. आपण त्येपण काम करतो."

"म्हणजे काय करता?" मी थांबणार नव्हतो. 

"अहो ह्यांना सगळं पेमेंट कॅशमधी होतं. त्याला काय टॅक्स नाय, काय नाय. मग पुण्यात फ्लॅट,बिट घ्यायचा झाला तर इन्कमचा प्रूफ नको का? मग आपण ५-६ महाराजांचं ते पण काम बघतो. म्हणजे त्यांच्या नावानी एक एन्टरप्राइज फर्म करायची आणि टॅक्सेशन करायचं. त्यांचपण काम होतं आणि चार पैसे आपल्याला पण मिळतात."

"पण ह्या लोकांचं उत्पन्न असतं तरी किती असं?" 

"सर एक माणूस मृदंग वाजवतो. म्हणजे तो तसं बघायला गेलं तर साईड हिरो म्हणा ना. पण मृदंग लई भारी वाजवतो. त्याच वार्षिक उत्पन्न किती असंल?"

"किती?" मी विचारले. 

"अंदाज करा."

"असेल आठ दहा लाख रुपये." मी अंदाज लावत म्हटलं."

"सर तो माणूस एक वर्षाला एकवीस लाख रुपये कमावतो. फक्त मृदंग वाजवून."

"काय सांगता?" मी आ वासत म्हटलं. 

"एकूणएक शब्द खरा आहे सर. देव समोर आहे." गाडीत लावलेल्या गणपतीच्या फोटोकडे बोट दाखवत तो म्हणाला. 

"चांगला धंदा आहे हा." मी गमतीने त्याला म्हणालो. 

"चांगलाच म्हणायला पाहिजे सर. माझं घर चालतंय त्यावर."

"मग तुम्ही का नाही करत हे सगळं? किंवा मुलांना का नाही शिकवत हेच?"

"सर आळंदीत, पंढरपुरात ह्या सगळ्याचं शिक्षण देणाऱ्या मोठमोठ्या संस्था आहेत. तिथं दिवसरात्र हेच चालू असतं. एखाद्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आळंदीला नदीच्या तीरावर चक्कर मारा. ही सगळी भविष्यात महाराज होऊ घातलेली पोरं तिथं असतात. ह्यांचे आईबाप खुशाल ह्यांना शाळा न शिकवता ह्या शिकवणीला पाठवतात. अहो ह्याच्यात कसलं आलंय भविष्य सर? चाललं तर ठीक. पण नाय चाललं तर ह्या पोरांच्या आयुष्यातली उमेदीची वर्षं वायाला जातात हो. बरोबर का नाय?" त्याने माझं मत घेण्याचा प्रयत्न केला. 

"हो बरोबरच आहे. शिक्षणाला पर्याय नाही. शाळा न शिकवता आपल्या मुलांना बुवागिरीचे शिक्षण देणारे पालक मूर्खच म्हणावे लागतील." मीही सहमती दर्शवली. 

"मी ठरवलंय सर. माझ्या दोन्ही मुलींना चांगल्या शाळेत टाकलंय. त्यांना आत्ताच सांगून ठेवलंय, काय पाहिजे तेवढं शिका. खर्च मी करतो. त्यांना चांगलं शिकवायचं आणि मगच त्यांची लग्नं लावून द्यायची."

"हा निर्णय मात्र उत्तम घेतलाय तुम्ही. मला बरं वाटलं ऐकून.चला तुम्हाला शुभेच्छा."  गाडी एअरपोर्टवर आली होती. मी उतरून माझ्या वाटेला लागलो.