Thursday, August 16, 2018

अटलजी

जेव्हा कळू लागलं तेव्हा देशाच्या राजकारणात अटलजींचा दबदबा होता.त्याचवेळी महाराष्ट्र आणि दिल्लीत भाजप पकड घेऊ लागला होता.एखाद्या नेत्याने पंतप्रधान व्हावं असं मला पहिल्यांदा वाटलं ते अटलजींच्या बाबतीत.

त्यांची भाषणं लोकसभेत आणि प्रचार सभांमधूनच ऐकायला मिळाली. काय ते वक्तृत्व, काय ते हिंदी भाषेवरचे प्रभुत्व, टीका पण अशी की समोरच्याला वर्मावर लागणार पण तो दुखावणार मात्र नाही. विरोधकही त्यांना मनापासून दाद देत असत. आजवर अनेक नेते झाले. बोलताना कधी ना कधी या ना त्या नेत्याचा आपण एकेरीत उल्लेख करतो. अटलजींच्या बाबतीत मात्र हे कधीच झाले नाही. त्यांचा उल्लेख कायम आदराने 'अटलजी' असाच करण्यात येतो. 

त्यांचं १३ दिवसांचं सरकार पडल्यावर अनेकांना वाईट वाटलं. काय झालं होत नेमकं हे माझ्या बालबुद्धीला समजले नाही पण वाईट मात्र खूप वाटले. त्यानंतर पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अणूचाचण्या केल्या. त्यावेळी अमेरिका आणि जपानसारख्या देशांनासुद्धा त्यांनी भीक घातली नव्हती. या अणूचाचण्यांचा मला काय फायदा झाला असेल तर त्यावर भाषण करायची संधी मिळाली. त्यावेळी शाळांमधून विविध पातळीवर घेतल्या गेलेल्या भाषण स्पर्धांमध्ये अणूचाचण्यांचा विषय हमखास असे. परीक्षांमध्ये निबंधालाही विषय असे. भाषण केले असल्याने निबंध लिहायला फारशी अडचण येत नसे.

अलीकडे भाजपच्या पोस्टर्स वरून त्यांची छबी सोयीनुसार वापरली किंवा काढून टाकली जाते..त्याबद्दल एखादी बातमी वगैरे येत असते. आता मात्र भाजपच्या प्रत्येक पोस्टर वर त्यांची छबी झळकेल अशी आशा आहे.

भारतीय राजकारणातील एक पर्व संपले.श्रद्धांजली..💐💐

No comments:

Post a Comment