Saturday, November 17, 2012

हिंदुहृदयसम्राट



आज सकाळी झोपेतून उठलो तर बातमी कळली. लॅपटॉप उघडत असताना नकळत दादांना (माझे वडिल) फोन लावला गेला. बाळासाहेब गेले हे त्यांनी सांगितलं आणि त्यानंतरचे काही सेकंद दोघेही शांत राहिलो. अतिशय वाईट बातमी होती. वास्तविक पाहता मी आणि माझे वडिल कोणत्याच पक्षाचे समर्थक नाही. पण बाळासाहेबांबद्दल त्यांना आणि त्यांच्यामुळे मला प्रचंड आदर होता आणि राहील. दादांशी बोलताना मग नकळत अनेक गोष्टी समोर आल्या.
मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार होतोय हे साहेबांच्या लक्षात आलं. ते थांबवण्यासाठी एक लढाऊ संघटना उभी करायची ह्या हेतूने शिवसेना स्थापन झाली. शिवसेना हे नाव साहेबांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचविलं. पक्षाचं चिन्ह निवडतानादेखील आपला लढाऊपणा त्यातून दिसला पाहिजे ह्या हेतूने वाघ हे चिन्ह निवडलं गेलं. यथावकाश अनेक लोक शिवसेनेमध्ये येत राहिले. येणाऱ्यांची संख्या ही नेहमीच जाणाऱ्यांच्या संख्येहून जास्त होती. अगदी हॉटेलमध्ये असणाऱ्या पोरयापासूनते वरिष्ठ अधिकारी वर्गापर्यंत मी शिवसैनिक आहे असं अभिमानानं सांगणारे कित्येकजण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होते. कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांना भेटल्यानंतर त्यांची एक व्यंगचित्रकार म्हणून वाटचाल सुरु झाली आणि मार्मिकमुळे एक नविन पर्व सुरु झालं. त्याकाळी लोक मार्मिकची वाट पहायचे ते केवळ त्यात असलेल्या साहेबांनी काढलेल्या व्यंगचीत्रांमुळे आणि त्यांच्या असलेल्या राजकीय टीकाटिपण्णीमुळे.
हळूहळू शिवसेना ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि मग सबंध महाराष्ट्रामध्ये पसरली. एक प्रादेशिक पक्ष असूनही दिल्लीश्वरांना शिवसेनेबद्दल दरारा वाटत असे. मुंबईचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे राजकारण शिवसेनेला वगळून कधीही होऊ शकले नाही.
मुंबईमध्ये धुलिवंदन मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. पण ते करत असताना कोणत्याही महिलेला शिवसैनिकांनी त्रास दिला नाही आणि इतर कोणी देणार नाही याची काळजी देखील घेतली. याला कारण म्हणजे साहेबांबद्दल असलेली आदरयुक्त भीती आणि साहेबांचे संस्कार.
हा सिलसिला चार दशके सुरु राहिला. हे करत असताना राजकारणामध्ये ताणले गेलेले संबंध घरगुती संबंधांच्या आड येणार नाहीत याची पुरेपूर काळजी साहेबांनी घेतली. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार आणि त्यांची असलेली मैत्री. बाहेर त्यांना बारामतीचा म्हमद्या असं म्हणणारे साहेब त्यांचे परममित्र होते हे सर्वज्ञात आहे. सुप्रिया सुळे त्यांना आवर्जून काकाच म्हणायच्या. अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले होते. एकदा मुंबई पुणे प्रवासात एकमेकांना क्रॉस होत असताना छगन भुजबळांना कळलं की पलिकडे साहेब आहेत. गाडी थांबवण्यात आली. गाडीमधून त्यांची पत्नी उतरली आणि जावून साहेबांच्या पाया पडली. केवळ सत्तेसाठी भुजबळ शिवसेना सोडून गेले. पण त्यानंतरदेखील साहेबांनी कौटुंबिक संबंध तितकेच जपले.
मुंबई केंद्रशासित करायची असं घात केंद्राने आणि महाराष्ट्र सरकारने घातला होता. केवळ शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली. मुंबई सगळ्या भारतीयांची आहे असं म्हणणारा सचिन तेंडूलकरदेखील त्यांच्या तडाख्यातून सुटला नाही तिथे इतरांची काय कथा. अतिशय जिव्हारी लागणारी आणि झोंबणारी वक्तृत्व शैली. अगदी इंदिरा गांधींपासून ते नारायण राणेपर्यन्त साहेबांनी कधीच कोणाचीच पर्वा केली नाही.  जे वाटलं तेच बोलले. भुजबळांना लखोबा लोखंडे, राणेंना नाऱ्या ही नावे त्यांनीच दिली. मुसलमानांना लांडे हा शब्द जाहीरपणे वापरलेला हा पहिला आणि एकमेव माणूस. पाकिस्तानच्या सीमेवर उभं राहून सगळे भारतीय मुतले तर तिकडे पूर येईल असं बोलू शकणारा माणूस येणाऱ्या कित्येक दशकांमध्ये सापडणार नाही.
कधीही सक्रीय राजकारणात न येता साहेबांनी आपला पक्ष उभा केला. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल असा शब्द त्यांनीच पहिल्यांदा वापरला. महाराष्ट्रामध्ये साहेब म्हणून जन्माला आलेली केवळ ३ चं माणसे .यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार.
शिवाजी पार्कला सभा घेणं भल्याभल्यांना घाम फोडणार काम आहे. पण साहेबांच्या सभेला अगदी या टोकापासून ते त्या टोकापर्यंत मैदान भरलेलं असे.
त्यांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी योग्य होत्या असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यांनी घेतलेले सगळे निर्णय योग्य होते हेही म्हणणं चुकीचं ठरेल. पण ते बोलण्याची हे वेळ नव्हे.


एखादा राजकीय नेता जातो आणि अगदी रस्त्यावरच्या सामान्य माणसालादेखील वाईट वाटतं. आबालवृद्ध ढसाढसा रडतात हे चित्र इथून पुढे बरीच वर्षे दिसणार नाही.  मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा, मराठी मातीवर जिवापाड प्रेम करणारा, केवळ महाराज हेच दैवत मानणारा शिवसेनेचा हा ढाण्या वाघ, हिंदुहृदयसम्राट आज काळाच्या पडद्याआड गेला. या वाघाला माझं त्रिवार प्रणाम.

Thursday, November 1, 2012

पुण्याचा बस-डे



नुकताच पुण्यामध्ये बस-डे साजरा झाला. सकाळने हा उपक्रम सुरु केला आणि राबवलादेखील. आधी नुसती संकल्पना असलेला हा उपक्रम अनेक छोट्या मोठ्या लोकांच्या सहकार्याने पार पडला.
उपक्रम जेव्हा फक्त संकल्पना होता तेव्हापासून सकाळने सावकाश प्रसिद्धी करायला सुरुवात केली. हळुहळू काही प्रसिद्ध लोकांना पुढे केलं गेलं. या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले गेले. ते सकाळमध्ये छापले गेले. रोजच्या रोज या उपक्रमाची जाहिरात सकाळमध्ये येऊ लागली. मग देणग्या सुरु झाल्या. अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांनी जमेल तशी देणगी दिली. प्रचंड मोठा निधी जमा झाला. आणि अखेरीस हा दिवस पार पडला.
मी रोज सकाळचा ई-पेपर वाचतो. दुसऱ्या दिवशी पेपर उघडला तर पहिल्या पानावर बस-डे बद्दल बातम्या. तिथेसुद्धा कलमाडीसारख्या माणसाला व्यासपीठावर संधी दिली गेली याबद्दल वाईट वाटलं. दुसऱ्या पानावर तशाच बातम्या. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या..... २ नोव्हेंबरच्या ई-सकाळ च्या सगळ्याच्या सगळ्या १० पानांवर फक्त आणि फक्त बस-डे. साहजिकच माझ्या मनात विचार आला बाकीच्या बातम्यांना काही महत्व नाही का??
बस-डे हा उपक्रम निश्चित चांगला आहे. त्याच्यामागे असलेला हेतू चांगला आहे. त्यासाठी लोकांनी देणग्या देणंदेखील चांगलं आहे. पण हे सगळं केल्यानंतर एक वर्तमानपत्र म्हणून सकाळने इतर बातम्या न छापता केवळ आपल्या उपक्रमाचे गोडवे गाण्यात सबंध पेपर वाया घालवावा हे मनाला पटत नाही. बाकीच्या जगात जे काही झालं त्याला काहीच महत्व नाही का?? वर्तमानपत्र हे एक तटस्थ माध्यम आहे असं माझं मत आहे. असं असताना सकाळसारख्या माध्यम समूहाने बाकीच्या बातम्या न छापण्यापर्यन्त जाणे हे फारसं पटलं नाही. दुसरीकडे लोकसत्ताला सोनियांवर १५०० कोटी बळकवल्याचा आरोप केला गेला होता. (इथे लोकसत्ताची प्रसिद्धी करण्याचा हेतू नाहीये.) हा इतका मोठा विरोधाभास एक प्रश्नचिन्ह उभं करतो.
दुसरा मुद्दा असा की ज्या पद्धतीने अनेक सेलेब्रेटीजचे इंटरव्ह्यूज घेतले गेले. ज्यांनी बसने प्रवास केला ते लोक इथून पुढे कायम बसने प्रवास करणार आहेत का? केवळ एक दिवस प्रवास करून वाह वाह!!! छान छान असं म्हणणं सोपं आहे. जे लोक रोज बसने प्रवास करतात त्याच्या समस्या तेच जाणतात. एक दिवस बसने प्रवास करून काय कळणार आहे?? माझ्या एक मित्राने चांगला निर्णय घेतला. त्यानं ठरवलं की या दिवशी आपण बसने प्रवास करायचा नाही. कारण रोज हजारो लोक बसने प्रवास करतात. आपण केवळ आज बस-डे म्हणून प्रवास करायचा आणि उगाचच गर्दीमध्ये भर का टाकायची?? मला त्याचा निर्णय पटला. अजून कोण्या एक मित्राने लिहिलं होतं की केवळ मुख्य मार्गांवर जास्त बसेस सोडल्या होत्या. बाकी मार्गांवर नेहमीचं वाट पाहणं आणि गर्दीतून प्रवास यातून लोकांची सुटका झालीच नाही. ज्या देणग्या घेतल्या गेल्या त्याचा उपयोग खरोखर बससेवा सुधारण्यात झाला तर बर होईल. या अगोदर असे किती निधी आले आणि गेले. पुण्याची बससेवा अजूनही तशीच आहे.
असे बस-डे अजूनही झाले पाहिजेत हे मान्य. पण हे करत असताना सामान्य माणसाला विचारात घेउन करावं. उपक्रम निश्चितच विधायक आहे. पण तो केवळ उपक्रम राहू नये हीच केवळ इच्छा.

Saturday, September 22, 2012

तर लाईफ कसले???

परवाकडे एक ई-मेल आला होता. त्यातला मजकूर आवडला म्हणून शेअर करतोय..

एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो  साधा वाटतो, पण तरीही आवडतो. काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण. परतताना मनात विचार येतो ‘तो ड्रेस घ्यायला हवा होता!’ सिग्नलला गाडी थांबते. चिमुरडी काच ठोठावते. गोड हसते, पण भिक मागत आहे हे लक्षात घेऊन त्या
हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण. २-३ रुपये द्यावे असे मनात येते.  रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो. तेवढ्यात  सिग्नल सुटतो. गाडी पुढे घ्यायची वेळ येते. थोडे पुढे गेल्यावर मन  म्हणते, ‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला!’

जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्‍वासाने  सांगतो. त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात. वाईट वाटते खूप. नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो. ‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो. जेवणाची सुट्टी  संपते. तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो. क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही, निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

‘तुमच्या पोराची धावपळ पाहतो आम्ही. कसल्या परिस्थितीत तो एवढा मोठा  झाला. कधी त्याच्या त्रासाची, कर्जाची आणि ओझ्याची झळ त्याने घरी लागू दिली नाही’ असे शेजारच्यांकडून एकून डोळ्यात पाणी येते. वाटते ‘आपणही आपल्या पोराला कधीतरी शाब्बास म्हणायला हवे होते.’

असेच होते नेहमी. छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात. खरं तर या छोट्या  गोष्टीच जगण्याचे कारण असतात. गेलेले क्षण परत येत नाहीत. राहतो तो ‘खेद’, करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा. जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीयेना ते ‘चेक’ करा. आनंद झाला तर हसा, वाईट वाटले तर  डोळ्यांना बांध घालू नका. चांगल्या गोष्टीची दाद द्या, आवडले नाही तर सांगा, घुसमटू नका. त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा. नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही. आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व  द्या. त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे. आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ’ कसले?? आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर लाईफ कसले?? मित्रांच्या फालतू विनोदांवर पोट  दुखेस्तोवर हसलो नाही तर कसले लाईफ?? आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर लाईफ कसले???

Friday, June 22, 2012


भारतीय टेनिस आणि ऑलिम्पिक २०१२ 


नमस्कार. एक टेनिसप्रेमी म्हणून आणि एक भारतीय म्हणून गेल्या २ आठवड्यांमध्ये भारतीय टेनिसमध्ये ऑलिम्पिकला कोणता संघ पाठवायचा यावरून जो काही वादंग उठला त्याबद्दल जरा जास्तंच वाईट वाटलं. भूपती आणि पेस या दोघांचं टेनिसचं कौशल्य वादातीत आहे. ते दोघे एकत्र होते तेव्हा त्यांनी जे काही केलं ते इतर कोणत्याही भारतीय जोडीला नजिकच्या भविष्यात जमेल असं मला तरी वाटत नाही. या दोघांमध्ये वाद झाले आणि ते वेगळे झाले. दोघांनी आपापले जोडीदार निवडून जमेल तसं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं. मध्ये एकदा पुन्हा एकत्र आले. ऑलिम्पिकसाठी खेळले. पण ते जिंकणार नाहीत हे एखाद्या शेंबड्या मुलानेदेखील सांगितलं असतं. आणि नंतर पुन्हा ते वेगळेदेखील झाले. त्यांच्यातील वाद म्हणा किंवा इगो म्हणा वाढत गेला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय टेनिस संघटनेने या दोघांना पुन्हा एकदा संघ म्हणून पाठवायचा जो काही निर्णय घेतला तो मुळातच चुकीचा होता असं माझं मत आहे. विशेषतः भूपती आणि बोपण्णा ही जोडी चांगली खेळत असताना. केवळ पेस भूपती अगोदर एकत्र होते म्हणून त्यांनी आत्तादेखील एकत्र येउन देशासाठी खेळावं हा युक्तिवाद टेनिस संघटनेने करायला नको होता. देशप्रेम हे आहेच पण केवळ देशप्रेम म्हणून गेली काही वर्षें एकत्र न खेळलेल्या लोकांनी एकत्र खेळावं आणि देशासाठी पदक जिंकावं अशी अपेक्षा धरणचं मुळात चुकीचं आहे. एक व्यवस्थापन म्हणून भारतीय टेनिस संघटनेने प्रँक्टिकली निर्णय घेण्याची गरज होती. जे त्यांना उशीरा का होईना सुचलं. त्याबद्दल बरं वाटलं.
पण हे सगळं घडत असताना पेस आणि भूपती या दोघांनी एकमेकांवर जी काही चिखलफेक केली त्याचं या जोडीचा चाहता म्हणून मला फार वाईट वाटलं. त्यांच्यात वाद आहेत हे सगळ्या जगाला माहीत असताना इतक्या खालच्या पातळीवर या दोघांनी जायला नको होतं (उदा. भूपतीने पेसला पाठीत वार करणारा म्हणणं, पेसने स्वतःच्या देशप्रेमाचा दाखला देणे, कमी मानांकन असलेल्या खेळाडूबरोबर खेळायला नकार देणं). आणि नेहमीप्रमाणे भारतीय मिडीयाने हवा तसा मसाला पुरवला.यानंतरही पेसने अजून आपण समाधानी नसल्याचं जाहीर करून स्वतःच्या प्रवेशावर अनिश्चितता निर्माण करून ठेवली.
माझ्या मते सगळ्यांनी जे झालं त्याचा विचार न करता आता तयारीला लागलं तर जास्त बरं होईल. काय सांगावं पदकांचा दुष्काळ असलेल्या भारताला एखादं पदकही मिळून जाईल.

Tuesday, June 12, 2012


नमस्कार. आज जरा फोटोग्राफीबद्दल लिहितोय. लेख केवळ मनोरंजन म्हणून लिहिलेला आहे. कोणालाही दुखविण्याचा हेतू इथे नाहीये.
फोटोची हौस कोणाला नसते. अगदी २-३ महिन्याच्या बाळापासून ते अगदी ७० वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबा-आज्जीना देखील फोटो काढून घेण्याची हौस असते. पण काही लोकांना फोटो काढायची हौस असते किवा आवड असते. आणि या आवडीतून काही लोक पुढे जाऊन त्यातंच शिक्षण घेतात. काहीजण जुजबी शिकून स्वतःचा व्यवसाय सुरु करतात. यात अजून एक इंटरेस्टिंग असं निरीक्षण मी केलं. अगदी हल्ली हे पाहण्यात आलं आहे. फारसं काही ज्ञान नसलेले लोक केवळ पैसा आहे म्हणून महागडा कॅमेरा आणि महागड्या लेन्सेस विकत घेतात. आणि मग सुरु होतो तो एक फोटोग्राफिक प्रवास. स्वतः काढलेले फोटो फेसबुकवर टाकणे आणि मग चार लोक त्यावर कॉमेंट्स करणार. कोणीतरी विचारणार अरे कोणता कॅमेरा आहे आणि कोणती लेन्स आहे. जरा एक्स्पोजर जास्त का नाही ठेवलंस? आणि तत्सम सगळ्या कॉमेंट्स तिथे वाचायला मिळतात. काही लोक यातून जरा वेगळा मार्ग निवडतात आणि स्वतःचा फोटोग्राफी ब्लॉग सुरु करतात. तिथे मग एकेक फोटो अपलोड करून तो फोटो काढताना त्यांना किती कष्ट करावे लागले किंवा ती पोज मिळवण्यासाठी किती वेळ वाट पहावी लागली याचं विस्तृत वर्णन करतात. काही जण आपले फेसबुक पेजादेखील सुरु करतात. माझ्या माहितीतला एक मुलगा होता. त्याची फोटोग्राफी बरी होती. मध्ये कधीतरी या हिरोचा वाढदिवस होता. बऱ्याचशा लोकांनी त्याला फेसबुकवर शुभेच्छा दिल्या. त्या प्रत्येक पोस्टवर याने धन्यवाद असा रिप्लाय दिला आणि स्वतःच्या फोटोग्राफी ब्लॉग ची लिंक पेस्ट केली. हा असला प्रकार म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला लाजीरवाणा प्रयत्न होता असं मला वाटलं. या फेसबुकवर फोटो टाकणाऱ्या लोकांच्या अल्बम्सची नावेदेखील मजेशीर असतात. त्यातल्या त्यात रँडम हे सगळ्यात जास्त वापरलं जाणारं नाव. काही अजून वापरली जाणारी नावे म्हणजे Through My Lens, Caught My Eye, Photography???, My Photography इत्यादि. जे दिसेल त्या सगळ्यांत या लोकांना फोटोग्राफिक मटेरिअल दिसायला लागतं. मोकाट जनावरं, रस्त्यावरचे भिकारी, गटारात उगवलेलं झाड, पाण्यात पडलेलं कशाचही प्रतिबिंब, जाता येता दिसणारे जीने, विजेजे खांब, रस्त्यावर खेळणारी लहान मुलं या सगळ्यांत या लोकांना अचानक फोटोग्राफिक मटेरिअल असल्याचा साक्षात्कार होतो. आणि हे सगळे यांचे फोटोग्राफीचे प्रयत्न फेसबुकवर आल्याने आमच्यासारख्या लोकांना ते सहन करावं लागतं.
यातूनही सुंदर फोटो काढणारे अनेक असतात. तेदेखील आपण काढलेले फोटोज अपलोड करतात. पण त्यांच्या फोटोकडे पाहताच त्या लोकांची लेव्हल वेगळी आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. आणि या लोकांचे फोटो आवर्जून पहावेसे वाटतात.
तर असा हा फोटोग्राफीचा प्रवास. काही लोक खरोखर चांगले फोटोज काढतात तर काही वर सांगितल्याप्रमाणे फोटो काढायचा प्रयत्न करतात. पण अशा दोन्ही प्रकारच्या माणसांकडून आमच्यासारख्या अडाणी माणसाचं मनोरंजन होतं.