Thursday, November 30, 2017

जेम्स बॉंड ट्यूनची कहाणी

जेम्स बॉंड ट्यूनची कहाणी 

जेम्स बॉंडचा एकही चित्रपट पाहिला नाही असा माणूस सापडणे तसे अवघड आहे. आणि जेम्स बॉंडच्या चित्रपटाची ट्यून माहित नसलेला माणूस सापडणे त्याहूनही अवघड आहे. १९६२ साली डॉ. नो हा जेम्स बॉंड मालिकेतला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या सुरुवातीला वाजणारी ही ट्यून पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर देखील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. पण ह्या ट्यूनचे मूळ भारतीय शास्त्रीय संगीतात आहे याची फार कमी लोकांना माहिती आहे. 

काय आहे ह्या ट्यूनच्या जन्माची कहाणी?

जेम्स बॉंडची जगप्रसिद्ध ट्यून ब्रिटिश संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांनी संगीतबद्ध केली आहे. जेम्स बॉंड चित्रपट मालिकेचे निर्माते अल्बर्ट ब्रॉकोली यांनी एक दिवस संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांना फोन करून बोलावून घेतले. ब्रॉकोली यांनी तेव्हा नुकतेच इयन फ्लेमिंग यांच्या प्रसिद्ध जेम्स बॉंड या कादंबरी संग्रहाचे हक्क विकत घेतले होते. या कादंबरी संग्रहावर आधारीत चित्रपटांची मालिका काढण्याचा त्यांचा मानस होता. त्यातील पहिला चित्रपट डॉ.नो असणार होता. या चित्रपटासाठी संगीत द्यायला तुला आवडेल का असा प्रश्न ब्रॉकोली यांनी नॉर्मन यांना विचारला. तोपर्यंत नॉर्मन यांनी जेम्स बॉंडच्या रहस्य कथांबद्दल फक्त ऐकले होते. 

मग चित्रपटाचे दुसरे निर्माते हॅरी साल्ट्समन यांनी नॉर्मन यांना सहकुटूंब चित्रपटाचे शूटिंग सुरु असलेल्या जमैकाला येण्याचे निमंत्रण दिले. नॉर्मन यांना नकार देणे अवघड होते. नॉर्मन जमैकाला गेलेसुद्धा. चित्रपटाची कथा त्यांच्या हातात पडली आणि त्यांनी संगीतावर काम करायला सुरुवात केली. नॉर्मन त्यावेळेस ज्युलियन मूर यांच्याबरोबर नोबेल पारितोषिक विजेते लेखक सर व्ही.एस. नायपॉल यांच्या हाऊस ऑफ मिस्टर बिस्वास या गाजलेल्या कादंबरीवर आधारित एका संगीतपटावर काम करत होते. त्याच्या एका ट्यूनमध्ये त्यांनी विविध भारतीय वाद्यांचा उपयोग केला होता. हा संगीतपट पुढे कधी प्रदर्शित झालाच नाही. नॉर्मन यांनी मग आपल्या जुन्या ट्यून्समधून ही ट्यून शोधून काढली. त्याचे शब्द असे होते. 

“I was born with this unlucky sneeze.
“And what is worse I came into the world the wrong way round.
“Pundits all agree that I am the reason why my father fell into the village pond and drowned."
ह्याच ट्यूनमध्ये थोडासा बदल करून त्यांनी जेम्स बॉंडची प्रसिद्ध ट्यून बनवली. चित्रपट निर्मात्यांना देखील ती आवडली. त्यांनी लगेचच जॉन बॅरी या एका तरुण संगीतकाराला निमंत्रित करून हि ट्यून त्याच्याकडून पुन्हा अरेंज करून घेतली. आणि ह्या ट्यूनने नंतर इतिहास घडवला. जेम्स बॉंडचा चित्रपट आणि ही ट्यून हे जणू समीकरणच बनले. जॉन बॅरी यानेच ही धून संगीतबद्ध केली असे अनेकांना वाटत राहीले पण खरे संगीतकार मात्र नॉर्मन हेच होते. पुढे बॅरी यांनी हि धून आपणच लिहिली असा दावादेखील केला. पण अखेरीस कायद्याने नॉर्मन यांनाच न्याय दिला. 
मराठी चित्रपट अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी काही दिवसापूर्वी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर केला होता. दाक्षिणात्य अभिनेते अजित यांनी हा व्हिडीओ अतुल कुलकर्णींना पाठवल्याचं त्यांनी नमूद केले आहे. हा व्हिडीओ इंग्रजीमध्ये आहे म्हणून त्या कहाणीचा मराठी स्वैर अनुवाद करायचा हा खटाटोप. सदर व्हिडीओची युट्यूब लिंक सोबत देत आहे. 

Tuesday, November 7, 2017

मी सातवीत होतो तेव्हाची गोष्ट. जुन्नरमध्ये 'कलोपासक' म्हणून एक संस्था होती. ते लोक विविध नामवंत कलाकारांना जुन्नरमध्ये आणून त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम करत असत. अशाच एका कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संगीतकार राम कदम हे जुन्नरमध्ये आले होते.

राम कदम हे त्यांच्या उडत्या चालीच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या गाण्यांना शिट्ट्या हमखास पडत. कार्यक्रम रंगात येऊ लागला तसं लोकांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. मी नुकताच शिट्टी वाजवायला शिकलो होतो. मग इतरांकडे बघून मलाही हुक्की आली आणि मीही शिट्टी वाजवू लागलो. नुकत्याच शिट्टी वाजवायला शिकलेल्या मला आपण जोरात शिट्टी वाजवू शकतो याची मजा वाटली होती.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. पहिला तास पार पडला. दुसरा तास सुरू झाला.

"गुंड उभा रहा." वर्गात येताच बाईंनी माझ्याकडे बघत आज्ञा केली. (माझ्या संपूर्ण शालेय जीवनात फक्त एक किंवा दोन शिक्षकांनी मला माझ्या नावाने हाक मारली असेल. बाकी सगळे गुंडच म्हणत. असो)

मी गोंधळतच उभा राहिलो. आल्या आल्या बाईंनी आपल्याला का उभं केलंय हे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतं.

"तुझ्यासारख्या मुलाकडून अशी अपेक्षा नव्हती."

"मी काय केलं बाई?" अजूनही काही न कळलेला मी विचारता झालो.

"अरे तूच मला विचारतोस? नीट विचार करून बघ." इति बाई..

मी पुन्हा आपला ढिम्म उभा.

"कालच्या कार्यक्रमात तू शिट्ट्या वाजवत होतास. सबंध कार्यकम संपेपर्यंत तुझा थिल्लरपणा सुरू होता."

मग माझी ट्यूब पेटली. कलोपासकच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ शुटींग होत असे.कार्यक्रम संपल्यानंतर केबल ऑपरेटर ती कॅसेट केबलवर लावत असे. शूटिंग करणाऱ्या माणसाने नेमका मी शिट्टी वाजवत असताना कॅमेरा माझ्यावर फोकस केला होता. त्यामुळे माझी शिट्टी वाजवण्याची कला सबंध जुन्नर शहराला दिसली होती. आणि नेमकं तेच माझ्यावर शेकलं होतं. याच बाईंनी तास संपल्यानंतर मला शिक्षक खोलीमध्ये बोलवून सगळ्या शिक्षकांसमोर माझी खरडपट्टी काढली.

तसं पहायला गेलं तर मी मजा म्हणून शिट्टी वाजवीत होतो. त्याचा असा काही परीणाम होईल हे माझ्या गावीही नव्हते. आपल्याला शिट्टी वाजवता आली पाहिजे असा साधा विचार माझ्या डोक्यात होता. आणि नुकत्याच शिट्टी वाजवायला शिकलेल्या मला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शिकलेले कसब आजमावयाची संधी मिळाली होती. शिक्षक खोलीतून बाहेर पडताना एका शिक्षकांनी, "एवढंच ना!" असं म्हणून हसल्याचंही मला आठवतंय.

बाकी शिट्टी मात्र वाजवता आलीच पाहिजे अशा मताचा मी आहे. ती एक कला आहे असं मला वाटतं. माझा एक मित्र सोनू माळवे एका बोटाने सुद्धा शिट्टी वाजवीत असे. काही लोक तर बोटांचा वापर न करतादेखील जोरात शिट्टी वाजवतात. आजकालच्या पोरांना शिट्टी वाजव म्हटलं तर खुशाल 'मला नाही येत' म्हणून मोकळे होतात. या शिट्टी वाजविण्यामुळे अजून मी अजून एका कचाट्यात सापडलो होतो. त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी.

Sunday, October 15, 2017

नवीन वर्षासाठी कॅलेंडर घ्यावे आणि बरोबर काही पुस्तकेही घ्यावीत म्हणून मी डेक्कन भागात फिरत होतो.बरोबर आईसुद्धा होती.एका दुकानात शिरून कॅलेंडरबाबत विचारणा केली.

ती बाई म्हणाली,  "भरपूर आहेत सर".

एकेक कॅलेंडर बघत मी दुकानात हिंडत होतो.अचानक दुकानाच्या समोरच्या पायऱ्यांवर प्रो कब्बडी लीगचे काही खेळाडू बसलेले दिसले. हे इथं का कडमडत आहेत असा विचार करत मी पुढे सरसावलो. जवळ गेल्यावर लक्षात आलं तमिळ थालाईव्हाज संघाचे ४-५ खेळाडू बसले होते.त्यांच्या हातात प्रो कबड्डी लीगचे २०१८ चे कॅलेंडर होते.

इतक्या उन्हातान्हाचे हे पठ्ठे काय करतात अशी उत्सुकता  म्हणून मी विचारले,

"अरे आप लोग तो प्रो कबड्डी के प्लेयर्स हो ना?"

" हां सर."

"तो ऐसे यहाँ पे क्या कर रहे हो? और यह कॅलेंडर्स क्यूँ है आप सबके हाथोमें?"

"प्रो कबड्डी का प्रमोशन है.उसका हिस्सा है इसलीये हमें यह करना पडता है."

"अरे लेकिन इतने धूप पे आप सब लोग ऐसें रस्तेपे बैठकर कॅलेंडर थोडी ना बेचोगे!!" मी आश्चर्याने विचारले.

एवढं होईपर्यंत इतरही लोकांनी त्यांना ओळखले होते. त्यांच्या अवतीभोवती गर्दी होऊ लागली होती. त्यांच्यातला एक जण एक माणसाबरोबर तमिळमध्ये काहीतरी बोलत होता. अचानक काय झाले कळले नाही आणि त्या माणसाने त्या खेळाडूच्या श्रीमुखात भडकावली. काय झाले म्हणून सगळेच तिकडे धावले. ते दोघे तमिळमध्ये तावातावाने एकमेकांना काहीतरी बोलत होते. त्या माणसाचे इतर साथीदार एव्हाना जमा झाले होते. प्रकरण गंभीर आहे हे जाणून मी आईला एका कोपऱ्यात थांबायला सांगितले. पुढच्या काही क्षणातच त्यांच्यातला वाद पेटला. ४-५ जणांनी मिळून त्या खेळाडूला मारायला सुरुवात केली. इतर खेळाडू मध्ये पडायला गेले तर त्यांना तमिळ मध्येच बाजूला रहा अशी वॉर्निंग दिली गेली. त्याला मारणे सुरूच होते. अचानक एका माथेफिरूने खिशातून एक बाटली काढली. रॉकेल किंवा पेट्रोल असावे. दुसऱ्या खिशातून आपला रुमाल काढला. तो त्या बाटलीतल्या रॉकेलने ओला करून पेटवला. आणि दुकानावर फेकला. पुस्तकाचेच दुकान असल्याने आणि जुनी लाकडी इमारत असल्याने तिने पटकन पेट घेतला. मी आईला घेऊन तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो. अचानक दुकानाच्या दरवाजाची एक फळी आमच्या पुढ्यात पडली. त्यातून मार्ग काढत पुढे निघालो तर त्या तमिळ लोकांपैकी एकाने आम्हाला थांबवले. आई बरोबर आहे असे त्याला मी खुणावले. आमचे सुदैव असे की त्याच्या ते लक्षात आले आणि त्याने आमचा रस्ता सोडला. आम्ही तिथून कसेबसे बाहेर पडलो तो समोर पोलीस उभे. त्यातल्या एकाने माझी गचांडी धरून बाजूला ओढले आणि आपल्या सहकाऱ्याला म्हणाला,

"ह्याला घे रे."

त्यांना काही सांगेपर्यंत मी पोलिसांच्या गाडीच्या मागच्या भागात फेकलो गेलो होतो. आई कुठे गेली कळायला मार्ग नव्हता. त्या आगीतून मार्ग लढत पोलिसांची गाडी ठाण्यावर गेली. इतका वेळ तग धरून असलेला मी नेमका त्याचवेळेस पेंगायला लागलो. दमून म्हणा किंवा अजून काही. पोलिसांनी धरून ओढत मला ठाण्यात नेल्याचे आठवते.

अचानक एक दांडका माझ्या पायावर पडला आणि मी तंद्रीतून जागा झालो.आजूबाजूला पाहतोय तर माझ्याच बेडवर मी झोपलो होतो. ऐन रविवारी दुपारी हे भयाण स्वप्न मला पडले होते. चेहरा घामाने थबथबला होता. काल रात्री बालेवाडीला तमिळ थालाईव्हाजची मॅच पाहिली होती त्याचा असा काही परिणाम होईल असे वाटले नव्हते. असो.स्वप्नात काहीही घडू शकते..

Sunday, September 24, 2017

उज्वल जनरल स्टोअर

लहानपणी पेन,पेन्सिल असं काही घ्यायचं असेल तर मी रविवार पेठेतल्या उज्वल जनरल स्टोअरमध्ये जात असे.कल्याण पेठेत सुद्धा दुकाने होती.पण उज्वल जनरलबरोबरचं नातं वेगळंच होतं.मग फक्त तेवढ्यासाठी मी सायकलवर रविवारात जात असे.

माझ्या जन्माच्या खूप अगोदर हे दुकान सुरू झालं असावं.कारण मला आठवतं तेव्हापासून उज्वल जनरल जुन्नरमध्ये आहे.विजूकाका म्हणजे दुकानातली प्रमुख व्यक्ती.डोक्यावरचे कमी होत चाललेले केस, हाफ शर्ट, पँट, उन्हाळा असेल तर क्वचित कॉटनची बंडी असे विजूकाका मला आठवतात.दुकानात कितीही गर्दी असली, गोंधळ असला तरी हा माणूस कधी गिऱ्हाईकावर रागावल्याचे, वैतागल्याचे मला आठवत नाही. कायम हसून बोलणार.दादांचे चांगले मित्र होते ते.त्यामुळे मलाही ओळखायचे.

"गुंड, तुझ्या आडनावाप्रमाणे वागू नको बरं का!!" असं गमतीने मला म्हणत असत.

"पप्पा कुठे गेले? मार्क किती पडले?" अशी चौकशीसुद्धा करत..

उज्वल जनरलच्या आसपास अजूनही एक दोन दुकाने होती.क्वचित यांच्याकडे एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्या दुकानांत जाण्याचा प्रसंग येत असे.पण विजूकाका ज्या प्रेमाने गिऱ्हाईकाशी बोलत तेवढं त्यांना जमत नसे.साहजिकच त्यांच्याकडे जाण्याचं मी टाळत असे..

शाळा सुरू व्हायचे दिवस आले की यांच्याकडे लगबग सुरू होई..नविन वह्या, पुस्तके, गाईड्स, पेन, पेन्सिल, डबा, वॉटरबॅग शाळेसाठी लागणारी प्रत्येक वस्तू उज्वलमध्ये असे.वह्यांचे गठ्ठे तर दुकानाच्या बाहेरसुद्धा ठेवावे लागत इतका मालाला उठाव असे. विजूकाकांचा मुलगा तुषार, त्यांचे मोठे बंधू वसंतकाका, जमेल तेव्हा घरातली इतर माणसे गर्दीच्या वेळी दुकानात येत असत.या सगळ्यांत तुषार जास्त वेळ दुकानात असे. कालांतराने त्यानेच दुकानाची सूत्रे आपल्याकडे घेतली.पण विजूकाका मात्र दुकानात येत असत.त्याशिवाय त्यांना करमणार कसे ना!!

अगदी क्रिकेट खेळायला टेनिसचा बॉलसुद्धा आम्ही इथूनच घेत असू..बॉल घ्यायला दुकानात आम्ही दोघं तिघं गेलो की विजूकाकांना अंदाज येई.मग ते विचारत,

"आज मॅच का? चांगले खेळा बरं का!"

आम्हीदेखील हो म्हणून बाहेर पडत असू..

एखादा मुलगा/मुलगी दुकानात आपल्या आई वडिलांकडे आपल्याला अमुकच पेन पाहिजे असा हट्ट करत असेल तर विजूकाका त्यांच्या मदतीला येत.

"अरे पप्पा म्हणतात तोच पेन भारी आहे. त्याने उलट तुझं अक्षर जास्त चांगलं येईल.सगळेजण हाच घेतात." आता दुकानदार सांगतोय म्हटल्यावर ते पोरगंसुद्धा त्यांचं ऐकून तो पेन घेत असे.केवळ ऐपत नसल्यामुळे आपल्या मुलांना महाग पेन, पेन्सिल देऊ शकत नसलेल्या कित्येक आई वडिलांचे पैसे विजूकाकांनी असे वाचवले असतील.त्याबद्दल कित्येकांनी त्यांना धन्यवादही दिले असतील.

बारावीनंतर पुण्याला आल्यावर उज्वलमध्ये जाणं कमी झालं.नंतर कधीतरी, काही कारणाने उज्वलमध्ये जाण्याचा योग आला.बऱ्याच वर्षांनी भेटूनही तुषारने तेव्हा मला ओळखले होते..

"अरे तू गुंड ना? कुठे असतोस सध्या?काय करतोस?" अशी प्रेमळ चौकशी केली होती.

आज दादांबरोबर सहज बोलताना विषय निघाला म्हणून ह्या आठवणीनं उजाळा मिळाला. आज सुमारे १५ वर्षानंतरही या दुकानाबद्दल वाटणारी आत्मीयता कमी झालेली नाहीये.माझ्यासारख्या बऱ्याच जणांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये उज्वल जनरलचा नकळतपणे हातभार लागला.

विजूकाका आणि तुषार दोघांनाही भेटून बरेच दिवस झाले.अलीकडे तुषारची बायको म्हणजे श्रद्धा भाभी त्याला हातभार लावत असल्याचे कळले.बदलत्या काळाबरोबर उज्वल जनरल स्टोअरने देखील कात टाकली आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांचा कारभार अजून चालू आहे. पुढील "उज्वल" वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.

Saturday, September 9, 2017

"सर तुमची परमिशन असेल तर मी थोडं बोलू का?"
एअरपोर्टच्या गर्दीतून गाडी बाहेर काढत उबरचा ड्रायव्हर माझ्याशी बोलत होता.समोरचा आपल्याशी बोलायला उत्सुक आहे म्हटल्यावर आपण का माघार घ्यावी अशा विचाराने मीही त्याला होकार देत म्हटलं,
"बोला की."
"सर आज सकाळी मी डॅडी पिच्चर पाहिला."
"अरे वा! कसा काय वाटला मग तुम्हाला?"
"एक नंबर आहे सर."
"मग बघायला पाहिजे."
"नक्की बघा सर..फक्त दाऊदच्या रोलमधी फरहान अख्तरला नव्हतं घ्यायला पाहिजे.त्याचा आवाज बाद आहे.दाऊदसारख्या माणसाचा आवाज असा असतो का??ते काय नीट जमलं नाही त्याला."
"आणि अर्जुन रामपाल?" मी विचारता झालो.
"लई भारी काम केलंय सर त्यानी. म्हणजे त्यानी लई अभ्यास केला असणार या रोलसाठी."
"हं."
"आणि आपण अरुण गवळीला फक्त अलीकडं पाहतो. तरुणपणीचा डॅडी कसा होता, कसा राहायचा, कोणते कपडे घालायचा हे आपल्याला कुठं माहितीये.पण सर पिच्चरमध्ये ना सगळं एकदम डिटेल दाखवलंय."
"अच्छा."
"एखाद्याला महाराष्ट्राच्या गुन्हेगारीची थोडी माहिती असेल तर त्याला नक्की आवडंल सर. महाराष्ट्राचा क्राईम रेशो कसा वाढत गेला हे चांगलं दाखवलंय पिच्चरमध्ये."
क्राईम रेशो हा शब्द ड्रायव्हरच्या तोंडून ऐकून मी एव्हाना गार पडलो होतो. त्या गनगनीत नंतरची त्याची एक दोन वाक्य मी ऐकलीच नाहीत. त्याला वाटलं आपण जास्त बोलतोय.
"सर सॉरी मी जरा जास्त बोलतोय."
"अहो नाही नाही.मीच जरा विचार करत होतो."
हे असले बायोपिक्स हमखास लोकांना आवडेल असे बनवतात दिग्दर्शक लोक.डॅडी सुद्धा कदाचित त्यातलाच एक असावा. म्हणून कदाचित यालासुद्धा मनापासून आवडला असेल असा विचार करता करता घर आले.
"उद्या जातो मी बघायला" असं त्याला म्हणत मी घराकडे चालू लागलो..

Wednesday, August 30, 2017

१९९५ साली आम्ही भाड्याच्या घरातून आमच्या स्वतःच्या घरात राहायला गेलो. त्या अगोदर साधारण चार वर्षांपूर्वी १९९१ ला दादांनी नगरहून टीव्ही आणला होता. टीव्ही होताच त्यामुळे शनिवार रविवार चांगले जायचे. त्यावेळेस दर शनिवारी झी टीव्ही वर फिलिप्स टॉप टेन नावाचा कार्यक्रम लागत असे. त्या त्या आठवड्याची टॉपची १० गाणी त्या कार्यक्रमामध्ये दाखवली जात. अर्थात हिंदी. नुकतंच कळू लागल्यामुळे ही गाणी मला ऐकावीशी वाटत. शनिवारी सकाळची शाळा असे. शाळा सुटली की गाण्याचा हा कार्यक्रम चुकू नये म्हणून मी घाईने घरी येत असे. 

गाण्याचा हा कार्यक्रम एक तासात संपत असे. नंतर कधी गाणी ऐकावीशी वाटली तर बाकी काही पर्याय नसे. मग आपल्याकडे टेप असावा असे वाटत राही. दादांकडे तशी मागणीदेखील केली जाई. ते सुद्धा "घेऊ" एवढंच म्हणत. नाही कधीच म्हणत नसत. असं करता करता एक दीड वर्ष गेलं. टेप काही आला नव्हताच. एक दिवस दुपारची सुट्टी संपवून दादा पुन्हा बँकेत चालले होते. घरातून निघताना मला म्हणाले, 

"चल माझ्याबरोबर."

"कुठे?" बँकेत जाताना मला का बरोबर चल म्हणतायेत असा प्रश्न मला पडलेला. 

"तू चल रे." 

दादांच्या बँकेजवळ सह्याद्री इलेक्ट्रॉनिक्स नावाचं एक दुकान होतं. अजूनही आहे. दादा मला तिथे घेऊन गेले. दुकानात गेल्यावर दुकानदाराचा मुलगा, बाबाला ते म्हणाले, 

"चलो दे दो वह टेप."

त्याने निमूटपणे मागे एका रॅकवर ठेवलेला बॉक्स आमच्या समोर ठेवला आणि उघडायला सुरुवात केली. त्यातून टेप बाहेर काढला. त्याची वायर वगैरे लावून त्यात एक कॅसेट टाकली आणि प्लेचं बटन दाबलं. गाणं सुरु झालं. कुठलं बटन दाबलं की काय होतं वगैरे त्याने समजावून सांगितलं.  रेडिओ कसा लावायचा वगैरे सांगितलं. त्याचं प्रात्यक्षिक झाल्यावर दादा म्हणाले, 

"कर दो पॅक." 

त्याने पॅक केलेला टेपचा बॉक्स माझ्या हातात ठेवत मला म्हणाले,

"हं, जा आता घरी घेऊन."

एव्हाना हे काय चाललंय याचा विचार करत असलेला मी त्यांना म्हणालो,

"हा आपला आहे?"

"आपला नाही तर मग कोणाचा?" दादांनी उत्तर दिले. 

मी खुशीने घरी आलो आणि माझ्या बहिणींना आमचा नवा टेप दाखवला. काय आनंद झाला होता आम्हा तिघांना.पण एक प्रॉब्लेम होता. टेपवर लावायला कॅसेट कुठे होत्या आमच्याकडे. संध्याकाळी येताना दादांनी एक कुठलीशी कॅसेट आणली. त्यावर गाणी ऐकत आम्ही जेवलो असू. पण नंतर बरेच दिवस हवी ती गाणी ऐकायला मिळत नव्हतीच. नाही म्हणायला रोज सकाळी रेडिओ चालत असे. सकाळी बरोबर ७ वाजून ५ मिनिटांनी बातम्या लागत असत. 

"नमस्कार. हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहेत." 

हे वाक्य इतक्या वर्षानंतरसुद्धा ठळक आठवते. तुमच्यापैकी बऱ्याचजणांनादेखील आठवत असेल. कधीमधी आई विविधभारती वर गाणी लावत असे. पण त्यावेळेस आम्ही नेमके शाळेत असू. म्हणजे आपल्याला हवी ती गाणी फक्त कॅसेट्स नसल्यामुळे ऐकायला मिळत नाहीत म्हणून सगळं अडून बसायचं. 

अधूनमधून आम्ही दादांकडे तगादा लावायचो. 

"दादा कॅसेट्स कधी घेणार?"

"घेऊ, घेऊ" ते एवढंच म्हणायचे. 

नंतर एक दोन महिन्यांनी मग मला घेऊन दादा मुंबईला गेले. इकडे तिकडे कामं उरकली. संध्याकाळी आम्ही दोघं आणि अण्णा (माझा चुलता) एका कॅसेट्च्या दुकानात गेलो. कोणत्या कॅसेट्स घ्यायच्या हे दादांनी एका कागदावर लिहून आणलं होतं. त्या लिस्टमध्ये लता मंगेशकर अर्थात सगळ्यांत वरच्या नंबरवर होत्या. मी आपला माझ्या वयाला अनुसरून चित्रपटाच्या गाण्यांच्या कॅसेट्स घ्या असा हट्ट करत होतो. दादा फक्त "जरा थांब, जरा थांब" म्हणत मला थोपवून धरत होते.  

लता मंगेशकर मराठी व हिंदी, किशोरदा, आशा भोसले यांच्या गाण्यांच्या कॅसेट्स दादांनी घेतल्या. नंतर एक कॅसेट सुमन कल्याणपूरच्या गाण्यांची घेतली. एव्हाना माझा हट्ट वाढत चालला होता. तेव्हा बॉर्डर आणि येस बॉस हे चित्रपट आले होते. येस बॉस मधलं "मै कोई ऐसा गीत गाऊ" आणि बॉर्डरमधलं "संदेसे आते है" ही गाणी तेव्हा फिलिप्स टॉप टेनला वरच्या नंबरला होती.मी दादांना आपल्याला ह्या दोन्ही कॅसेट्स हव्यातच असा हट्ट धरला. दादा माझ्या बालसुलभ हट्टाकडे दुर्लक्ष करत बिलींग काउंटरवर गेले. अर्थात माझा हिरमोड झाला होता. त्या दुकानदाराने बहुधा ते ओळखले आणि दादांना म्हणाला,

"इतना सब कॅसेट्स लिया. एक कॅसेट बच्चे के लिये ले लो."

ही मात्रा लागू पडली. आणि दादांनी मला चित्रपटांची नावे विचारली. मी नावे सांगताच त्याने त्या दोन कॅसेट्स पुढ्यात टाकल्या. प्रत्येकीची किंमत तेव्हा ४५ रुपये वगैरे होती. अर्थात महाग!! मग दादा म्हणाले, 

"कोणती तरी एकच घे." 

मी विचारात पडलो. माझं वैचारिक द्वंद्व  दुकानदाराने बरोबर ओळखलं आणि पुढ्यात एक कॅसेट टाकली आणि म्हणाला, 

"ये लेकर जाओ. ए साईडको येस बॉस और बी साईडको बॉर्डर." एका झटक्यात त्याने माझा प्रश्न सोडवला होता. मी खुशीत होतो. सगळी खरेदी घेऊन आम्ही घरी आलो. कधी एकदा जुन्नरला जातो आणि गाणी ऐकतो असं मला झालं होतं. 

जुन्नरला आल्यावर मग रोज गाणी ऐकायची सवयच झाली. कोणती कॅसेट लावायची यावरून आम्हा तिघांत भांडण देखील होत असे. दादांची निवड किती "बाप"होती हे अर्थात आता लक्षात येत होतं. तोपर्यंत फारश्या माहित नसलेल्या गाण्यांच्या मी प्रेमात पडलो. दादांनी प्रत्येक कॅसेट अतिशय काळजीपूर्वक निवडली होती. कुठलीही कॅसेट लावली की अमुक एक गाणं आवडत नाही म्हणून फॉरवर्ड करा असा प्रकार कधी होतंच नसे.

जुन्नरला एका दुकानात रिकाम्या कॅसेटमध्ये गाणी भरून मिळत असत. मग दादांच्या नकळत एक दोन कॅसेट्स मी तशा भरून घेतल्या. दिल चाहता है वगैरे चित्रपटांची गाणी त्या कॅसेटमध्ये टाकल्याचं मला आठवतं. नंतर पुण्याला आल्यावर हॉस्टेलवर टेप वगैरे नव्हताच. इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी कॉम्पुटर घेतला. मग त्यावर गाणी ऐकायला सुरुवात झाली. तरी सुट्टीला जुन्नरला गेल्यावर टेप लागत असे. आईदादा तेव्हासुद्धा सकाळच्या बातम्या लावत असत. २००९ मध्ये मी अमेरिकेला जाईपर्यंत टेप व्यवस्थित चालू होता. नंतर कधी तरी त्याने जीव टाकायला सुरुवात केली. हळूहळू आईदादांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलं.मागे एकदा जुन्नरला गेलो होतो तेव्हा येताना टेप घेऊन आलो. तो चालत नाहीच पण एक आठवण म्हणून असावा म्हणून आपला आणला. नंतर कधीतरी अँटिक म्हणून डिस्प्लेला ठेवता येईल!!

Saturday, August 26, 2017

गणपती आणि मी


गणपतीच्या निमित्ताने एक गोष्ट शेअर करावीशी वाटते..एरवी कधी मंदिरात न जाणारा मी गणपतीच्या दिवसात मात्र का कोण जाणे सगळं मनोभावे करतो..

जुन्नरला आमच्या घरी गणपती नसायचा..पण टेमगिरे आत्याच्या (माझी आत्या) घरी असायचा..तो जणू काही माझ्याच घरचा गणपती आहे असं मला वाटत असे,अजूनही वाटते..अगदी गणपती मूर्ती बूक करण्यापासून ते विसर्जनापर्यंत मी त्यात सहभागी असे.. रविदादा आणि मी दोघंही उत्साहाने सगळं करत असू..मला आठवतं त्याप्रमाणे बऱ्याचदा गणपती प्रतिष्ठापनेच्या वेळी आत्याच्या घरी पौरोहित्य मीच करत असे.. रोज सकाळ संध्याकाळची आरती न चुकता करत असे..ते दहा दिवस उत्साहाचे असत...

नंतर नोकरी निमित्ताने रविदादा पुणे, मुंबईला असायचा..कधी त्याला रजा नाही मिळाली तर आत्या माझ्याकडूनच गणपती बसवून घ्यायची..सगळं काही मी आणि नाना करायचो..माझ्या घरी गणपती नसताना अशा रीतीने का होईना गणपती बाप्पा माझ्याकडून सेवा करून घ्यायचा..हा योगायोग म्हणायचा का?? 

एका वर्षी माझा मित्र आदित्यच्या घरी गणपती विसर्जनाला तो नव्हता..त्याच्या बाबांचे कसलेसे ऑपरेशन झाले होते..त्याने मला पुण्याहून फोन करून सांगितले,

"बाबांबरोबर जाऊन आमच्या घरच्या गणपतीचे विसर्जन कर."  त्या निमित्ताने त्याच्याही घरच्या गणपतीची सेवा झाली..हाही योगायोगच का??

आता पुण्यात आल्यावर गेली ३-४ वर्षे माझ्या बायकोच्या घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना मीच करतोय.. आयुष्यात कुठेही असलो तरी या ना त्या प्रकारे कधीतरी कुठेतरी बाप्पा मला संधी देतोय..

या वर्षीपासून आमच्या सोसायटीमध्ये गणपती आहे.त्याच्या नियोजनात माझा पुरेपूर सहभाग आहेच. 

देव नसला तरी काहीतरी शक्ती हे जग सांभाळतेय असं मी मानतो. "हाच देव आहे" हा भाबडेपणा झाला. या प्रचंड विश्वात जे नियमित व अनियमितही घडते त्यामागे मोठी शक्ति आहे. ह्या आकाराचा, ऊकाराचा, हा देव हे कोणी ठरवले? तर माणसाने. मग माणूसच आधी व मग देव असे समीकरण बसते. नियती सनातन आहे, माणसापूर्वीही ती होती आणि माणूस संपला तरी असणार आहे.नम्र कुठे व्हावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण अंती नियती जे ठरवते तेच घडते. देव माणसाला काही देत नाही व त्याकडून काही घेत नाही. आपल्यासाठी नदी वाहत नाही तर ती वाहते म्हणून आपल्याला पाणी मिळते.आमच्या गावात, थोरांदळ्यात नदी नाही. ती नियती आहे. कोणत्याही देवाला ती आणता आलेली नाही. आता अमूक देव मानला तर सर्व धर्मात ते वेगवेगळे कसे? तुम्हाला जिथे नम्र व्हायला होते तिथे व्हा.मग तो गणपती असेल, अल्ला असेल, येशू असेल किंवा अजूनही काही असेल. फरक काहीच पडत नाही. मी तरी ह्या मताचा आहे.

श्रद्धेत बळ असते असे म्हणतात. मला योग येतोय त्याचा अर्थ  नियती कल्याण करते आहे असा मी घेतो..त्यात मी वाहत जाणार नाहिये हे निश्चित..

Sunday, July 9, 2017

सायकलचोरीची गंमत

पुण्यात असताना आई दादा डेक्कनला रहायला होते. दादांची बँक भवानी पेठेत होती. डेक्कनहून भवानी पेठेत जायला लांब पडे म्हणून दादांनी सायकल घ्यायची ठरवलं. त्यासाठी बँकेतून कर्ज काढून ४२४ रुपयाला सायकल घेतली. कर्जाचा २५ रुपये हफ्ता पगारातून कापला जाई. पुढे जुन्नरला बदली झाल्यावर दादांनी सायकलसुद्धा जुन्नरला नेली. आयुष्यातली पहिली मोठी खरेदी असल्याने दादांचा विशेष जिव होता सायकलवर. 

जुन्नरला असताना बँकेची शाखा सय्यदवाड्यात होती. तिथले लोक हिंदीमध्ये बोलताना मात्र वाडा न म्हणता "बाडा" असा उल्लेख करत. बँक घरापासून फार लांब नव्हती. त्यामुळे दादा पायीच जात असत. सायकल घरीच असे. एकदा त्यांच्या मनात आलं, "आज सायकलवर बँकेत जाऊयात." बँकेत पोहोचल्यावर त्यांनी दारासमोरच्या भिंतीला सायकल लावली. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आले. घरी येताना आपण आज सायकल घेऊन गेलो होतो हे त्यांच्या लक्षात राहिलेच नाही. जेवण करून बिनधास्त झोपलेसुद्धा ते. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना लक्षात आलं की आपली सायकल बँकेतच विसरली आहे. पण अगदी पहाटे जाऊन काही होणार नव्हते. "नंतर बघू" असा विचार करून सगळं आटोपल्यावर मग दादा बँकेत गेले. पाहतात तर सायकल गायब. दादांना धक्का बसला पण स्वतःला सावरून त्यांनी आवाज चढवला,

"यहाँ मेरी सायकल थी. कौन लेके गया?" 

दादांचा मोठा आवाज ऐकून सय्यदवाड्यातले लोक चक्रावले. कारण वाड्यात असे होणे शक्य नव्हते. लोक गरीब होते पण चोर नव्हते. 

"शामतक मेरा सायकल नही मिला तो देखो. मै बराबर देखेगा!!" दादा संतापात जवजवळ ओरडलेच. 

दादांचा पारा चढलेला पाहून २-३ जणांनी जवळ येऊन चौकशी केली. त्यांना दादांनी घडलेला प्रकार सांगितला. 

"सायकल नही मिला तो बाडेकी बदनामी होगी!!" असं बोलून दादा बँकेत गेले. बरीच वर्षे जुन्नरला असल्याने सय्यदवाड्यातले लोक दादांना चांगले मानत. त्यामुळे आता काहीतरी होईल अशी आशा दादांना होती. 

दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास एक पोरगं नाक ओढत दादांकडे आलं आणि म्हणालं,

"साब, ये चाबी लो. सायकल बाहर लगाया है."

दादांना इतका आनंद झाला की त्यांनी पटकन खिशात हात घालून पाच रुपयाची नोट काढली आणि त्या पोराला दिली. 

सायकल चोरीला जाऊनही केवळ बाड्यातले लोक म्हणून ती परत मिळाली असं दादा अजूनही सांगतात. त्या दिवशी मात्र दादांनी न चुकता दुपारीच सायकल घरी नेली. हा किस्सा मात्र आमच्या सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहिला. 

Wednesday, June 28, 2017

गेल्या महिन्यात एका नातेवाईकाच्या घरी लग्न होतं..साखरपुड्याचा कार्यक्रम अगोदरच उरकला होता. त्यामुळे नवरदेवाच्या घरचं वऱ्हाड जरा उशीरानेच विवाहस्थळी पोहोचलं. हळदीचा कार्यक्रम उरकला आणि नवरदेवाला मिरवणुकीला काढायची गडबड सुरू झाली. हळदीचं अंग वगैरे धुवून झाल्यावर नवरदेवाच्या एका मित्राने कपड्यांची पिशवी उचलली. पिशवी हाताला थोडी हलकी लागली म्हणून डोकावून पाहीलं तर त्यात कुर्ताच नव्हता.फक्त सलवार आणि ओढणी. आता आली का पंचाईत!! 

मग सुरू झाली धावपळ.हा म्हणतो इथं असंल तो म्हणतो तिथं असंल.. कुर्ता काही सापडेना.. मग नवरदेवच म्हणाला , "अरे तो अल्टर करायला टाकला होता.तो अजून आणलाच नाहीये."

आता नवरदेवाचीच चूक असली तरी कोणाला त्याला शिव्याही देता येईनात. मग त्याचाच एक मित्र गाडीला किक मारून कुर्ता आणायला गेला. इकडे नवरदेवाच्या भावाने आपले नवे कपडे त्याला घालायला दिले आणि मिरवणूक निघाली. 

मित्र दुकानात पोहोचला खरा.पण पावती न्यायला विसरला. पावती नाही म्हटल्यावर दुकानातले लोक काही ऐकेनात. पावती असल्याशिवाय कपडे मिळणार नाही अशी त्यांची भूमिका. नवरदेवाच्या मित्राने त्याचा आयफोन ठेवायची तयारी दाखवली, पॅन कार्डसुद्धा ठेवतो म्हणाला पण काही जमेना.. मावळी गडी शेवटी तो. काहीच होईना म्हटल्यावर त्याने शेवटचा पर्याय म्हणून आवाज वाढवला. ही मात्रा मात्र लागू पडली आणि कुर्ता घेऊन तो लग्नाच्या हॉलच्या दिशेने सुसाट निघाला.. तोपर्यंत मिरवणूक अर्ध्या रस्त्यात आली होती. पण हा मित्र वेळेवर पोहोचला. मग हॉलवर पोहोचण्याआधी मिरवणूक मध्ये थांबवली गेली.  सगळ्यांनी कोंडाळे केलं आणि नवरदेवाला बाजूला घेऊन त्याला कुर्ता घातला आणि मिरवणुकीच्या रथात बसवला..

असा हा विवाहसोहळा शेवटपर्यंत उत्कंठावर्धक आणि आलेल्या पाहुण्यांची करमणूक करणारा ठरला.. 


Monday, May 22, 2017

डुंबरे सर

"देवः देवौ देवाः --- प्रथमा
 देवम् देवौ देवान् --- द्वितीया"

"इकडे लक्ष द्या." शब्द चालवत असताना मध्येच थांबून आपल्या ठराविक शैलीमध्ये सर मुलांना बोलत असत. 

सरांचा आणि माझा संबंध आठवीत आला. तोपर्यंत सर शाळेच्या नॊकरीतून निवृत्त झाले होते. पण आठवी ते दहावीच्या वर्गांचे संस्कृत आणि इंग्रजीचे क्लास मात्र सरांनी सुरु ठेवले होते. माझ्या अगोदर माझ्या दोन्ही बहीणी सरांकडे क्लासला जात होत्या. त्यामुळे मीही जाऊ लागलो. 

आमची शिकवणी सरांच्या घरी पहिल्या माळ्यावर एका मोठ्या हॉलमध्ये होत असे. दोन शिकवण्यांच्या मध्ये सर खाली जात असत. तेवढ्या वेळात आम्ही वर जाऊन बसत असू. सर नाहीयेत म्हटल्यावर दंगा सुरु असे. दाराजवळ बसलेला मुलगा मध्येच बाहेर डोकावून सर आलेत की काय याची खात्री करत असे. तो आमचा पहारेकरीच म्हणा ना. बऱ्याच वेळेस तो केतन पडवळच असे. सरसुद्धा आमचे सरच होते शेवटी!! कधी कधी सर दारात येऊन शांतपणे आमचा दंगा बघत असत. शेवटी कोणाला तरी कळे आणि आम्ही गप्प बसत असू. दारात उभं राहून मुलांचा दंगा पाहण्यात त्यांना बहूधा मजा वाटत असावी. कारण त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळेस एक मिश्किल हसू असे. 

आठवीत आम्हाला सरांनी पाठ्यपुस्तकापेक्षा व्याकरण जास्त शिकवलं. त्यासाठी आमची भरपूर तयारी त्यांनी करून घेतली. माझं आणि माझ्यासारख्या अनेकांचं इंग्रजी व्याकरण सरांमुळेच पक्कं झालं.मी आठवीत असताना माझी ताई बारावीत होती. तिचा बारावीचा इंग्लिशचा पेपर झाल्यावर सरांनी मला सांगितलं, 

"गुंड, उद्या येताना दीप्तीचा इंग्लिशचा पेपर घेऊन ये."

दुसऱ्या दिवशी आमच्याकडून बारावीच्या इंग्लिशच्या पेपरमधलं सगळं व्याकरण त्यांनी सोडवून घेतलं. आठवीत असणाऱ्या आम्हा सगळ्यांना स्वतःचाच फार अभिमान वाटला त्यावेळेस!! 
आपल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम सर हे असं करत असत. 

व्याकरणात रोज काहीतरी नवीन शिकवायचे सर. त्याची तयारी करून घ्यायचे आणि मग आम्हाला घरी सोडायच्या आधी होमवर्क द्यायचे. दुसऱ्या दिवशी गेलं की त्यांचा प्रश्न ठरलेला असे,

"होमवर्क दिलाय का?"

मग आधी तो होमवर्क आमच्याकडून सोडवून घेत आणि त्यानंतर पुढे शिकवायला सुरुवात करत. 

तीन शब्दांचं एक वाक्य १२ काळांत चालवायला सरांनीच आम्हाला शिकवलं. आणि रोज शिकवणीला सुरुवात करण्याअगोदर कोणातरी एका विद्यार्थ्याला एक वाक्य देऊन ते १२ काळांत चालवायला सर सांगत. नकळतपणे सगळ्याच विद्यार्थ्यांची तयारी होत असे. इंग्रजी नुसतं बोलता आलं पाहिजे यावर सरांचा कधीच विश्वास नव्हता. तर व्याकरणदृष्ट्या बरोबर इंग्रजी बोलता आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे आम्ही सगळेच चांगलं इंग्रजी बोलू लागलो. आजही बोलताना एखाद्याने काही चूक केली तर ती मला खटकते. 

आमच्या घरी इंग्लिश पेपर सुरु करण्याचं श्रेय सर आणि बाईंना जातं. सरांचा मुलगा आशुतोषचं जेव्हा यूपीएससीमध्ये सिलेक्शन झालं तेव्हा त्यांचं अभिनंदन करायला आमचे दादा त्यांच्या घरी गेले होते. बाईंशी बोलताना दादांनी त्यांना विचारलं,

"हे कसं जमवलं तुम्ही?"

"साहेब माझी नोकरी होती. घरातही काम असेच. अशात मग पेपर वाचायला वेळ सापडत नसे. मग मी आशुतोषला पेपर वाचून दाखवायला सांगत असे. तोही अगदी मोठ्या माणसासारखा पेपर धरून वाचीत असे. जसा जसा तो मोठा होत गेला तसा तो पेपर वाचायला चटावलाच जणू. पेपरवाल्याची वाट बघू लागला. थोडा उशीर झाला तर बैचेन होऊ लागला."

हे एकूण दादा त्यांना म्हणाले,

"बाई तुम्ही दोघंही नोकरीला होतात. त्यामुळे तुम्हाला २ पेपर घेणं परवडलं. पण मी मात्र एकटा. माझं गणित कसं बसणार?"

त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडिया दोन रुपयाला असे. ते डोक्यात ठेवून बाई म्हणाल्या,

"माझा हिशोब साधा होता. मुलाने एक नवीन शब्द शिकला की माझे २ रुपये वसूल असे मी समजत असे. तुमच्याकडे तर दोन मुली आणि एक मुलगा असे तिघेजण आहेत. प्रत्येकाने एकेक शब्द शिकला तर तीन शब्दांचे सहा रुपये होतात. तुम्ही उलट चार रुपये फायद्यात जाणार."

हे ऐकून दुसऱ्याच दिवशी दादांनी घरी इंग्लिश पेपर सुरु केला तो आजतागायत सुरु आहे. 

इंग्रजीचा क्लास झाला की आमचा संस्कृतचा क्लास असे. इंग्रजी शिकवताना वाक्यरचनेवर भर देणारे सर संस्कृत शिकवताना मात्र कशीही वाक्यरचना करायची मुभा आम्हाला देत. आणि आम्हाला सांगत सुद्धा,

"संस्कृतच हे एक बरं आहे. सिंटॅक्सचा फारसा प्रश्न येत नाही इथे."

वर सांगितल्याप्रमाणे देव, वन, मालापासून सगळे शब्द सर आमच्याकडून म्हणून घेत. संस्कृतमध्ये पाठांतराला पर्याय नाही हा त्यांचाच धडा. त्यामुळे शाळेत कधी संस्कृतमध्ये आम्हाला अडचण आली नाही. 

सरांची स्मरणशक्तीसुद्धा अतिशय तल्लख होती. एकदा आम्हाला होमवर्क म्हणून सरांनी चाळीस शब्द दिले होते. त्या दिवशी आमचा एक मित्र नेमका उशिराने आला. त्याच्यासाठी ते शब्द सर पुन्हा सांगू लागले. सांगायला सुरुवात करण्याअगोदर आमच्यातल्या एकाला सर म्हणाले,

"आत्ता दिलेले शब्द मी पुन्हा सांगतो. ते त्याच क्रमाने येतात का हे चेक कर."

आम्ही सगळे सावरून बसलो. सर कुठे चुकतात का हे आम्ही पहात होतो. सर त्याच क्रमाने एकेक शब्द सांगत होते. असं करत करत सरांनी चाळीसच्या चाळीस शब्द आधी सांगितलेल्या क्रमानेच पुन्हा सांगितले. आम्ही सगळे सरांकडे आश्चर्याने बघतच राहिलो होतो. 

त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते. पण कॉर्डलेस फोन असत. सरांकडेसुद्धा असाच कॉर्डलेस फोन होता. शिकवताना तो बाजूला ठेवून ते शिकवत असत. एखाद्या वेळेस कधी फोन आलाच तर तो उचलून त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये ते "हॅलो" म्हणत असत. आम्हा सगळ्यांना त्याची तेव्हा मजा वाटे आणि आम्ही भरपूर हसत असू. 

शिकवणीच्या हॉलला एक बाल्कनी होती. तिथे २-३ बरण्यांमध्ये बाई गुलकंद बनवायला ठेवत असत. एक दिवस शिकवणी सुरु होण्याअगोदर मी आणि विन्या बाल्कनीमध्ये जाऊन चोरून गुलकंद खात होतो. सर कधी आले आणि आमच्याकडे पहात उभे राहिले आम्हाला कळलंसुद्धा नाही. थोडा वेळ झाल्यावर आम्हाला आवाज आला, 

"तुमचं झालं असेल तर या आता आतमध्ये."

सरांच्या बागेतल्या कैऱ्या,स्ट्राबेरीज शिकवणीला येणारी मुलं चोरून खात असत. एवढंच काय शिकवणीच्या हॉलच्या मागच्या बाजूला असलेले कांदेसुद्धा मुलं खिशात भरून नेत असत. पण सर कधीही कोणाला काही बोलल्याचं मला आठवत नाही. 

शिकवणी संपल्यावर मुलांना घरी सोडायची सरांची स्वतःची एक खास पद्धत होती. सगळ्यात लांब राहणाऱ्या मुलांना ते आधी सोडत. पण हे करत असताना जुन्नरमधल्या वेगवेगळ्या पेठांची नावे ते घेत. म्हणजे पणसुंबा पेठ, सदाबाजार, ब्राम्हण बुधवार, राष्ट्रीय तेली बुधवार असे करत करत सगळ्यात शेवटी कल्याण पेठ येत असे.मग आम्हाला घरी जायला मिळत असे. 

सरांनी शिकवलेल्या संस्कृतचा बारावीपर्यंत उपयोग झाला. इंग्लिशचा अजूनही होतोच आहे. हळूहळू सरांनी शिकवण्या बंद केल्या. आताही सर या ना त्या कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात. इतक्या वर्षानंतरदेखील तब्येत अजूनही राखून आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. 

Sunday, May 7, 2017

९ अ विरुद्ध ९ ड


"आपण खो-खो आरामात जिंकतोय. फायनलला बारकी पोरं आहेत. पण कबड्डी फायनल काहीही करून जिंकलीच पाहिजे."

९ ब विरुद्धची खो खो ची सेमी फायनल जिकल्यानंतर मी टीमबरोबर बोलत होतो. कबड्डी फायनल ९ ड बरोबर होती. त्यांच्याकडे जंप्या, आमले सारखे खेळाडू होते. त्यांचा खेळ आडदांड असे तर आम्ही तंत्रावर विश्वास असलेले खेळाडू होतो. शाळेच्या कबड्डी संघातले ४-५ जण आमच्याच वर्गातले होते. तरी आम्हाला ९ ड ची भीती होती. नेहमीच्या रितीरिवाजाप्रमाणे ८ अ, ९ अ आणि १० अ एका बाजूला तर उरलेली आख्खी शाळा एका बाजूला होती. अ तुकडीचा इतरांना इतका का राग असे हे कोडं मला अजूनही उलगडलेलं नाही. माईकवर सामन्याची घोषणा झाली तसे आम्ही सगळे मैदानाकडे जाऊन वॉर्मअप करू लागलो. 

मी डावा तर गणेश चिमटे उजवा सातवा लावत असे. एखंडे,कुलकर्णी पाचव्याला असत. माझ्या हाताला कर्पे सहावा असे. आमची टीम चांगलीच होती पण का कोण जाणे त्या दिवशी सगळेच जरा टेंशनमध्ये होते. ९ ड ने नाणेफेक जिंकली आणि पहिल्या एंट्रीलाच जंप्या आला. तो खरं तर रायडर नव्हता. पहिली एंट्री सेफ टाकून तो परत गेला. आमच्याकडून पहिली एंट्री एखंडेने मारली. तोही सेफ परत आला. मग ९ ड चे आक्रमण सुरु झाले. काही कळायच्या आत त्यांनी आमच्यावर लोण चढवला. गुणसंख्या ०-७. परत सगळे खेळायला आले. 

"मला आता सेफ एंट्री नकोय. पॉईंट पाहिजे." आमचा कर्णधार गण्या एव्हाना तापला होता. 

आमच्या वर्गातल्या मुली हिप हिप हुर्रे करत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होत्या. ह्यात भक्ती कायम पुढे असे. मी तिला खुणेनेच चिअरिंग करू नका असं सांगितल्याच मला आठवतंय. उरलेले सगळे प्रेक्षक ९ ड ला प्रोत्साहन देत होते. अशात एखंडे एंट्रीला गेला. एखंडे म्हणजे आमचा भरवशाचा रायडर. शांत डोक्याने खेळणारा. आपल्या मजबूत शरीरयष्टीचा यथायोग्य वापर करणारा. त्याने त्या एंट्रीला दोन पॉईंट काढले. गुणसंख्या २-७. 

एव्हाना मध्यांतर जवळ आले होते.  त्यामुळे ९ ड ने सावध पवित्रा घेऊन सेफ एंट्री मारली. परत एखंडे एंट्रीला गेला. तो जाण्याअगोदर पंच ढमाले सरांनी शिट्टी वाजवून लास्ट एंट्री असा इशारा केला. मध्यंतराला आपली पिछाडी थोडी तरी भरून काढावी असं आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं. अपेक्षेप्रमाणे एखंडेने एक पॉईंट काढला आणि आमची गुणसंख्या ३ वर नेली. 

सामन्याच्या मध्यांतरात आमची चर्चा चालू होती. काय केलं पाहिजे? कोणी पाणी पीत होतं, कोणी खरचटलेल्या गुडघ्याची काळजी घेत होतं. इतक्यात माझं लक्ष जंप्याकडे गेलं. त्याने शर्ट बदलला होता. मूळचा टी शर्ट काढून त्याने डेनिमचा शर्ट घातला होता. त्याला तो शोभतदेखील होता. पण जंप्याची वेळ चुकली होती. मी पोरांना लगेच कोंडाळं करायला सांगितलं. 

"जंप्याचं मॅचमध्ये लक्ष नाहीये. ही मॅच आपली आहे. त्याच्या एंट्रीला फक्त त्याला उचला की आपण ही मॅच घेतोय." 

मी भक्तीला माझ्याजवळ बोलावलं आणि तिच्या कानात सांगितलं,

"तिला पुढे बसव."

तिच्या पुढच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत मी परत टीमकडे गेलो. आमच्या वर्गातली एक मुलगी जंप्याला आवडत असे. तिला इंप्रेस करायला म्हणा किंवा अजून काही पण त्याने तो डेनिमचा शर्ट घातला आणि माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. ठरल्याप्रमाणे भक्तीने "तिला" आपल्याबरोबर अगदी मैदानाला लागूनच बसवले. सामना सुरु झाला. जंप्या एंट्रीला आला. त्याने माझ्या बाजूने खोलवर चढाई करायला सुरुवात केली. मी मागे जात राहिलो. जंप्या खेळाडू म्हणून चांगलाच होता. कव्हर नाचवणे हा प्रकार त्याला चांगला जमत असे. पण आज तो एकाच बाजूने खोल चढाई करायचा प्रयत्न करत होता. पुन्हा एकदा तो माझ्या बाजूला आला आणि काही कळायच्या आत एखंडे, कुलकर्णी ने त्याला चेन लावली. गण्याने मागून अजून एक तडाखा दिला आणि जंप्या मैदानाबाहेर फेकला गेला. प्रेक्षकांमध्ये एकच गलका झाला. पुन्हा एकदा हिप हिप हुर्रे चा आवाज दुमदुमला. जंप्याच्या पकडीने मनोबल उंचावलेले आम्ही आता मॅच जाऊ द्यायची नाही अशाच निश्चयाने खेळू लागलो. तर आपला म्होरक्याच गारद झाला म्हणून ९ ड चा संघ दडपणाखाली आला. 

पुन्हा एकदा आमचा हुकमी एक्का एखंडे एंट्रीला गेला. आता मात्र त्याने दाणादाण उडवायची असंच ठरवलं असावं. २ पॉईंट्स घेऊन एखंडे परतला. सामन्याचा नूर अचानक पालटला होता. एकीकडे सूर्य मावळतीला जात होता आणि एकीकडे एकेक करत आम्ही ९ ड चे खेळाडू बाद करत होतो. जंप्या, आमले सारखे खेळाडू आमच्या या तडाख्यापुढे निष्प्रभ ठरत होते. कर्णधार आणि उपकर्णधारच धारातीर्थी पडल्याने इतरांचेही उरलेसुरले बळ निघून गेले होते. सामन्याच्या उत्तरार्धामध्ये ९ ड ला एकही गुण घेता आला नव्हता. एक लोण, दोन लोण करत आम्ही शेवटचा घाव घालत त्यांच्यावर तिसराही लोण चढवला आणि सामना  संपल्याची शिट्टी वाजली. गुणसंख्या होती २१-७. मैदानात एकच जल्लोष झाला. कबड्डीची फायनल आम्ही जिंकली होती. 

प्रतिस्पर्ध्याचा कच्चा दूवा वेळीच ओळखून त्याबरहुकूम खेळ केल्याचा आम्हाला फायदा झाला होता. माझी क्लृप्ती काम करून गेली होती. सामन्यानंतर मी जंप्याला जवळ जाऊन तू शर्ट बदलालास तेव्हाच तू सामना गमावला होतास असं सांगितल्याचं आठवतं. अजूनही शालेय जीवनातील एक ठळक आठवण म्हणून हा सामना माझ्या मनात घर करून आहे.

Friday, April 28, 2017

गोल्ड पार्टनर


"अरे तुम्ही तर गोल्ड पार्टनर आहात. याचा अर्थ तुम्हाला उबर ने काहीतरी अवॉर्ड वगैरे दिलेलं असलं पाहिजे." 

एअरपोर्टवरून घरी यायला कॅबमध्ये बसताच मी ड्रायव्हर बरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. कामानिमित्त बऱ्याचदा पुण्याबाहेर जावं लागतं. त्यानिमित्ताने कॅबने एअरपोर्टला जाणे येणे होते. उगाच अर्धा पाऊण तास गप्प बसण्यापेक्षा किंवा मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्यापेक्षा ड्रायव्हर बरोबर गप्पा मारायचा छंद जडलाय मला. 

"हो सर. २०१६ मध्ये मी ३५०० हुन जास्त ट्रिप्स पूर्ण केल्या. आणि माझ्या नशिबाने कस्टमर लोकांनी मला रेटिंग सुद्धा चांगलं दिलं. त्यामुळे हे सर्टिफिकेट मिळालं." ड्रायव्हरने मला माहिती दिली. 

माझी उत्सुकता वाढली आणि मी नेहमीप्रमाणे त्याच्याबरोबर गप्पा मारू लागलो. 

"एवढ्या ट्रिप्स पूर्ण कशा केल्या पण तुम्ही? मी तर ऐकलं की बऱ्याचदा चार चार तास एकसुद्धा ट्रिप मिळत नाही."

" सर मी  माझ्या कस्टमरला जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो."

"म्हणजे नक्की काय करता तुम्ही?" 

"मी कधीच कस्टमरला कुठे जायचंय हा प्रश्न विचारत नाही. कितीही उशीर झालेला असू देत, मला माझ्या घराच्या उलट दिशेला जावं लागलं तरी मी कुठलीही तक्रार न करता ट्रिप पूर्ण करतो. तुम्ही लोकसुद्धा लांबून आलेले असता, लवकर घरी जावं असं तुम्हालाही वाटत असतं. अशा वेळेस केवळ मला त्या दिशेला जायचं नाही म्हणून ट्रिप नाकारणं माझ्या स्वभावात बसत नाही. ह्या गाडीवर माझं कुटुंब चालतं. मग मीच जर धंद्याला नाही म्हटलं तर तो धंद्याचा अपमान नाही का?"

त्याचे स्पष्ट विचार ऐकून मी अवाक झालो. 

"पण हल्ली उबर ओलाने ड्रायव्हर लोकांचे इन्सेंटीव्ह कमी केलेत म्हणे. तरीसुद्धा तुम्हाला परवडत का हो?" मी अजून एक प्रश्न त्याच्यावर फेकला. 

"सर न परवडून सांगणार कोणाला. गाडी बंद केली तर खाणार काय? आम्हीसुद्धा दोन दिवस संप केला होता. पण उबरवाल्यांनी भिकसुद्धा घातली नाही. गाड्यासुद्धा इतक्या झाल्यात आता पुण्यात. पाच पन्नास जणांनी संप केल्याने त्यांना काय फरक पडणार असा. आम्ही आपले परत ड्युटीवर आलो."

"मग महिन्याला कितपत शिल्लक राहते हातात?"

"सर डिझेल, गाडीचा इन्शुरन्स, महिन्याचा मेंटेनन्स वजा केला तर १८ ते २० हजार हातात पडतात.त्यातून साडेपाच हजार घरभाडं जातं. उरलेल्या पैशात घर चालवतो मी."

"घरी कोण असतं?"

"बायको आहे सर आणि तीन वर्षाचा मुलगा आहे."

"अरे वाह."

"मला शिकायला जमलं नाही सर. शाळेत माझं काही डोकं चालायचं नाही. त्यामुळे मी गाडी चालवायला सुरुवात केली."

"पुण्यात किती वर्षं झाली?"

"बारा वर्षं झाली सर. सहा वर्षं मी टाटा मोटर्सला काढली. नंतर चार वर्ष पुण्यातल्या एका बिल्डरकडे ड्रायव्हर म्हणून काम केलं. पण तिथे पगार फारसा वाढत नव्हता म्हणून मग स्वतःची गाडी घेतली."

"हे बरं केलंत."

"मग काय सर. आता मी मला पाहिजे तेव्हा गाडी चालवतो. पाहिजे तेव्हा आराम करतो. उबरच्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात. इतक्या ट्रिप्स केल्या की इतका इन्सेंटिव्ह, वीकएंडला इतक्या केला की इतका. माझ्या आठवड्याच्या ट्रिप्स शुक्रवारी सकाळी पूर्ण झाल्या तर मी सरळ डिव्हाईस बंद करतो आणि घरी जातो. घरी बायको आणि मुलाबरोबर वेळ घालवतो. काही खरेदी असेल तर तिघेजण डी मार्टला जाऊन खरेदी करतो. जमल्यास एखादा चित्रपट पाहतो किंवा हॉटेलला जेवायला जातो."

"वा !!"

"आठवडाभर मी गाडी चालवतो सर. मग एखादा दिवस बायको आणि मुलासाठी दिला पाहिजे ना."

"बरोबर आहे."

"मग ट्रिप्सचा कोटा पूर्ण झाल्यावर अजून ट्रिप्स का नाही करत?"

"अजून ट्रिप्स करून करणार काय सर? महिन्याला दोन किंवा तीन हजार रुपये जास्त मिळणार. काय करायचं पैसे कमावून? माझ्या मुलाला त्याचा बाप एक पूर्ण दिवस तरी भेटला पाहिजे. नाहीतर पैशाचा उपयोग काय. त्याच्यासाठी तर करतोय मी सगळं."

"खरंय तुमचं." असं म्हणून मी गप्प झालो. थोडा वेळ शांततेत गेल्यावर पुन्हा मी त्याला विचारलं, 

"स्वतःच घर का नाही घेत?"

"पैसे साठवायला सुरुवात केली आहे सर. माझी बायको बी.ए. बी. एड. आहे. आता तिला एखाद्या ठिकाणी छोटी मोठी नोकरी मिळाली की थोडं बरं होईल. दोघं मिळून मेहनत करू. नशीब जोरावर असेल तर होऊन जाईल घरसुद्धा."

"होणार होणार नक्की होणार. इतके कष्ट केल्यावर घर का नाही होणार."

"तुमच्यासारख्या लोकांच्या शुभेच्छा असल्या की बरं वाटतं सर."

एव्हाना घर आलं होतं. गाडीतून उतरताना मी शंभर रुपयांची एक नोट पुढे करत त्याला म्हटलं, 

"खूप ड्रायव्हर भेटतात मला. पण तुमच्यासारखे स्पष्ट विचार असणारे, कष्टाळू कमीच असतात. हे पैसे तुमच्या मुलासाठी असू द्यात."

"अहो सर पैशाचं काय एव्हढं. असू द्यात."

"तुम्हाला नाहीच देत मी. पण तुमच्या मुलासाठी ठेवा. परत कधी भेटलोच अजून गप्पा मारू."

लिफ्टमध्ये शिरताच हा माणूस आपल्याला किती फंडे शिकवून गेला या विचारात मी गुंतून गेलो. 

Tuesday, April 4, 2017

विन्या

"लोड नको घेऊ रे तू. होतंय सगळं."

एखाद्या जटिल प्रश्नावर आम्ही सगळे बसून डोकेफोड करत असताना विन्या सहज असं बोलून जायचा. आयुष्याकडे सहजपणे बघा, पुढे चालत रहा, मार्ग दिसत राहील असा साधासुधा फंडा होता त्याचा. 

३१ डिसेंबर २००७  ला विन्या गेला. आजही अगदी ठळकपणे आठवतोय तो दिवस. माझा डिझाईनचा पेपर देऊन मी बाहेर आलो. फोन चालु केला आणि लगेचच मेसेज आला. आदित्यचा मेसेज होता तो. लगेच फोन करायला सांगितलं होतं मला. त्याने फोनवर मला सांगितलं,

"विन्या मेजर सिरीयस आहे. तू हॉस्पिटलला ये." 

क्षणभर सुन्न झालो मी. पुसटशी कल्पना सुद्धा आली मला.पण अजून वेळ वाया न घालवता लगेच गाडीला किक मारून निघालो. विचारांच्या तंद्रीत हॉस्पिटलला कसा पोहोचलो माझे मलाच कळले नाही. तिथे गेल्यावर इतका वेळ इतरांना धीर देत असलेल्या आदित्यने मला मिठी मारली. त्याला स्वतःला सावरायला सांगून मी आतमध्ये गेलो. तिथले दृश्य अतिशय विदारक होतं. काका काकूंनी मला पाहुन पुन्हा एकदा आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. गणेश त्यांना सावरत होता. बाजूला विन्या शांतपणे पहुडला होता. नेहमीच हसतमुख असणारा त्याचा चेहरा आजही अगदी तसाच हसतमुख होता. 

विन्या आणि मी जवळ आलो ते साधारण दहावीच्या सुमारास. दर शनिवारी आम्ही शनी मंदिरात जात असू. देवदेव करणारे नव्हतो आम्ही. पण त्या निमित्ताने शनीला येणाऱ्या मुलीही दिसत आणि आम्ही सगळेजण एकमेकांना भेटत असू. मंदिरात जाऊन आलं की विन्याच्या घराबाहेर आमचा कट्टा ठरलेला असे. सगळे मिळून सात आठ जण असू आम्ही. दर १५- २० मिनटाला विन्याची आई आम्हाला म्हणत असे, "अरे आतमध्ये येउन बसा." आणि मग विन्याचे वडील त्यांना म्हणत, "आतमध्ये आले तर शनिमंदिरात जाणाऱ्या आणि येणाऱ्या मुली कशा दिसतील त्यांना." साधारण एक तासभर तिथे थांबून आम्ही मग फिरायला जात असू. हा दर शनिवारचा कार्यक्रम पुढची काही वर्षे न चुकता चालू राहिला. 

विन्या सतत सगळ्यांबरोबर मिळून मिसळून असायचा. अगदी दहावीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत प्रत्येक परीक्षेच्या आधी त्याचा फोन यायचा. 

"यार बेकार टेन्शन आलयं. काय करावं काही सुचत नाहीये." आणि मग पुढची १०-१५ मिनिटे मी त्याला कसा त्याचा अभ्यास झालेला आहे हे पटवून देत असे. मग मात्र स्वारी खुश असे. पुढे कॉलेजला गेल्यानंतर तिसऱ्या वर्षी असंच त्याला परीक्षेचं टेन्शन आलं. 

"मी काही आता परीक्षा देत नाही. माझा काही अभ्यास झाला नाहीये. मी यावर्षी ड्रॉप घेतो."

पोरगं असं करायला लागल्यावर त्याच्या वडिलांनी आम्हाला बोलावून घेतलं. परत एकदा आधीसारखी आम्ही विन्याची समजूत घातली आणि त्याला परीक्षेला बसवला. मार्कही चांगले पडले त्याला त्या वर्षी. 

गणपतीच्या दिवसांत त्याच्या उत्साहाला काही सीमा नसे. घरचा गणपती आणि पेठेचा गणपती या दोन्हीमध्ये अगदी खंदा कार्यकर्ता असे तो. शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीमध्ये नाचावं ते त्यानेच. कुठला शर्ट घालायचा इथपासून त्याची तयारी असे. गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळ झाली की आम्हाला सगळ्यांना विन्याच्या आईने बनवलेल्या बटाटा वड्यांचे वेध लागत. त्याच्या घरी जाऊन काकूंच्या हातचे गरम गरम वडे खाऊन आम्हे पुन्हा नाचायला जात असू. 


विन्याची उंची हा कायम आमच्या चर्चेचा विषय असे. त्याच्या घरातले सगळे जण ६ फुटापेक्षा जास्त उंचीवाले होते. विन्या एकटाच ठेंगू होता. इतका की दहावीपर्यंत तो पहिल्या बाकावर बसत असे. अकरावीत गेल्यावर अचानक त्याची उंची वाढली आणि तोही सहा फुटांच्या वर गेला. त्याची उंची अशी अचानक कशी वाढली यावर आम्ही चर्चा करत असू. रोज कॉलेजला जाण्याआधी विन्या माझ्या घरी येत असे. आमच्या घरात त्याची खुर्चीसुद्धा ठरलेली असे. ती खुर्ची सोडून इतर कुठे तो कधीच बसला नाही. 

बारावीनंतर पुण्यात यायला मिळालं नाही म्हणून तो काहीसा निराश झाला होता. पण काही दिवसातच त्याने त्याच्या कॉलेजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा मनमिळाउ स्वभाव त्याला तिथे कामाला आला. पण पुण्याची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नसे. जरा कुठे सुट्टी मिळाली की विन्या गाडी पकडून पुण्याला येत असे. २-३ दिवस आमच्याबरोबर पुण्यात मजा करून जात असे.

आपल्या दहावीच्या बॅचचं गेटटुगेदर करायचं असं विन्या कायम म्हणायचा. माझ्याकडे आणि डॉक्टरकडे (आदित्य कुलकर्णी) त्याने बऱ्याचदा हा विषय काढला होता. पण आम्हे नेहमी काही ना काही कारण सांगून तो विषय टाळत असू. नेमकं तेव्हाच आम्ही आमच्या होस्टेलच्या मित्रांचा एक स्वेटशर्ट बनवला होता. तो पाहिल्यावर आपण आपल्या गेटटुगेदरला असाच एक टीशर्ट बनवू अशी त्याची टिमकी सुरु झाली होती.  

एकदा जुन्नरहून पुण्याला येत असताना आदित्यने माझ्याकडे गेटटुगेदरचा विषय काढला. 

"गुंड्या आपण गेटटुगेदर केलं पाहिजे."

"अरे मग करू की. घाई काय आहे एवढी?"

"घाई आहे."

"का काय झालं असं?"

"विन्या फार दिवस राहील असं वाटत नाहीये. त्याचं दुखणं दिसतं तेवढं साधं नाहीये. विन्या फारतर सहा महीने आपला सोबती आहे."

आदित्यच हे वाक्य ऐकून मी सुन्न झालो. मी गाडी बाजूला घेतली आणि उतरून त्याच्याशी बोलू लागलो. 

"हो विन्याला झालेला कॅन्सर बरा होणारा नाहीये. आपल्याला लवकरात लवकर गेटटुगेदर केलं पाहिजे."

करू असं म्हणून आम्ही पुण्याकडे निघून गेलो. 

माझा हात दुखतो अशा छोट्या तक्रारीपासून सुरु झालेलं दुखणं कॅन्सर असेल असं आम्हा कोणालाच वाटलं नव्हतं.त्याचा कॅन्सर डीटेक्ट झाल्यापासून ३-४ महिन्यात विन्या गेला. जाण्यासाठीसुद्धा त्याने ३१ डिसेंबर निवडला. विन्या गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा पेपर होता. दादांना फोन करून मी विचारलं, 

"उद्या पेपर आहे. काय करू? येऊ का जुन्नरला?"

"तू येऊ नकोस." इतकं बोलून दादांनी फोन ठेवला. मला येऊ नको म्हटले तरी त्यांनी आईला सांगून ठेवलं होतं की, "तो आला तर त्याला काही म्हणू नकोस."

विन्याला निरोप द्यायला मला जमलं नाही. पण तो असता तरी त्याने मला पेपरलाच जायला सांगितलं असतं याची मला खात्री आहे. गणेशच्या लग्नात नाचण्याची त्याची इच्छा पूर्ण झालीच नाही. त्याच्या जाण्याने सगळ्यांनाच चटका लावला. जुन्नरच्या घरात हॉलमध्ये रिकामी खुर्ची पाहिली की अजूनही विन्याची आठवण येते. आजही दर वर्षी गणपती आणि ३१  डिसेंबरला त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

Saturday, March 25, 2017

अविस्मरणीय के२एस

कात्रज ते सिंहगड, कात्रज ते सिंहगड लई ऐकलं होतं कॉलेजला असताना.. पण नक्की काय असतं कधी कळलंच नाही..१०-१२ डोंगर चढून उतरून जावं लागतं इतकंच काय ते माहित होतं..

वर्ष दीड वर्षांपूर्वी किल्लेदारीचा सभासद झालो..ट्रेकिंग वगैरे फार कधी केलंच नव्हतं.. पण आता संतोष भाऊंनीच ग्रुप काढला म्हटल्यावर सभासद तर झालो..ट्रेकला जायचं की नाही पुढची गोष्ट होती..ग्रुप पण लई बेकार आहे हा..नुसतं सभासद असून चालत नाही..ग्रुपबरोबर नाही तर स्वतःने अधून मधून ट्रेक करत रहावं लागतंय..नाहीतर ग्रुपमधून काढून टाकतात.. एक दोन छोटे मोठे ट्रेक केले होते मी..पण कात्रज ते सिंहगड म्हणजे शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारा ट्रेक असणार याची जाणीव होती..ऐन वेळेस स्टॅमिना कमी पडला तर अर्ध्यातून ट्रेक सोडायला लागू नये अशी माझी माफक अपेक्षा स्वतःकडून होती..

गेल्या आठवड्यात ट्रेक डिक्लेअर झाला..आधी संतोषदादाला मेसेज केला..म्हटलं, 

"मला जमलं का रे?" 

त्याचा रिप्लाय आला,

 "१४-१५ डोंगर चढून उतरावे लागतात.टोटल डिस्टन्स १६-१७ किमी होतं. भलेभले थकून जातात. तुला यायचं असलं तर निदान राहिलेल्या २-३ दिवसात सकाळी २-३ किमी चालायची प्रॅक्टिस कर.बरं एवढं करूनही त्रास होणार नाही असं नाही."

मी म्हटलं,"तू एनकरेज करतोय की भीती घालतोय."

"तू चल. बाकीचं बघू तेव्हाचं तेव्हा."

शुक्रवारी संध्याकाळी ट्रेकला येणारे सात जण कात्रजला भेटलो.तिथून एक व्हॅन पकडून कात्रजच्या बोगद्याला उतरलो.तिथून चढायला सुरुवात केली. पहिल्याच डोंगराला वाट चुकली. रानातून वाट काढत काढत चढाई सुरु होती. वर चढताना मोकळी झालेली माती परीक्षा पहात होती.एका ठिकाणी जरा विश्रांतीला थांबलो तर डोंगरावरुन दोन मोठी साळिंदर आमच्या दिशेने पळत येताना दिसली. आम्हाला घाबरून म्हणा किंवा अजून काही म्हणा त्यांनी आपला मार्ग बदलला आणि दुसऱ्या वाटेने निघून गेली. एव्हाना पहिला डोंगर चढून माथ्यावर आलो होतो. वारं लागत होतं त्यामुळे जरा बरं वाटत होतं. मनातल्या मनात स्वतःला सांगितलं, "आता माघार नाही." आणि पुढची पायपीट सुरु केली.

सातव्या डोंगरपर्यंत थोडं वेगात, थोडं थांबून गेलो. एव्हाना दहा वाजले होते. सर्वानुमते जेवण करायचं ठरलं. आपापले डबे काढून सहलीला आलोय जणू असे सगळे जेवायला बसलो. प्रदीपच्या डब्यात पुऱ्या आणि बटाट्याची भाजी होती. त्यावरून शाळेतल्या सहलीला कशा सगळ्या आया आपल्या पोरांना हाच मेनू द्यायच्या यावर चर्चा होऊन मनसोक्त हसलो. तोंडी लावायला संजूदा आणि संतुदाचे इकडच्या तिकडच्या ट्रेकचे किस्से होतेच. जेवण करून पुन्हा चढाईला सुरुवात झाली. पोटात भर पडल्याने बरं सुद्धा वाटत होतं पण चढायला आधीसारखा हुरूप नव्हता. आता दोन जोडप्यांबरोबर चालण्यापेक्षा मी प्रदीप आणि कौस्तुभ बरोबर चालू लागलो. याचा फायदा असा होत होता की चढण वेगात होई. माथ्यावर जाऊन मागचे लोक येईपर्यंत पुरेशी विश्रांती होत असे. त्यामुळे एनर्जी कायम राहत असे. वाटेत जाताना प्रदीप वन्यजीवांबद्दल त्यांच्याकडची माहिती पुरवत होता. 

आत्तापर्यंत एक गोष्ट लक्षात आली होती. डोंगर चढताना जोर लावून वेगात चढायला त्रास होत नव्हता. पण उतरताना मात्र अतिशय काळजीपूर्वक उतरावं लागत होतं. जरा कुठे चूक झाली तर पार्श्वभागाची काही धडगत नव्हती. १० डोंगर झाले आणि सगळ्यांना जरा बरं वाटलं. संतुदा अजून काही बोलत नव्हता. त्यावरून लक्षात आलं पुढे अजून अवघड चढण असणार. अपेक्षेप्रमाणे ११ व्या डोंगराने सगळ्यांचा घामटा काढला. संजूदा प्रचंड थकले होते.इथंच तंबू ठोकू म्हटलं तर म्हणतात,

"आख्खी रात्र चाललं मी, पण इथे इच्चू काट्यांत झोपणार नाही."

पुन्हा पायपीट सुरु झाली. मी थोडा वेळ संजूदा बरोबर चाललो. त्यांचा मूड थोडा चिअर अप करायला त्यांना म्हटलं,

"आपल्या अध्यक्ष महोदयला हा ट्रेक करायला लावला पाहिजे नाही का?"

संजूदा हसत म्हणतात,"अरे तो कसला येतो.आला तर चॉपर घेऊन येईल इथं."

इतका वेळ फारसं बोलत नसलेले पाय आता बोलू लागले होते. थकवा जाणवू लागला होता. पण हा ट्रेक असा आहे की अर्ध्यातून सोडून देता येत नाही. कारण पुढे मागे जायला काहीच ऑप्शन नसतो. मागे फिरलं तरी तेवढीच पायपीट परत करावी लागते. त्यापेक्षा हळूहळू का होईना पुढे जात राहिलेलं परवडतं. संतुदाने आधीच सांगितलं होतं प्रत्येकाने किमान चार लिटर पाणी बरोबर ठेवा. त्याने तसं का सांगितलं याचा प्रत्यय चालताना येत होता. या सबंध पायपिटीमध्ये कुठेही पाण्याचा मागमूसही दिसला नाही. घोट घोट करून प्यायलेलं पाणी एव्हाना संपत आलं होतं. अजून बरंच अंतर कापायचं बाकी होतं. ट्रेक पूर्ण झाल्यावर प्यायला थोडं तरी पाणी हवं म्हणून मी आपला जपून वापर सुरु ठेवला. 

मजल दरमजल करत अखेरीस सगळे डोंगर संपले. ट्रेक संपता संपता अजून एका साळींदराने आम्हाला दर्शन दिलं. अखेरीस संतुदानी सांगितलं बास आता उतरलं की लगेच झोपडी. परत एकदा सगळ्यांना कडकडून भुका लागल्या होत्या.झोपडीवर जाऊन परत एकदा सगळ्यांनी पोटात चार घास ढकलले आणि निद्रादेवीची आराधना करायला सुरुवात केली.

सकाळी सहाला सगळ्यांचे गजर वाजले. कसेबसे सगळे जण जागे झाले. खरं दिव्य इथून पुढे होतं. वरून खाली डोणज्यापर्यंत जायला आम्हाला गाडी मिळेना. जो थांबे तो अवाजवी पैसे मागे. मग पुन्हा मी, संतुदा आणि प्रदीप वन-टू वन-टू करत डोणज्याच्या दिशेने चालायला लागलो. रात्रभर डोंगर चढायला आणि उतरायला जेवढा त्रास झाला नव्हता त्याहून कित्येक पट अधिक त्रास डांबरी रस्त्याच्या उतारावरून होत होता. कसेबसे आम्ही डोणज्यात पोहोचलो. किल्लेदारीचे अतुल पानसरे त्यांच्या हिमाचल सायकल टूरची प्रॅक्टिस म्हणून आणि आम्हाला भेटायला म्हणून सुद्धा सायकलवर सिंहगडावर आले होते. आमच्या रात्रभराच्या कष्टाची पावती म्हणून अतुलजींनी आमचा नाष्टा स्पॉन्सर केला. डोणज्यातून बस घेऊन अखेरीस साडेनऊच्या सुमारास सिंहगड रोडला आम्ही परतलो आणि ट्रेकची ऑफिशियली सांगता झाली. 

मी स्वतःच स्वतःला मनातल्या "शाब्बास रे मेरे शेर" अशी दाद दिली. ट्रेक पूर्ण करू शकेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं.पण बरोबर असलेली माणसं, मनात असलेली इच्छा यांच्या जोरावर ते करू शकलो. इतकी वर्षे जे लोकांकडून फक्त ऐकलं होतं तो कात्रज ते सिंहगड ट्रेक मी पूर्ण केला होता. सध्या तरी आयुष्यातल्या काही निवडक यशामध्ये या ट्रेकचा समावेश करायला हरकत नाही. 

Wednesday, March 22, 2017

रॉंग नंबर


तो लँडलाईन फोनचा जमाना होता. त्यावेळेस प्रत्येकाकडे कोणता ना कोणता रॉंग नंबरवाला फोन येत असे. माझ्या एका मित्राकडे जुन्नरमधल्या एका हॉटेलचे फोन येत असत. तो सुद्धा खुशाल जेवणाच्या ऑर्डर्स घेत असे. आमच्याही फोनवर असा एक रॉंग नंबर येत असे. बर तो साधासुधा नाही तर जुन्नर पोलीस स्टेशनचा असे. त्याला कारणही तसंच होतं. जुन्नर पोलीस स्टेशनचा नंबर २२०३३ तर आमचा २३०३३ होता. त्यामुळे नंबर डायल करायला थोडी चूक झाली की इकडचा फोन तिकडे जात असे. अशा या रॉंग नंबरवाल्या कॉल्सने करमणूक देखील होत असे. 

एक दिवस रात्री फोन वाजला. दादांनी फोन घेतला आणि पलीकडून आवाज आला, 

"हॅलो जुन्नर पोलीस स्टेशन का?"

दादांनी उत्तर दिले,  "नाही गुंड बोलतोय."

पलीकडचा माणूस बहुधा बावचळला असावा. त्याने पुन्हा विचारले. 

"जुन्नर पोलीस स्टेशनला लागला ना फोन?"

दादा म्हणाले, "नाही गुंडांना लागला."

काही कळेनासं होऊन तो पुन्हा म्हणाला,

"ओ साहेब का चेष्टा करताय."

इकडून दादा परत, "अहो खरंच गुंड बोलतोय."

त्या माणसाला काही कळेना. त्याने फोन कट केला आणि दोन मिनिटांनी पुन्हा केला. परत दादांनीच फोन उचलला. 

"हॅलो जुन्नर पोलीस स्टेशन का?"

"नाही हो. मी गुंड बोलतोय. खराखुरा गुंड."

"ओ साहेब, बास की आता. किती टिंगल करणार माणसाची."

इकडून दादा हसत, "मी टिंगल नाही करत. मी गुंडच बोलतोय. फक्त तुम्ही नंबर चुकीचा लावलाय. तुम्हाला २२०३३ लावायचा आहे आणि तुम्ही २३०३३ लावलाय. २२०३३ ला पोलीस आहेत आणि २३०३३ ला गुंड आहेत. आता सांगा कोणाशी बोलायचंय तुम्हाला."

"आयला असं झालंय काय. मी म्हणलं साहेब का अशी टिंगल करतात आज."

एवढं बोलून त्याने फोन ठेवला. आमची मात्र हसून हसून पुरेवाट झाली.