Wednesday, September 8, 2010

वेड टेनिसचं..


आज दुपारी बोपण्णा आणि कुरेशी जोडीचा सामना पाहिला. या जोडीने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. मला अतिशय आनंद झाला. आणि हे सगळं पहात असतानाच माझं मन थोडं भूतकाळात गेलं. माझा मीच विचार करायला लागलो की आपण केव्हापासून हा खेळ पहायला लागलो. थोडासा विचार केल्यावर मला लक्षात आलं की अगदी लहान असताना शाळेची मधली सुट्टी असली की मी माझा आदित्य कुलकर्णी नावाचा एक मित्र आहे त्याच्या घरी जात असे. तेव्हा त्याचे आई-बाबा दोघही टेनिसचे सामने पहात बसलेले असायचे. सुरूवातीला मला काही कळायचं नाही. पण हळूहळू मला या खेळाबद्दल गोडी वाटू लागली. काही शंका असतील तर मी आदित्य किंवा त्याच्या आई-बाबांना विचारत असे. आणि एक घडी अशी आली की मला हा खेळ प्रचंड आवडू लागला.
एखादी मॅच पाहून मग त्यावर चर्चा करायला मी आणि आदित्य भेटायचो. बारावीनंतर पुण्यात आल्यावर सुरूवातीला फक्त वर्तमानपत्रातून वाचायचो. पण पुन्हा एकदा आदित्यचं कामाला आला. त्याच्या घरी टीव्ही होता. त्यामुळे एखादी मॅच असली की मी त्याच्या घरी जाऊन आम्ही दोघही ती मॅच बघत असू.
मला टेनिस कळायला लागल्यापासून आगासी, सॅम्प्रास, बेकर हे पुरूष खेळाडू तर सेलेस, ग्राफ, सॅंचेस या महिला खेळाडू हे माझे आवडीचे लोक होते. यात ईव्हानसेविकला विसरून जमणार नाही. त्याच्या त्या बिनतोड सर्व्हीसेस आणि ०-१५, ०-३०, ०-४० आणि गेम हा क्रम मी आयूष्यात कधीही विसरू शकणार नाही. त्याची ती विंबल्डनला पॅट्रिक राफ्टर बरोबर झालेली ती मॅच जरी मला पहायला मिळाली नाही(जुन्नरमध्ये असलेल्या भारनियमनामूळे) तरी मी ती नंतर पुनःप्रक्षेपणामध्ये पाहिली होती. याबरोबर आगासी आणि सॅम्प्रास यांच्यामध्ये मैदानामध्ये असलेलं युद्ध कोण विसरू शकेल. अजूनही त्या दोघांच्यात झालेले कित्येक सामने मला आठवतात.
टेनिस म्हटलं की सुंदर मूली हे जणू समीकरण बनलं आहे. अगदी स्टेफी ग्राफपासून ते अगदी आजच्या कॅरोलीन वॉझ्नीयाकीपर्यंत अनेक सुंदर ललना या खेळात आल्या आणि गेल्या. काहींनी आपल्या खेळाने रसिकांना भूरळ घातली तर काहींनी आपल्या अदांनी आणि काहीजणींनी या दोन्ही गोष्टींनी रसिकांना भूरळ घातली.
भारताचं प्रतिनिधीत्व करणारेपण आहेत बरं या खेळात.विजय अमृतराज, लिऍंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा(तिने फारसं काही केलं नसेलसुद्धा, पण तरीही) आणि अगदी आजचे रोहन बोपण्णा, सोमदेव देवबर्मन, युकी भांबरी असे काही खेळाडू आहेत. पेस-भूपती एकत्र असताना त्यांनी दुहेरीच्या टेनिसविश्वात घातलेला धुमाकूळ कोणी कसं विसरू शकेल.
मात्र आजचं टेनिस हे फक्त ताकदीच्या जोरावर खेळलं जातयं की काय अशी शंका नदाल, मॉन्फिल्स यांना खेळताना बघून येते. पण कौशल्यावर आधारलेलं, ज्याला क्लासिक टेनिस असं म्हटलं जाते ते अजूनही आहे हे फेडररला खेळताना बघून जाणवतं.मला स्वतःला जरी फेडरर आवडत नसला तरी त्याने जे काही करून दाखवलं आहे त्याला तोड नाही.
तर असा हा टेनिसचा खेळ. कितीतरी दाखले देता येतील पण वेळेअभावी आत्ता शक्य नाहीये.
मला हा खेळ पहायला लावून या खेळाची गोडी लावणारा आदित्य आणि त्याचे आई-बाबा यांचे मी मनापासून आभार मानतो. राम राम.

Monday, September 6, 2010

नमस्कार.संपूर्ण ऊन्हाळ्याची सुट्टी माझ्या देशात भारतात घालवून मी पुन्हा एकदा या सॅम काकांच्या देशात परतलो आहे. पुन्हा एकदा अभ्यास, गृहपाठ, प्रोजेक्ट्स या जीवनाकडे मी परतलो आहे. आणि त्याचबरोबर माझ्या या ब्लॉगकडेदेखील. इथून पुढे जमेल तेव्हा वेळ काढून मी माझं मनोगत व्यक्त करत राहील. तोपर्यंत राम राम...

Wednesday, April 14, 2010

टक्कलपूराण....

आज मी थोड्याशा विचित्र विषयावर लिहिणार आहे. टक्कल...का करतात लोक टक्कल? याला तशी बरीच कारणे आहेत.कोणी काही धार्मिक कारणासाठी, कोणी दुखवटा असतो म्हणून, काही लोक अगदी डोक्यात कोंडा झाला म्हणूनसुद्धा करतात.तर काही लोक उगाच काहीही कारण नसताना स्टाइल म्हणूनसुद्धा करतात.मी माझा समावेश शेवटच्या प्रकारात करतो.
गेली - वर्षे मी चुकता वर्षातून किमान एकदा तरी टक्कल करतो.अगदी नाही जमलं तर किमान केस अतिशय बारिक करून टाकतो.का कोण जाणे पण मला हे असं आवडतं.सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी सकाळी आंघोळ केली कि डोकं पुसायला वेळ कमी जातो.केस लहान असल्याने ते लवकर वाळून जातात.आणि याहून महत्वाचं म्हणजे केस विंचरावे लागत नाहीत.
अनेकदा मला लोक वेडा ठरवून मोकळे होतात.त्यांच्यामते हे असं टक्कल करणं फारसं सभ्यतेचं लक्षण नाही.पण मग ज्या लोकांना केसच नाहीयेत अशा लोकांचं काय? ते सगळे सभ्य नाहीत का?
बर टक्कल मी केलयं, त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर माझ्याकडे बघू नका ना.केवळ तुम्ही लोक असं म्हणता म्हणून मी टक्कल करायचं नाही याला काही अर्थ नाही ना.
जसे काही लोक माझ्या या टक्कल करण्यावर आक्षेप घेतात त्याचप्रमाणे माझ्या या टक्कल करणे किंवा केस अगदी छोटे करणे याचं समर्थन करणारेसुद्धा बरेच लोक आहेत.आणि ते सगळेदेखील याच वर्गामध्ये मोडतात.यामध्ये माझे काही मित्र, काही मैत्रीणी, माझ्या बहीणी अगदी माझे वडील यांचादेखील समावेश होतो.
या टक्कल करण्याशी अनेक आठवणी जूळलेल्या आहेत.त्यातली एक इथे सांगतो.माझ्या एका मित्राने मला म्हटलं," जर तू टक्कल केलसं तर मीदेखील करेल." आता मला सवय आहे हो.मीसुद्धा त्याला हो म्हटलं.घरी गेलो आणि न्हाव्याकडे जाऊन टक्कल करून आलो. त्या मित्राला फोन केला आणि सांगितलं की आता तूलादेखील टक्कल करावा लागेल.मला वाटलं हा कसलं करतोय टक्कल.पण नाही. ह्या मूलाचा मला एक तासाने पून्हा फोन आला आणि त्याने मला सांगितलं,"गुंड, मीसुद्धा टक्कल केलं बर का" मला खरतर पटलं नाही.पण त्याच दिवशी आम्ही एक नाटक पहायला गेलो होतो.माझा हा मित्र मला लांबून दिसला आणि त्याने खरोखर टक्कल केलं होतं.मी त्याला म्हटलं," शाब्बास रे पठ्ठ्या.जिंकलास तू." आणि पुढच्या १० मिनीटांत ह्याची आईदेखील तिथे आली. तिने त्याला आणि मला असं दोघाना इतकं झापलं की मला पण मी पून्हा टक्कल करेल की नाही यावर मला विचार करावा लागेल असं वाटून गेलं.
असे अनेक किस्से आहेत.पण हा मला जास्त आठवणीतला आहे म्हणून इथे सांगितला.तर असं हे टक्कलपूराण.आणि त्याबद्दलची माझी असलेली मते.

Monday, March 22, 2010

हर्षल देसाई....



अभियांत्रिकीसाठी मी पुण्यात आलो आणि पहिल्या वर्षी हर्षल देसाई नामक एका अजब रसायनाशी माझी ओळख झाली.मी होस्टेलला राहणारा मुलगा असल्याने आधी या माणसाबरोबर जेवढ्यात तेवढा माझा संबंध होता.याला कारण म्हणजे होस्टेलच्या सिनियर मित्रांनी लोकल मुलांपासून लांब रहायचा दिलेला सल्ला.पण दुसऱ्या वर्षी मी पुरूषोत्तम करंडकासाठी माझ्या कॉलेजच्या संघात होतो आणि हा मुलगा कधी कधी आमची प्रॅक्टीस पहायला येत असे.तेव्हा मग या मुलाबरोबर माझा संवाद व्हायला सुरुवात झाली.आणि मग नंतर नंतर असं लक्षात आलं की अरे हा तर खूप वेगळा आहे.लोकल मुलांबद्दल जे काही ऐकलं आहे त्यातलं काहीसूद्धा या माणसामध्ये दिसलं नाही मला.आणि मग हळूहळू मैत्री वाढ्त गेली.
पहिल्यांदा कोणाला भेटला तर हा इतका कमी बोलतो की समोरच्याला आपण फार जास्त बोलत आहोत असं वाटून जातं.पण ज्या लोकांशी त्याची खरोखर ओळख त्या लोकांना त्याचा हे वागणं बरोबर माहित आहे.
अभ्यासात,खेळात सगळीकडे हा असायचा. कॉलेजच्या रोबोकॉनच्या टीममध्येपण होता.पण लोकांसाठी त्याची एवढीच ओळख असावी असं मला वाटतं.पण देसाई हा एक नाटकवेडा असेल किंवा याला शास्त्रीय संगीताची आवड असेल असं कोणाला वाटलं असेल असं मला तरी नाही वाटत.नाटकामध्ये प्रचंड आवड असलेला आणि ती आवड जाणीवपूर्वक जपणारा असा हा मुलगा. सुदर्शन ला आम्ही लोकांनी कित्येक नाटकं एकत्र पाहिली आहेत.अजूनही ते दिवस आठवले की मी नॉस्टॅल्जीक होतो.कोणतही नाटक पाहीलं की त्यानंतर रात्री रूपालीमध्ये बसून कॉफी पित त्या नाटकावर सविस्तर चर्चा करायला देसाई हजर असायचा.(यासाठी कधी कधी आम्ही आक्या आणि बाजारला कलटीसुद्धा मारली आहे.) याची एक गोष्ट मला आवडली म्हणजे काहीही होऊ देत,लोक काहीही म्हणू देत देसाई स्वतःच्या मतावर ठाम असायचा.हेच चित्रपटांनाही लागू पडतं.हावरटासारखा हा चित्रपट पाहतो.याबाबतीत आम्हा लोकांना इतर लोक शिव्या देतात कारण लोकांना आवडणारे चित्रपट आम्हाला फार कमी वेळेस आवडतात.आणि मग काही विषय निघाला की आम्ही म्हणणार की नाही बुवा बेकार आहे आणि लोक म्हणणार तुम्ही वेडे झाला आहात.यावर देसाई मग अशा लोकांशी बोलायचाचं नाही.
अजून एक म्हणजे हा माणूस कधी काय करेल,कोणाला काय बोलेल याचा तुम्हाला कधीच अंदाज करता येत नाही.झेस्ट मधला beatles चा टी-शर्ट घातलेल्या माणसाचा प्रसंग, तिथेच आपल्या वर्गातल्या एका मुलीला तुमचा झालं असेल तर हा टेबल आम्हाला हवा आहे असं बेधडकपणे सांगणारा देसाई, हे काही प्रसंग नमुन्यासाठी.
असे अनेक प्रसंग आहेत, चर्चा आहेत, लिहायचा म्हटलं तर मी अजून बरचं काही लिहू शकतो.पण सगळ्याच गोष्टी इथे नमूद करणं शक्य नाहीये.कदाचित भविष्यामध्ये मला अजून काहीतरी लिहावसा वाटेल तुझ्याबद्दल तेव्हा नक्की लिहील.तोपर्यंत रजा घेतो.

Friday, March 19, 2010

नमस्कार.खरं तर मी माझ्या आत्ता सुरू असलेल्या ब्रेकमध्ये काहीतरी लिहीण्याचा विचार करत होतो.पण ब्रेकमध्ये आलेला आळस,नुकतीच सुरू झालेली आयपीएल स्पर्धा आणि सगळ्यात महत्वाचा माझा कंटाळा यामुळे एक नविन लिहायला घेतलेला ब्लॉग सध्या अर्धाच राहीलेला आहे.तो आता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल.तोपर्यंत रजा घेतो.राम राम.

Thursday, February 25, 2010

ब्लॉग लिहायला सुरुवात कर तू.. इति अद्वैत बोराटे..मी विचारात पडलो.च्यायला हा म्हणतोय खरं की तू लिही म्हणून, पण आपल्याला जमेल की नाही. शेवटी म्हटलं चला सुरूवात तर करु. पुढे काय व्हायचं ते होईल.पण काही दिवसांनी मी विचारात पडलो की बूवा लोक ब्लॉग का लिहीतात? बर तुमच्या ब्लॉगमध्ये काय काय लिहू शकता तुम्ही? की काहीही लिहीलं तरी चालतं?तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही अगदी वजनदार, अलंकारिक अशीच भाषा वापरणे बंधनकारक आहे का? साध्या, सरळ, सोप्या भाषेत लिहीलं तर चालत नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या मनाने शोधायचा प्रयत्न केला.बरं ही माझी वैयक्तिक मते आहेत. त्यामुळे काही जणांना ती पटणं मी गृहीत धरलेलं आहे.
माझ्या मते ब्लॉग हे तुमचे विचार मांडण्यासाठी असलेलं एक व्यासपीठ आहे.मग ते विचार काही का असेनात.तुमचे स्वतःचे राजकीय, क्रिडाविषयक, साहित्यिक,कलाक्षेत्रविषयक असलेले विचार तुम्ही इथे मांडू शकता. राजकीय नेते, त्यांच्या सध्याच्या हालचाली, एखादा नवीन चित्रपट किंवा एखादा तुम्हाला मनापासून आवडलेला जूना चित्रपट इथून ते थेट तुम्ही आजच्या दिवसात काय केलं इथपर्यंत सगळं काही तुम्ही लिहू शकता.(अगदी तुमचं पहिलं प्रेमसुद्धा :) आणि दुसरं असेल तर ते सुद्धा :) ). अर्थात हे तुम्ही लिहीलेलं सगळ्यांना आवडेलचं असंही नाही. काही लोकांना ते बरं वाटेल, काही लोक तुमची खिल्ली उडवतील, काही अगदी "हं ठिक आहे" असंही म्हणतील आणि काही लोकांना मात्र ते खरोखर आवडेल. मग तुम्ही स्वतः काय करणं अपेक्षित आहे? तर माझ्या मते तुम्हाला वाटतयं ना की आपण लिहूयात म्हणून, मग ते जरूर लिहा. इतर लोक काय म्हणतील? त्यांना ते आवडेल की नाही? ते लोक आपल्या लिखाणावर हसले तर काय?? या सगळ्या गोष्टींचा विचार करूच नका.हे जरूर लक्षात असूद्यात की हे जे काही तुम्ही लिहीत आहात यातून तुम्हाला स्वतःला आनंद मिळतोय.मनातून कुठेतरी बरं वाटतयं.मग इतर लोकांची पर्वा का करावी? माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की तुमच्या ह्या लिहीण्याला एक ठराविक कालावधीनंतर ठराविक असा एक प्रेक्षकवर्ग लाभतो. आणि हेच लोक तुम्हाला मदत करत असतात.त्यांना तुमचं म्हणणं पटो अथवा पटो,हे लोक असे असतात की जे तुम्हाला सांगतात की अरे छान आहे बर का..किंवा अरे अजून छान होऊ शकतं हे,पुढच्यावेळेस प्रयत्न कर.आणि मला वाटतं लोकांनी हे एवढं बोललेलं पुरेसं असतं तुम्हाला.अगदी एका माणसाने जरी तुम्हाला म्हटलं ना की "अरे मी वाचतो बरं का तुझा ब्लॉग" तरी तुम्हाला फार बरं वाटतं. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे.माझा हे लिहीणं आवडणारे लोक जसे आहेत तसेच माझ्या लिखाणाची अगदी जोरदार खिल्ली उडवणारे लोक पण आहेत.(योगायोग असा की दोघेही नाशिकमध्ये जन्मलेले आणि जोपासले गेलेले आहेत).पण म्हणून मी लिहीतो किंवा लिहीत नाही असं नाहीये.तर मला वाटतं म्हणून मी लिहीतो.आणि इथून पुढेसुद्धा लिहीत राहील.पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन परत येइल. तोपर्यंत राम राम.

Thursday, February 4, 2010

उत्तरायण

२००५ साली मराठीमध्ये एक चित्रपट आला होता. उत्तरायण नावाचा. त्या सालचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता. साठीमध्ये असलेला रघु आणि दुर्गी हे बऱ्याच वर्षांनी भेटल्यानंतर त्यांना एकमेकांबद्दल वाटू लागलेलं प्रेम आणि या वयात हे असं काही करायचं म्हणून दोघांच्याही मनात झालेला कलह याचं सुरेख चित्रण या चित्रपटामध्ये केलेलं आहे. अलिकडेच मी हा चित्रपट पाहिला. त्यातलं एक गाणं मनाला भिडलं. गाण्याचे बोल खाली देत आहे. तुम्हालाही आवडेल अशी आशा.

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वाऱ्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना
सये रमुनी या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे?
धुंद होते शब्द सारे!

मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा!

गीत- कौस्तुभ सावरकर
चित्रपट- उत्तरायण
(साभार-http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1924.htm)

Sunday, January 31, 2010

नमस्कार् लोकहो, आज पुन्हा एकदा दीर्घ कालावधीनंतर लिहायला बसलो आहे. मागच्या वेळेस लिहीलेला ब्लॉग आणि आजचा ब्लॉग यामध्ये तसं बरच अंतर आहे, आणि त्याचं कारण माझा लिहीण्यासाठी असलेला कंटाळा. पण या वर्षामध्ये अधिकाधिक नियमितपणे ब्लॉग लिहायचा माझा प्रयत्न राहील.
बरचं काही घडून गेलं आहे या कालावधीमध्ये. सगळ्या गोष्टींचा परामर्श घेणे आज शक्य नाहीये. म्हणून सावकाशीने एकेका गोष्टीबद्दल सांगेल. तोपर्यंत राम राम.