Saturday, February 9, 2019

कुणी वाढदिवस बदलून देता का?

"आज कंटाळा आलाय राव लेक्चरला बसायचा.बर्थडेच्या दिवशी कोण बोंबलत लेक्चर करणार?"

"मला सुद्धा कंटाळा आलाय. आपण आधी कॉलेजला तर जाऊ, मग बघू काय ते." तुषार आणि भूषण घरातून निघताना एकमेकांशी बोलत होते.

आज तुषारचा वाढदिवस होता.कॉलेजला जाऊन लेक्चर करण्यापेक्षा बाहेर कुठंतरी जावं असं त्याला वाटत होतं. दोघंही नाशिकच्या एका नावाजलेल्या इंजिनियरींग कॉलेजचे विद्यार्थी. रोज बसने कॉलेजला जात.

रोजच्यासारखे आजही निघाले. घर ते बसस्टॉप या रस्त्यात एक निर्जन पट्टा होता. पायी जाणारे सहसा त्या रस्त्याचा वापर करत. मोटार जाईल एवढा मोठा नसला तरी पोलिसांचा ससेमिरा चुकवायला रिक्षावाले अधूनमधून त्या रस्त्याचा वापर करत. तुश्या भुश्याचा हा रोजचा रस्ता. कधीतरी कॉलेजातून परत येताना कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून ते याच रस्त्यावर थांबून दोघांत एक सिगारेटही मारत.

आजही त्याच रस्त्याने दोघे निघाले.निम्मा रस्ता संपला तोच मागून  एक रिक्षावाला आला.

"कुठं जायचं रे?" पोरांच्या पाठीवरच्या सॅक पाहून रिक्षावाल्याने विचारलं.

"कॉलेजला चाललोय." तुश्याने थोडक्यात उत्तर दिले.

"बसा." रिक्षावाला म्हणाला.

ह्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि रिक्षात बसले. रोज बसने कॉलेजला जाणाऱ्या तुश्या भुश्याला आज रिक्षाने जायची हुक्की का आली देव जाणे.

थोडं अंतर गेल्यावर रिक्षावाल्याने रस्ता बदलला. पोरांना वाटलं नेईल थोडं लांबून.रिक्षावाला मात्र भलत्याच मूडमध्ये होता.त्याने रिक्षा पळवायला सुरुवात केली.

भुश्याने त्याला विचारलं,
"ए इकडं कुठं चालला?कॉलेजला जायचंय आम्हाला."

"गप्प बसायचं.जास्त आवाज करायचा नाही.केलात तर मला हे वापरावं लागेल." खिशातला चाकू दाखवत रिक्षावाला दरडावला.

चाकू पाहताच तुश्या भुश्याची तंतरली. आपला कार्यक्रम झाला आहे हे लक्षात आलं. काय करावं? हा विचार करेपर्यंत रिक्षावाल्याने रिक्षा शहरातून बरीच बाहेर आणली होती. थोडं अंतर गेल्यावर जरा शांत रस्ता पाहून त्याने रिक्षा थांबवली.चाकूचा धाक दाखवत पोरांना म्हणाला,

"चला, काय असेल तुमच्याकडं ते सगळं काढून द्यायचं. नको तो शहाणपणा केलात तर याद राखा."

आधीच तुश्या भुश्या घाबरले होते.त्यात तो चाकू बघून त्यांना अजूनच भीती वाटली. इंजिनियरिंगला असले तरी त्यांच्यावर आजपर्यंत असा प्रसंग कधीच  आला नव्हता. तरी तुश्याने मनाचा हिय्या करून त्याला म्हटलं,

"ओ काका,माझा वाढदिवस आहे आज. सगळं देतो तुम्हाला पण मला काही करू नका."

"वाढदिवस म्हणजे आज तुझ्याकडे माल असणार.तूच आधी खाली कर सगळं"

तुश्याने खिशातून होते नव्हते तेवढे पैसे त्याला दिले. रिक्षावाल्याला काय वाटलं काय माहीत?त्याने तुश्याच्या खिशात हात घातला. तुश्याने वरच्या खिशात ठेवलेले पन्नास रुपये आणि बसचा पास त्याच्या हाताला लागला.तोसुद्धा त्याने ठेवून घेतला.

तेवढं झाल्यावर तुश्याची बखोटी धरत त्याने तुश्याला परत रिक्षात कोंबला.

काय होतंय हे दोघांना अजूनही कळत नव्हते.रिक्षावाल्याने आता भुश्याकडे मोर्चा वळवला.त्याच्याकडून असतील नसतील तेवढे पैसे काढून घेतले आणि म्हणाला,

"नीट निघायचं.इथं थांबायचं नाही."

"पण माझा मित्र?" भुश्याने घाबरत विचारलं.

"त्याचं तुला काय करायचंय?चल निघ इथून."

घाबरलेला भुश्या चक्क तिथून तुश्याला सोडून निघाला.

इकडे रिक्षावाल्याने रिक्षा पुन्हा सुरू केली आणि पुढे जाऊ लागला. तुश्या त्याला काही बोलणार तोच त्याने पुन्हा एकदा चाकू दाखवला.गप्प बसण्यात शहाणपणा आहे हे जाणून तुश्या शांत राहिला.संधीची वाट पहात राहिला.

रिक्षावाला जरा एकाकी जागा शोधायच्या नादात सारखा रिक्षातून इकडेतिकडे बघत होता. त्याचं लक्ष नाही पाहून तुश्याने चालत्या रिक्षातून उडी मारली. रिक्षाच्या वेगामुळे तो रस्त्यावर पडला.थोडंफार खरचटलं पण ते त्यावेळी महत्वाचं नव्हतं. रस्त्यावरून उठत तुश्या जोरात पळत सुटला.तुश्याने उडी मारली आहे हे कळून, रिक्षा माघारी फिरवेपर्यंत रिक्षावाल्याचा थोडा वेळ गेला. तुश्या जिवाच्या आकांताने पळत सुटला. रिक्षावाल्याने थोडा वेळ पाठलाग केला मात्र गर्दीचा रस्ता आलेला दिसताच नाद सोडून दिला.

रिक्षावाल्याने आपला पाठलाग थांबवला आहे हे लक्षात येताच तुश्या पळायचा थांबला. आता बस पकडून कॉलेजला जावे म्हणून खिशात हात घातला तर बसचा पास गायब.खिशात एक दमडीदेखील नव्हती. रिक्षावाल्याने सगळं काढून घेतलं होतं.त्याला एक शिवी हासडून तुश्या तसाच चालत कॉलेजच्या दिशेने चालत निघाला.

आपण किडनॅप झालो होतो असे कुणाला सांगून पैसे मागावेत तर हसे होण्याची भीती.एवढा तरुण मुलगा आणि किडनॅप झाला यावर कोण लगेच विश्वास ठेवणार? तासभर चालून अखेरीस तुश्या कॉलेजला पोहोचला. भुश्या कुठे आहे पहावे म्हणून वर्गाकडे गेला. खिडकीतून पाहतो तो भुश्या लेक्चरला बसलाय. आता मात्र तुश्याचा संताप झाला.तिथूनच तो ओरडला,

"भुश्या भाडखाऊ. पोलिस स्टेशनला जायचं सोडून लेक्चर काय करतोय?"

तुश्याचा हा रुद्रावतार बघून भुश्या वर्गातून बाहेर आला. तो असा एकदम उठून बाहेर पळाला म्हणून लेक्चर घेणारे सरही बाहेर आले.

"काय रे?काय चाललंय काय?असे ओरडताय?" सरांनी विचारलं.

"सर, एका रिक्षावाल्याने आम्हाला दोघांना किडनॅप केलं होतं. आमचे पैसे काढून घेतले.आधी ह्याला सोडलं.मला कुठेतरी घेऊन चालला होता पण मी रिक्षातून उडी मारून पळून आलो.मला वाटलं हा सुटलाय तर मी किडनॅप झालोय हे पोलिसांना जाऊन सांगेल.तर हा हरामी इथं लेक्चरला बसलाय."तुश्याने एका दमात सगळं सांगितलं.

"अरे बाप रे?हे खरोखर गंभीर आहे. चला आपण लगेच प्रिन्सिपल ऑफिसला जाऊन पोलिसांना फोन करू." म्हणत सर त्यांना घेऊन चालू लागले.

"हरामखोर, तू बाहेर भेट,मग दाखवतो तुला.वाढदिवसाच्या दिवशी लेक्चर नको म्हणत होतो.तुला लै खाज.जाऊ कॉलेजला.काय झालं येऊन?" तुश्याने भुश्याला झापायला सुरुवात केली.

वर्गाबाहेर उभं राहून तुश्या जे काही बोलला ते सगळ्या वर्गाने ऐकलं होतं. ते आख्ख्या कॉलेजभर पसरायला वेळ लागला नाही.सगळे तुश्याला भेटायला येऊ लागले. अनेकांनी टिंगल केली. कुणी घरी फोन करू लागले. सगळं काही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच घडल्याने  साऱ्याला तोंड देताना तो वैतागून गेला.

तेव्हापासून ते आजतागायत दरवर्षी तुश्याच्या वाढदिवसाला त्याचे मित्र त्याला ह्या गोष्टीची आठवण करून देतात.इतकी की तुश्या 'नको तो वाढदिवस' असं म्हणायला लागलाय. कुणी घर देता का घर? सारखं कुणी वाढदिवस बदलून देता का? अशी त्याची अवस्था झाली आहे.

Thursday, November 8, 2018

आणि डॉ.काशिनाथ घाणेकर


नव्वदच्या दशकात रमणारे आम्ही त्याच्यापलीकडे फारसे कधी जातही नाही.नाटकं वगैरे सुद्धा अलीकडचीच बघतो. नाटकं वाचणारे तर खूपच कमी जण असतात.कॉलेजात पुरुषोत्तम, फिरोदिया केलेलं असलं तरी ते वयही उथळ असते. त्यामुळे साठच्या दशकांत आपल्या अभिनयाने नाटकं,सिनेमे अजरामर केलेले कलाकार आम्हाला एक तर माहित नसतात. चुकून माहिती असलेच तर ते फक्त ऐकून किंवा वाचूनच.     

माझ्या पिढीला डॉ. काशिनाथ घाणेकर माहित असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. मला खात्री आहे आजही अनेकांना ते माहीत नसतील.मात्र रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अशी नावं ऐकली की आम्हाला थोडा आपलेपणा वाटतो. मग कधीतरी कुणीतरी सांगितलेलं आठवतं, "हा रोल काशिनाथ घाणेकर करायचे." 

'शूर आम्ही सरदार' गाणं माहित नसलेला मराठी माणूस सापडणे केवळ अशक्य आहे. लहानपणापासून आपल्यातल्या अनेकांनी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत हे गायलं असेलच. अगदी गेला बाजार बाथरूममध्ये तर नक्कीच. या गाण्यात घोड्यावर बसलेला माणूस कोण? हा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तो माणूस आहे डॉ. काशिनाथ घाणेकर. 

तर अशा या भारी माणसावर चित्रपट येतोय आणि घाणेकरांची भूमिका सुबोध भावे करतोय म्हटल्यावरच हा चित्रपट पहायचा हे मनाशी निश्चित केलं होतं.

चित्रपट म्हणून आणि डॉ.काशिनाथ घाणेकर फारसा भारी नसला तरी मला कौतुक सुबोध भावेचं (मुद्दाम एकेरीत उल्लेख करतोय.) करावंसं वाटतं. चित्रपट म्हणायचं झालं तर सुबोध मला ठळकपणे आठवतो तो 'सनई चौघडे'मधला. त्यानंतर बालगंधर्व,लोकमान्य, कट्यार या चित्रपटांतून त्याने आपला उत्तम अभिनय दाखवला. आमच्या पिढीने ऐकलेले, वाचलेले हे लोक त्याने पडद्यावर साकारले. ही माणसं कशी होती हे त्याने आजच्या पिढीसमोर आणलं. अगदी काशिनाथ घाणेकर सुरू होतानाही टीप येतेच. आजच्या पिढीला काशिनाथ घाणेकर माहीत व्हावेत म्हणून हा चित्रपटप्रपंच. या सगळयासाठी त्याचं कौतुक करावसं वाटतं. अशाच भूमिकांमध्ये अडकून न राहता त्याने तद्दन व्यावसायिक सिनेमेही केले.

बालगंधर्व पाहिल्यानंतर माझा एक मित्र म्हणाला होता,

"भावे कष्ट घेतो."

त्याचं हे वाक्य मला मनोमन पटलं. बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार या सगळ्या चित्रपटांमध्ये त्याची मेहनत दिसते. अगदी सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या 'तुला पाहते रे' मालिकेतील विक्रांत सरंजामेही तरुणींना भुरळ पाडतो. काशिनाथ घाणेकरमध्येही सुबोधचे त्या भूमिकेसाठीचे कष्ट दिसून येतात. 'भूमिका जगणे' वगैरे शब्द थिटे वाटावेत इतक्या तन्मयतेने त्याने घाणेकर साकारले आहेत. हा चित्रपट फक्त सुबोधच्या अभिनयासाठी लक्षात राहील.त्याच्या संवादांसाठी लक्षात राहील. 'एकदम कडक!' हा त्याचा संवाद त्याच्या स्टाईलमध्ये महाराष्ट्रातल्या चहाच्या टपऱ्यांवरसुद्धा पुढचे काही महिने नक्की ऐकू येत राहील. घाणेकर स्टार झाल्यावर आपल्या चाहत्यांमध्ये मिसळताना वाजणार पार्श्वसंगीत विशेष लक्षात राहण्याजोगे आहे. सुबोधबरोबरच प्रसाद ओक आणि वैदेही परशुरामी यांच्या भूमिका तितक्याच वजनदार. प्रसाद ओकचे प्रभाकर पणशीकर ठळकपणे लक्षात राहतात.

चित्रपटात जाणवलेली अजून एक गोष्ट नमूद करतो. दिग्दर्शकाने घाणेकरांना रंगभूमीचा सम्राट म्हणून डोक्यावर घेतलेलं जसं दाखवलं त्याचप्रमाणे दारूमध्ये त्यांचा झालेला सर्वनाशही दाखवला.त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांना नाकारलेलंही दाखवलं. त्यांची ही बाजू जर प्रेक्षकांसमोर आणली नसती तर आज उद्या घाणेकरांसारखा नट होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पोरांना त्यांचं दारू पिणं, दारूच्या आहारी जाणं हे वाईट वाटलंच नसतं. घाणेकरांच्या दारूच्या व्यसनाचं उदात्तीकरण (ग्लोरीफिकेशन) केलं नाही त्याबद्दल दिग्दर्शकाचं विशेष अभिनंदन.

ठग्ज ऑफ हिंदुस्थानसारख्या बच्चन, आमीर खानसारखी स्टारकास्ट असलेल्या, यशराज फिल्मसारख्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटाशी टक्कर घेत व्हायकॉमने हा चित्रपट प्रदर्शित केला त्याचंही कौतुक. 'आपलं नाणं एकदम खणखणीत वाजणार' हा आत्मविश्वास असल्यानेच त्यांनी हे केलं असावं आणि ते खरंही ठरतंय. 

घाणेकर कसे होते हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट बघा. चित्रपट म्हणून नाही तर सुबोधच्या अभिनयासाठी मात्र नक्की बघा.

Wednesday, October 31, 2018

सूर्यवंशी सरांशी पहिली ओळख अकरावीत झाली. ते आम्हाला इंग्रजी शिकवत. आठवीत असताना इंग्रजीच्या व्याकरणाचा पाया डुंबरे सरांनी तयार करून घेतला. शाळेत नववी,दहावीला माकुणे सरांनी इंग्रजी विषय इंग्रजीतून शिकवला. पुढे अकरावी, बारावीला सूर्यवंशी सरांनी तेच केले. आपल्याकडे इंग्रजी विषय अनेकदा मराठीतून शिकवला जातो.सूर्यवंशी सरांनी ते करणे कटाक्षाने टाळले. कविता असो किंवा गद्य, त्याचा अर्थ त्यांनी कायम इंग्रजीमधूनच समजावून सांगितला.  त्यामुळे नकळतपणे आम्हाला इंग्रजी कानावर पडत असे. कधी कधी सर वर्गात येऊन एक दोन जणांना उभे करत.त्यांना एखादा विषय देऊन त्यावर इंग्रजीतून चर्चा करायला लावत.सुरुवातीला इंग्रजी बोलताना हसू येई.नंतर मात्र सवय होऊन गेली. बोलताना आम्हाला काही अडचण आली, योग्य शब्द सापडला नाही तर सर मदतीला असतच.मला या चर्चांचा पुढे बराच उपयोग झाला. मी माझं म्हणणं इंग्रजीतून मांडताना अनेकदा दोन वाक्यांच्या मध्ये 'म्हणजे' हा शब्द वापरे.तो आपसूक माझ्या तोंडी येई.सरांनी ते बरोबर पकडले आणि मला त्या ऐवजी 'आय मीन किंवा आय मीन टू से' हे वापरण्याचे सुचवले.मी आजतागायत ते करतो आहे.

आपल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन इंग्रजी बोलताना अडचण येऊ नये या भावनेतून सर आम्हाला इंग्रजी बोलायचा सराव करायाला लावत. या चर्चांचे विषयही आम्हाला आवडतील असे असत.कधी सचिनची बॅटिंग, कधी सध्याची राजकीय परिस्थिती तर कधी अगदी लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज असेही विषय असत.एक आठवण सांगतो. लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज या चर्चेत दोन्ही बाजूकडची मुलं आपली बाजू तावातावाने मांडत होती.सर आपल्या परीने तटस्थ राहून चर्चा पुढे नेत होते. सरांनी लव्ह मॅरेज केलेय हे माहीत असलेल्या मी एका मुद्द्यावर उभे राहून म्हटले,

"Even you chose to go ahead with Love Marriage. In that case, you should support us." 

माझं हे वाक्य ऐकताच सगळा वर्ग हास्यात बुडाला.सरांनाही हसू आवरले नाही आणि अखेरीस त्यांनी आमची बाजू घेतली.

बारावीनंतर जुन्नरमधून बाहेर पडलो.जुन्नरला गेल्यावर अधून मधून सरांना भेटणे होत असे.त्यावेळीही त्यांच्याशी इंग्रजीतूनच संवाद होई. बारावी संपून आता पंधरा वर्षे होतील.सर आजही संपर्कात असतात.माझे ब्लॉग नियमित वाचत असतात.काही चूक वाटली तर आवर्जून तसे सांगतातही. आज सर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा दाटून आल्या. सरांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.

Tuesday, October 30, 2018

पंधरा काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.माझी बहीण पूजाला मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्टला अॅडमिशन मिळाले.कॉलेजचं तर झालं पण राहण्याची व्यवस्था अजून झाली नव्हती. मरीन लाईन्सला असलेल्या मुलींच्या सरकारी हॉस्टेलला जेजेच्या विद्यार्थीनींसाठी काही जागा राखीव असतात. या जागाही लवकर भरतात. पूजाच्या अॅडमिशनला तसा  उशीर झाला होता.त्यामुळे हॉस्टेलला प्रवेश मिळेल की नाही याबाबत शंका होती. दादांना कुणीतरी सांगितलं,

"वळसे पाटलांना भेटा. ते करतील काम."

साहेब त्यावेळी महाराष्ट्राचे उच्चशिक्षणमंत्री होते. एक दिवस सकाळीच दादा साहेबांच्या मुंबईतल्या शिवगिरी बंगल्यावर गेले. भेट ३-४ मिनिटांचीच झाली. साहेबांनी काम होईल याची खात्री देऊन त्यांचे स्वीय सहाय्यक भोर यांच्या संपर्कात राहण्यास सांगितले.

त्यानंतर काय सूत्रे फिरली की काय झाले कल्पना नाही.दोन एक दिवसांनी भोर साहेबांचा दादांना फोन आला,

"उद्या मुलीला घेऊन हॉस्टेलला जा.तिथं सगळं होईल व्यवस्थित."

त्यांनी सांगितल्याप्रमाणे दादा आणि पूजा हॉस्टेलला पोहोचले.ते पोहोचतात तोच हॉस्टेलचा फोन वाजला. फोनवर बोलून रेक्टर मॅडम बाहेर आल्या आणि दादांना म्हणाल्या,

"तुम्ही गुंड का?"

दादांनी हो म्हणताच त्यांनी पूजा आणि दादांना ऑफिसमध्ये नेऊन पुजाचा हॉस्टेलच्या प्रवेशाची प्रक्रिया वेगात पार पाडली. 

आपल्या गावची एक मुलगी जे जे सारख्या कॉलेजला जातेय म्हटल्यावर तिच्या हॉस्टेलचं हे छोटंसं काम केलंच पाहिजे या भावनेने साहेबांनी पूजाचं हे काम करून दिलं.

आजही कधी पूजाच्या अॅडमिशनची आठवण झाली की साहेबांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा प्रसंग पुन्हा एकदा आठवला. 

साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Monday, October 22, 2018

द ड्रेनेज

परवा बाणेरच्या ड्रामालयला 'द ड्रेनेज' नावाची शॉर्टफिल्म पाहिली. गावावरुन एक माणूस स्मार्टफोन घ्यायला शहरात येतो. त्याचा जुना फोन देऊन नवा स्मार्टफोन विकत घेतो. नवा फोन घेतल्याच्या आनंदात गावाकडच्या आपल्या एका मित्राला फोन करतो. मी नवा फोन घेतलाय, टचस्क्रीन आहे असं कौतुक चाललेलं असतं. तितक्यात एका दुचाकीवाल्याचा धक्का लागून फोन त्याच्या हातातून खाली पडतो तो नेमका एका ड्रेनेजमध्ये. 

दहाच मिनिटांपूर्वी घेतलेला फोन ड्रेनेजमध्ये पडल्यावर त्या माणसाची काय अवस्था होते? तो फोन परत मिळवण्यासाठी तो काय काय करतो? या सगळ्याची गोष्ट म्हणजे 'द ड्रेनेज'. नंदू माधव यांनी भूमिकेला यथायोग्य न्याय दिला आहे. गावाकडचा माणूस, त्याचं शहरातील बावरत वावरणं, मोबाईल ड्रेनेजमध्ये पडल्यावर तो पुन्हा मिळवण्यासाठीची धडपड हे सगळं त्यांनी खूपच मस्त साकारलंय. एका प्रसंगात बरोबर त्यांचा फोन पडलेल्या ड्रेनेजच्या झाकणावर एक गाडी येऊन थांबते. एरवी कुणी असतं तर त्या गाडीवाल्याला सांगून गाडी दुसरीकडे लावायला सांगितली असती आणि फोन काढायचे प्रयत्न सुरु ठेवले असते.  बाजूला बसून गाडी कधी हलेल याची वाट बघत बसतात. यातून त्यांचा साधेपणाही जाणवला. 

तुम्ही म्हणाल एवढंच आहे का शॉर्टफिल्ममध्ये? तर नाही. शॉर्टफिल्म ज्याने लिहिली आणि दिग्दर्शित केली त्या विक्रांत बदरखेशी या निमित्ताने बोलायला मिळालं. शॉर्टफिल्मच्या शेवटच्या काही फ्रेम्समधून दिग्दर्शक त्याला द्यायचा असलेला संदेश देतो. मोबाईलचं व्यसन वगैरे विषय आजवर भरपूर चघळून झालेत. विक्रांत त्याही पलीकडे जाऊन विचार करतोय. गावात मोबाईलला रेंज नाही म्हणून विक्रांतच्या एका नातेवाईकाच्या शेतात मोबाईलचा टॉवर लावण्यात आला. त्याच महिन्याकाठी भाडंही सुरु झालं. मोबाईलला रेंजदेखील आली. मात्र त्यामुळे ही माणसं कुठेतरी शेती करायला आळसू लागली. हे सगळं कुठेतरी विक्रांतला खटकत होतं. आपल्या या नेहमीच्या जगासारखंच मोबाइलचंही एक जग आहे की काय? ते जग आपल्या जगाहूनही भयंकर आहे काय? या सगळ्या विचारांमधून 'द ड्रेनेज' ची  निर्मिती झाली. 

एका हलक्याफुलक्या विषयावर ही फिल्म आहे असे वाटत असताना शेवटची ३-४ मिनिटं मात्र तुम्हाला बराच वेळ विचार करायला भाग पाडतात. पंधरा मिनिटांत ही शॉर्टफिल्म तुम्हाला जिंकते. ड्रेनेजमध्ये केलेलं शूटिंग, आतमध्ये असलेला अंधार, घाण, त्यात शूटिंग करताना फवारलेले रूम फ्रेशनर आणि काय काय. हे सगळं करताना नक्की कसं केलं हे विक्रांतने सांगितलं तेव्हा त्याच कौतुक वाटलं. 

एक मुलगा अकोल्याहून पुण्यात येतो काय, स्पर्धा परीक्षांची तयारी करता करता लिहिता होतो काय, शॉर्टफिल्म लिहितो काय, आणि त्या शॉर्टफिल्मला जगभरातल्या अनेकानेक महोत्सवांमध्ये पारितोषिकं मिळतात काय!! एक लेखक, दिग्दर्शक म्हणून विक्रांतचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. चित्रपटांचा दर्जा खालावला असे म्हणणाऱ्या लोकांना द ड्रेनेजसारख्या फिल्म्स दाखवल्या की या क्षेत्राचं भवितव्य योग्य हातांत आहे याची त्यांना खात्री पटेल. 

टिप - ही शॉर्टफिल्म युट्युबवर उपलब्ध नाही. लवकर युट्युबवर येईल अशी शक्यताही नाही. वेळोवेळी या फिल्मचं स्क्रीनिंग पुणे, मुंबई आणि इतरही शहरांत होत राहील. तुमच्या शहरात आली की न चुकता पहा. 

Monday, October 8, 2018

अंधाधुन

आत्ताच अंधाधुन बघून आलोय. ट्रेलर न पाहता फक्त एका मित्राने सांगितलं भारी आहे म्हणून गेलो. बऱ्याच वर्षांनी एकट्यानेच चित्रपट पाहिला.हा चित्रपट पाहून कधी एकदा घरी जाऊन लिहीतोय असं आज झालं होतं. 

प्रेक्षकाला शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणे की काय म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण आहे हा चित्रपट. ब्लॅक कॉमेडी आहे. चित्रपटाची सुरुवात मिस करू नका. कारण ती मिस झाली तर अख्ख्या चित्रपटाची मजा जाईल. 

आयुष्यमान आधीच भारी अॅक्टिंग करतो. त्यात त्याला हा चित्रपट मिळाला ज्यात तो एक मुख्य पात्र आहे. त्याने आंधळ्याच्या (सॉरी आंधळ्याचं नाटक करणाऱ्या - हा स्पॉयलर नाही) भूमिकेत जीव ओतला आहे. तब्बू हे दुसरं मुख्य पात्र. तिच्याबद्दल न बोललेलंच बरं इतकी ती भारी आहे.तिचं वय जसजसं वाढत चाललंय तसतसा तिचा अभिनय जास्तच भारी होत चाललाय. राधिका आपटेने छोट्याश्या भूमिकेत हवा केली आहे. झाकीर हुसेन हा डॉक्टरच्या भूमिकेत मजा आणतो. 

तब्बूने केलेला एक खून आयुष्यमान पाहतो, त्याने आपल्याला पाहिलंय हेही तब्बूला माहित असतं. तरी चित्रपट तुम्हाला गुंतवून ठेवतो. का? ते चित्रपट पाहूनच माहित करून घेणे जास्त योग्य राहील. दिग्दर्शक श्रीराम राघवन फिल्म इन्स्टिट्यूटचा माजी विद्यार्थी असल्यामुळे पुण्यात चित्रीकरण करावे असे त्याला वाटले असू शकेल. संपूर्ण चित्रपट पुण्यात चित्रित झाल्याने सतत आपल्याला माहित असलेल्या जागा दिसल्या की काही भान नसलेले प्रेक्षक मोठ्याने "अरे गुडलक चौक आहे हा." वगैरे वगैरे ज्ञान पाजळत राहतात. (पुण्यात चित्रित झालेला चित्रपट पुण्यात पाहताना तरी हे ज्ञान पाजळु नये याचं त्यांना भान रहात नाही. असो.)

अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत चित्रपट तुम्हाला धरून ठेवतो. किती? तर माझ्याशेजारी बसलेलं १२-१३ वर्षांचं पोरगं निम्म्याहून जास्त वेळ खुर्चीच्या पुढच्या कडेवर बसलं होतं आणि संपूर्ण चित्रपटात न राहवून त्याने ५-६ वेळा 'फक' म्हटलं.   

हा चित्रपट शांतीत क्रांती करतोय. फक्त माऊथ पब्लिसिटीवर चालणार आहे. यावर्षीच्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. पाहिला नसाल तर विकेंडची वाट पाहू नका. पस्तावा होणार नाही याची खात्री माझी. 

Friday, October 5, 2018

समालोचनाचे दोन दिग्गज

रिची बेनॉ आणि टोनी ग्रेग हे दोघेही माझ्या पिढीला खेळाडू म्हणून तितकेसे आठवत नाहीत. दिग्गज समालोचक म्हणून मात्र निश्चित आठवतात. मला स्वतःला रिची बेनॉ यांची कॉमेंट्री फारशी आठवत नाही. टोनी ग्रेग यांची कॉमेंट्री न ऐकलेला माझ्या पिढीचा माणूस सापडणं मात्र अवघड आहे.

टोनी ग्रेग यांची कॉमेंट्री म्हणजे दर्शकांसाठी पर्वणी असे.एखाद्या फटक्याचे भरभरून कौतुक कसे करावे हे शिकावे तर त्यांच्याकडूनच.एखाद्या खेळाडूने सोपा कॅच सोडला तर सयंतपणे फक्त बोलण्यातून त्याची लायकी काढावी ती त्यांनीच.

भारतीय क्रिकेट रसिकांना टोनी ग्रेग जास्त लक्षात राहतील ते त्यांच्या शारजामधल्या कॉमेंट्रीमुळे. सचिन ऑस्ट्रेलियाच्या चिंध्या उडवत होता तेव्हा माईक टोनी ग्रेग यांच्याकडे होता हे बरंच झालं असं आता वाटतं. सचिनची तो स्फोटक खेळी  जगप्रसिद्ध करण्यात ग्रेग यांच्या कॉमेंट्रीचाही तितकाच मोलाचा वाटा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

आज रिची बेनॉ आणि टोनी ग्रेग या दोन दिग्गजांचा जन्मदिवस.आजच्या काही क्रिकेट समालोचकांची कॉमेंट्री ऐकून अक्षरशः कीव येते आणि या दोन दिग्गजांची आठवण आल्यावाचून रहात नाही.

क्रिकेटरसिक हे दोन आवाज येणारी अनेक वर्षे मिस करतील यात शंका नाही.