Wednesday, August 29, 2018

श्रद्धा..

"ये किसका बॅग है?" एअरपोर्ट सिक्युरिटीला ड्युटीवर असलेल्या सीआयएसएफच्या माणसाने बेल्टवर स्कॅन होऊन आलेली एक बॅग हातात घेत विचारले.

"हमरा है जी." माझ्यासमोर उभ्या असलेल्या पन्नाशीतल्या एका बाईने आपली बॅग ओळखत उत्तर दिले.

"खोलो इसे. चेक करना पड़ेगा."

"क्या हुआ?" तिला बिचारीला कळेना नक्की काय झाले.

"खोलो तो पहले." त्याने पुन्हा फर्मावले.

तिने बॅगची चेन उघडली. त्याने वरुन  ढुंकून पहात काहीतरी शोधायचा प्रयत्न केला. ते बहुधा त्याला दिसले नसावे.

"इसमें लोहेका तुकडा है एक. ऐसे शेपका." हाताने इंग्रजी यु आकार हवेत काढत त्याने तिला सांगितले.

"हां हैं." तिने उत्तर दिले.

"उसे बाहर निकालो." बॅग तिच्याकडे सरकवत त्याने आदेश दिला.

तिने बॅगेत हात टाकून तो तुकडा बाहेर काढला. तो तुकडा म्हणजे घोड्याची नाल होती.

"यह अलाउड नही है ले जाना."

"काहे?" तिने भाबडेपणाने विचारले.

"अरे अलाउड नही बोले ना हम."

"बताओ अब क्या करे? इतने दूरसे लेकर आये थे हम.इससे भला हम क्या करेंगे? जाने दीजिये. बिनती करते है हम."

"अरे लेकिन यह लेकर नही जा सकते." त्याने पुन्हा सांगितले.

"हम कहाँ किसको मारनेवाले है.मंदिर गए थे नेपाल. वहासे लाये है बड़ी श्रद्धा से.महंगा भी है. ३०० में खरीदा था.और आप कह रहे यही रखो. भला ऐसे कैसे रखे?"

"साबसे बात करनी पड़ेगी." त्याने साहेबांकडे डोळे दाखवत सांगितले.

"अरे काहे साहब के पास भेज रहे हो.जाने दो.बिनती करते है.इससे भला हम क्या भी कर सकते है.भगवान की चीज है.श्रद्धा है हमारी बस और कुछ नही."

ही बाई घोड्याची नाल घेऊन तर आलीये.चेहऱ्यावरून साधी वाटतेय फारच. नाल तशीही देव्हाऱ्यात ठेवणार आहे. काय हरकत आहे असा विचार करत त्याने ती तिच्या उघड्या बॅगेत भिरकावली आणि म्हणाला,

"जाइये.श्रद्धा हमारी भी है बस यह नौकरी कभी कभी बीचमें आती है."

"बहुत धन्यवाद आपका." म्हणत तिने खुशीने बॅगची चेन लावली आणि आपल्या गेटकडे निघून गेली.

मी बाजूला उभा राहून गालात हसत आहे पाहून तो मला म्हणाला,

"क्या भी करे सर.सबको खुश रखना पड़ता है.बात आखिर श्रद्धा की है."

"जी बिलकुल." म्हणत मीही माझ्या गेटकडे चालू लागलो.

Tuesday, August 21, 2018

आंब्या

गेल्या वर्षी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने एका प्रकल्पांतर्गत शॉर्ट फिल्म महोत्सव भरवला होता. या महोत्सवासाठी मित्र संजय ढेरंगे याच्या 'आंब्या' ह्या शॉर्ट फिल्मची निवड झाली. निवडीचा आनंद साजरा करतोय तोच या महोत्सवात 'आंब्या' ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची बातमी आली. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, २५ हजार आणि भरभरून कौतुक एवढं सगळं आंब्याच्या वाटेला आलं. 

फिल्म पाहिल्यावर एका मित्राचे नाही तर एका दिग्दर्शकाचे कौतुक करावेसे वाटले. बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात लहान मुले पडण्याच्या घटना आपल्याकडे नवीन नाहीत. कित्येकदा बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या मुलाची अमुक तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका अशा बातम्या वर्तमानपत्रात येत असतात. आपणही त्या वाचतो आणि सोडून देतो. पण अशाच एखाद्या खड्ड्यात पडलेल्या मुलाच्या आईवडीलांची काय अवस्था होत असेल हा विचार क्वचितच आपल्या मनाला शिवतो. सरकारी पातळीवरदेखील याकरता फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. मग एखाद्या फिल्मच्या माध्यमातूनच हा विषय का मांडू नये अशा विचाराने संजयने ही फिल्म बनवली आहे. 

ऊसाच्या शेतात काम करताना चार सहा ऊसच एकत्र करून त्याची आपल्या बाळासाठी झोळी बनवणे, मुलाला यात्रेत खर्च करण्यासाठी १० रुपये दिले म्हणजे आपण खूप पैसे दिल्यासारखे वाटणे, मुलाच्या दोन्ही पायांत वेगवेगळ्या चपला असणे, यात्रेत गेल्यावर त्याने भेळीच्या गाडीवर ठेवलेल्या शेव, कुरमुऱ्यांच्या पिशवीवर फक्त हात फिरवणे असो, गोडीशेव खरेदी न करता फक्त ती केवढ्याला आहे असे विचारणे असो, या सगळ्या फ्रेम्समधून ऊसकामगारांची सध्या अवस्था किती बिकट आहे हेही संजयने दाखवले आहे. 

एक दिग्दर्शक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा किती बारकाईने विचार केला असेल हे जाणवत राहते. फिल्मच्या शेवटच्या फ्रेममध्ये वापरलेले पार्श्वसंगीत अंगावर काटा आणते. कमी वेळात जास्तीत जास्त परीणामकारक संदेश देणे हा मुळात कुठल्याही शॉर्ट फिल्मचा गाभा असतो. संजयच्या ह्या फिल्मने ते योग्यप्रकारे साधले आहे. नुकतीच ही शॉर्ट फिल्म युट्युबवर उपलब्ध झाली आहे. तुमच्या बिझी शेड्युलमधून ८ मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा. नक्की आवडेल. 

https://www.youtube.com/watch?v=JNjBRGm4lg0&t=2s

Thursday, August 16, 2018

अटलजी

जेव्हा कळू लागलं तेव्हा देशाच्या राजकारणात अटलजींचा दबदबा होता.त्याचवेळी महाराष्ट्र आणि दिल्लीत भाजप पकड घेऊ लागला होता.एखाद्या नेत्याने पंतप्रधान व्हावं असं मला पहिल्यांदा वाटलं ते अटलजींच्या बाबतीत.

त्यांची भाषणं लोकसभेत आणि प्रचार सभांमधूनच ऐकायला मिळाली. काय ते वक्तृत्व, काय ते हिंदी भाषेवरचे प्रभुत्व, टीका पण अशी की समोरच्याला वर्मावर लागणार पण तो दुखावणार मात्र नाही. विरोधकही त्यांना मनापासून दाद देत असत. आजवर अनेक नेते झाले. बोलताना कधी ना कधी या ना त्या नेत्याचा आपण एकेरीत उल्लेख करतो. अटलजींच्या बाबतीत मात्र हे कधीच झाले नाही. त्यांचा उल्लेख कायम आदराने 'अटलजी' असाच करण्यात येतो. 

त्यांचं १३ दिवसांचं सरकार पडल्यावर अनेकांना वाईट वाटलं. काय झालं होत नेमकं हे माझ्या बालबुद्धीला समजले नाही पण वाईट मात्र खूप वाटले. त्यानंतर पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अणूचाचण्या केल्या. त्यावेळी अमेरिका आणि जपानसारख्या देशांनासुद्धा त्यांनी भीक घातली नव्हती. या अणूचाचण्यांचा मला काय फायदा झाला असेल तर त्यावर भाषण करायची संधी मिळाली. त्यावेळी शाळांमधून विविध पातळीवर घेतल्या गेलेल्या भाषण स्पर्धांमध्ये अणूचाचण्यांचा विषय हमखास असे. परीक्षांमध्ये निबंधालाही विषय असे. भाषण केले असल्याने निबंध लिहायला फारशी अडचण येत नसे.

अलीकडे भाजपच्या पोस्टर्स वरून त्यांची छबी सोयीनुसार वापरली किंवा काढून टाकली जाते..त्याबद्दल एखादी बातमी वगैरे येत असते. आता मात्र भाजपच्या प्रत्येक पोस्टर वर त्यांची छबी झळकेल अशी आशा आहे.

भारतीय राजकारणातील एक पर्व संपले.श्रद्धांजली..💐💐

Saturday, August 11, 2018

बॉर्डर आणि गुंड कुटूंब

काल सुनील शेट्टीचा वाढदिवस झाला. सुनील शेट्टी आवडणारी माणसं तशी विरळाच. मीही सुनीलचा चाहता वगैरे नाही. मात्र त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका मित्राबरोबर बोलताना त्याच्या बॉर्डर या चित्रपटाची आठवण झाली आणि मन भूतकाळात गेलं.

बॉर्डरशी माझं नातं खूप वेगळं आहे. माझ्या वडिलांबरोबर पाहिलेला  माझ्या आयुष्यातला हा पहिला चित्रपट आहे. आईदादा साधारण ७७ साली जुन्नरला आले. तेव्हापासून ते २०१३ पर्यंतच्या जुन्नरच्या वास्तव्यात दादांनी थेटरात पाहिलेला हा एकमेव चित्रपट. आम्ही भावंड कधीतरी जात असू चित्रपट पहायला.बऱ्याचदा शाळेतूनही आम्हाला चित्रपट दाखवला जात असे.दादांबरोबर चित्रपट पहायची वेळ मात्र कधी आली नव्हती.

बॉर्डर आल्यावर माझ्या काही मित्रांनी तो पाहिला. शाळेत कधीतरी बोलताना त्यांनी तो भारी असल्याचं सांगितलं. मग मीही दादांकडे हा चित्रपट पहायचा म्हणून हट्ट धरला.एरवी कधीही न बधणारे दादा त्यावेळी मात्र कसे प्रसन्न झाले माहीत नाही. कदाचित भारत पाकिस्तान युद्धावर आधारित असल्याने त्यांनी होकार दिला असेल.

चित्रपट सगळ्यांनी जाऊन बघू असे बहुधा ताईने सुचवले.दादांनीही ते मान्य केले.त्यावेळी ऑनलाइन तिकीटविक्री वगैरे काही नव्हतं.त्यावेळीच काय,आजही जुन्नरला अनेकजण थेटरला जाऊनच तिकीट घेतात.

आम्ही रात्री नऊच्या शोला जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे जुन्नरच्या शेवंता थेटरला पोहोचलो. मी आणि दादा तिकीट खिडकीकडे गेलो.तिथे आधीच लाईनला उभे असलेले कल्याण पेठेतले दोन-तीन जण दादांना पाहून तोंड लपवून पळून गेल्याचे आठवते. दादांना पाहताच आत असलेले मॅनेजर ईनामदार बाहेर आले.

"साहेब बाहेर थांबू नका.आतमध्ये या तिकीट घ्यायला." म्हणत आम्हाला आतमध्ये घेऊन गेले.

दादांना कधी थेटरची वाट माहीतच नव्हती. त्यामुळे त्यांना तिथे पाहून मॅनेजर ईनामदारांनासुद्धा आश्चर्य वाटले.चित्रपट कसा आहे हे दादांना माहीत असणे शक्यच नव्हते. ईनामदारांनी चित्रपट चांगला असल्याचे दादांना सांगितल्याचे मला आजही ठळकपणे आठवते.

बॉर्डर एक चित्रपट म्हणून उत्तमच होता.त्या दिवशी तो पाहताना मजा आलीच.मात्र आज इतक्या वर्षानंतर आजही बॉर्डर कधीही टीव्हीवर लागला तरी चॅनेल बदलावेसे वाटत नाही.त्यातले 'संदेसे आते है' गाणं तर आजही कित्येकांच्या मनात घर करून आहे. इतकं लांबलचक गाणं असूनही ते ऐकताना कंटाळा येत नाही.

पुढे काही वर्षांनी दादांनी टू इन वन टेपरेकॉर्डर घेतला. त्यावेळी माझा हट्ट म्हणून त्यांनी ए साईडला येस बॉस आणि बी साईडला बॉर्डरची गाणी असलेली कॅसेट घेतली.ती अगदी अलिकडेपर्यंत माझ्या संग्रहात होती.

पुढे पुण्यात आल्यावर आई दादांबरोबर बरेच चित्रपट पाहिले. दादांबरोबर पाहिलेला पहिला चित्रपट म्हणून बॉर्डरची आठवण मात्र कायम राहील.