Sunday, September 24, 2017

उज्वल जनरल स्टोअर

लहानपणी पेन,पेन्सिल असं काही घ्यायचं असेल तर मी रविवार पेठेतल्या उज्वल जनरल स्टोअरमध्ये जात असे.कल्याण पेठेत सुद्धा दुकाने होती.पण उज्वल जनरलबरोबरचं नातं वेगळंच होतं.मग फक्त तेवढ्यासाठी मी सायकलवर रविवारात जात असे.

माझ्या जन्माच्या खूप अगोदर हे दुकान सुरू झालं असावं.कारण मला आठवतं तेव्हापासून उज्वल जनरल जुन्नरमध्ये आहे.विजूकाका म्हणजे दुकानातली प्रमुख व्यक्ती.डोक्यावरचे कमी होत चाललेले केस, हाफ शर्ट, पँट, उन्हाळा असेल तर क्वचित कॉटनची बंडी असे विजूकाका मला आठवतात.दुकानात कितीही गर्दी असली, गोंधळ असला तरी हा माणूस कधी गिऱ्हाईकावर रागावल्याचे, वैतागल्याचे मला आठवत नाही. कायम हसून बोलणार.दादांचे चांगले मित्र होते ते.त्यामुळे मलाही ओळखायचे.

"गुंड, तुझ्या आडनावाप्रमाणे वागू नको बरं का!!" असं गमतीने मला म्हणत असत.

"पप्पा कुठे गेले? मार्क किती पडले?" अशी चौकशीसुद्धा करत..

उज्वल जनरलच्या आसपास अजूनही एक दोन दुकाने होती.क्वचित यांच्याकडे एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्या दुकानांत जाण्याचा प्रसंग येत असे.पण विजूकाका ज्या प्रेमाने गिऱ्हाईकाशी बोलत तेवढं त्यांना जमत नसे.साहजिकच त्यांच्याकडे जाण्याचं मी टाळत असे..

शाळा सुरू व्हायचे दिवस आले की यांच्याकडे लगबग सुरू होई..नविन वह्या, पुस्तके, गाईड्स, पेन, पेन्सिल, डबा, वॉटरबॅग शाळेसाठी लागणारी प्रत्येक वस्तू उज्वलमध्ये असे.वह्यांचे गठ्ठे तर दुकानाच्या बाहेरसुद्धा ठेवावे लागत इतका मालाला उठाव असे. विजूकाकांचा मुलगा तुषार, त्यांचे मोठे बंधू वसंतकाका, जमेल तेव्हा घरातली इतर माणसे गर्दीच्या वेळी दुकानात येत असत.या सगळ्यांत तुषार जास्त वेळ दुकानात असे. कालांतराने त्यानेच दुकानाची सूत्रे आपल्याकडे घेतली.पण विजूकाका मात्र दुकानात येत असत.त्याशिवाय त्यांना करमणार कसे ना!!

अगदी क्रिकेट खेळायला टेनिसचा बॉलसुद्धा आम्ही इथूनच घेत असू..बॉल घ्यायला दुकानात आम्ही दोघं तिघं गेलो की विजूकाकांना अंदाज येई.मग ते विचारत,

"आज मॅच का? चांगले खेळा बरं का!"

आम्हीदेखील हो म्हणून बाहेर पडत असू..

एखादा मुलगा/मुलगी दुकानात आपल्या आई वडिलांकडे आपल्याला अमुकच पेन पाहिजे असा हट्ट करत असेल तर विजूकाका त्यांच्या मदतीला येत.

"अरे पप्पा म्हणतात तोच पेन भारी आहे. त्याने उलट तुझं अक्षर जास्त चांगलं येईल.सगळेजण हाच घेतात." आता दुकानदार सांगतोय म्हटल्यावर ते पोरगंसुद्धा त्यांचं ऐकून तो पेन घेत असे.केवळ ऐपत नसल्यामुळे आपल्या मुलांना महाग पेन, पेन्सिल देऊ शकत नसलेल्या कित्येक आई वडिलांचे पैसे विजूकाकांनी असे वाचवले असतील.त्याबद्दल कित्येकांनी त्यांना धन्यवादही दिले असतील.

बारावीनंतर पुण्याला आल्यावर उज्वलमध्ये जाणं कमी झालं.नंतर कधीतरी, काही कारणाने उज्वलमध्ये जाण्याचा योग आला.बऱ्याच वर्षांनी भेटूनही तुषारने तेव्हा मला ओळखले होते..

"अरे तू गुंड ना? कुठे असतोस सध्या?काय करतोस?" अशी प्रेमळ चौकशी केली होती.

आज दादांबरोबर सहज बोलताना विषय निघाला म्हणून ह्या आठवणीनं उजाळा मिळाला. आज सुमारे १५ वर्षानंतरही या दुकानाबद्दल वाटणारी आत्मीयता कमी झालेली नाहीये.माझ्यासारख्या बऱ्याच जणांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये उज्वल जनरलचा नकळतपणे हातभार लागला.

विजूकाका आणि तुषार दोघांनाही भेटून बरेच दिवस झाले.अलीकडे तुषारची बायको म्हणजे श्रद्धा भाभी त्याला हातभार लावत असल्याचे कळले.बदलत्या काळाबरोबर उज्वल जनरल स्टोअरने देखील कात टाकली आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांचा कारभार अजून चालू आहे. पुढील "उज्वल" वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.

Saturday, September 9, 2017

"सर तुमची परमिशन असेल तर मी थोडं बोलू का?"
एअरपोर्टच्या गर्दीतून गाडी बाहेर काढत उबरचा ड्रायव्हर माझ्याशी बोलत होता.समोरचा आपल्याशी बोलायला उत्सुक आहे म्हटल्यावर आपण का माघार घ्यावी अशा विचाराने मीही त्याला होकार देत म्हटलं,
"बोला की."
"सर आज सकाळी मी डॅडी पिच्चर पाहिला."
"अरे वा! कसा काय वाटला मग तुम्हाला?"
"एक नंबर आहे सर."
"मग बघायला पाहिजे."
"नक्की बघा सर..फक्त दाऊदच्या रोलमधी फरहान अख्तरला नव्हतं घ्यायला पाहिजे.त्याचा आवाज बाद आहे.दाऊदसारख्या माणसाचा आवाज असा असतो का??ते काय नीट जमलं नाही त्याला."
"आणि अर्जुन रामपाल?" मी विचारता झालो.
"लई भारी काम केलंय सर त्यानी. म्हणजे त्यानी लई अभ्यास केला असणार या रोलसाठी."
"हं."
"आणि आपण अरुण गवळीला फक्त अलीकडं पाहतो. तरुणपणीचा डॅडी कसा होता, कसा राहायचा, कोणते कपडे घालायचा हे आपल्याला कुठं माहितीये.पण सर पिच्चरमध्ये ना सगळं एकदम डिटेल दाखवलंय."
"अच्छा."
"एखाद्याला महाराष्ट्राच्या गुन्हेगारीची थोडी माहिती असेल तर त्याला नक्की आवडंल सर. महाराष्ट्राचा क्राईम रेशो कसा वाढत गेला हे चांगलं दाखवलंय पिच्चरमध्ये."
क्राईम रेशो हा शब्द ड्रायव्हरच्या तोंडून ऐकून मी एव्हाना गार पडलो होतो. त्या गनगनीत नंतरची त्याची एक दोन वाक्य मी ऐकलीच नाहीत. त्याला वाटलं आपण जास्त बोलतोय.
"सर सॉरी मी जरा जास्त बोलतोय."
"अहो नाही नाही.मीच जरा विचार करत होतो."
हे असले बायोपिक्स हमखास लोकांना आवडेल असे बनवतात दिग्दर्शक लोक.डॅडी सुद्धा कदाचित त्यातलाच एक असावा. म्हणून कदाचित यालासुद्धा मनापासून आवडला असेल असा विचार करता करता घर आले.
"उद्या जातो मी बघायला" असं त्याला म्हणत मी घराकडे चालू लागलो..

Wednesday, August 30, 2017

१९९५ साली आम्ही भाड्याच्या घरातून आमच्या स्वतःच्या घरात राहायला गेलो. त्या अगोदर साधारण चार वर्षांपूर्वी १९९१ ला दादांनी नगरहून टीव्ही आणला होता. टीव्ही होताच त्यामुळे शनिवार रविवार चांगले जायचे. त्यावेळेस दर शनिवारी झी टीव्ही वर फिलिप्स टॉप टेन नावाचा कार्यक्रम लागत असे. त्या त्या आठवड्याची टॉपची १० गाणी त्या कार्यक्रमामध्ये दाखवली जात. अर्थात हिंदी. नुकतंच कळू लागल्यामुळे ही गाणी मला ऐकावीशी वाटत. शनिवारी सकाळची शाळा असे. शाळा सुटली की गाण्याचा हा कार्यक्रम चुकू नये म्हणून मी घाईने घरी येत असे. 

गाण्याचा हा कार्यक्रम एक तासात संपत असे. नंतर कधी गाणी ऐकावीशी वाटली तर बाकी काही पर्याय नसे. मग आपल्याकडे टेप असावा असे वाटत राही. दादांकडे तशी मागणीदेखील केली जाई. ते सुद्धा "घेऊ" एवढंच म्हणत. नाही कधीच म्हणत नसत. असं करता करता एक दीड वर्ष गेलं. टेप काही आला नव्हताच. एक दिवस दुपारची सुट्टी संपवून दादा पुन्हा बँकेत चालले होते. घरातून निघताना मला म्हणाले, 

"चल माझ्याबरोबर."

"कुठे?" बँकेत जाताना मला का बरोबर चल म्हणतायेत असा प्रश्न मला पडलेला. 

"तू चल रे." 

दादांच्या बँकेजवळ सह्याद्री इलेक्ट्रॉनिक्स नावाचं एक दुकान होतं. अजूनही आहे. दादा मला तिथे घेऊन गेले. दुकानात गेल्यावर दुकानदाराचा मुलगा, बाबाला ते म्हणाले, 

"चलो दे दो वह टेप."

त्याने निमूटपणे मागे एका रॅकवर ठेवलेला बॉक्स आमच्या समोर ठेवला आणि उघडायला सुरुवात केली. त्यातून टेप बाहेर काढला. त्याची वायर वगैरे लावून त्यात एक कॅसेट टाकली आणि प्लेचं बटन दाबलं. गाणं सुरु झालं. कुठलं बटन दाबलं की काय होतं वगैरे त्याने समजावून सांगितलं.  रेडिओ कसा लावायचा वगैरे सांगितलं. त्याचं प्रात्यक्षिक झाल्यावर दादा म्हणाले, 

"कर दो पॅक." 

त्याने पॅक केलेला टेपचा बॉक्स माझ्या हातात ठेवत मला म्हणाले,

"हं, जा आता घरी घेऊन."

एव्हाना हे काय चाललंय याचा विचार करत असलेला मी त्यांना म्हणालो,

"हा आपला आहे?"

"आपला नाही तर मग कोणाचा?" दादांनी उत्तर दिले. 

मी खुशीने घरी आलो आणि माझ्या बहिणींना आमचा नवा टेप दाखवला. काय आनंद झाला होता आम्हा तिघांना.पण एक प्रॉब्लेम होता. टेपवर लावायला कॅसेट कुठे होत्या आमच्याकडे. संध्याकाळी येताना दादांनी एक कुठलीशी कॅसेट आणली. त्यावर गाणी ऐकत आम्ही जेवलो असू. पण नंतर बरेच दिवस हवी ती गाणी ऐकायला मिळत नव्हतीच. नाही म्हणायला रोज सकाळी रेडिओ चालत असे. सकाळी बरोबर ७ वाजून ५ मिनिटांनी बातम्या लागत असत. 

"नमस्कार. हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहेत." 

हे वाक्य इतक्या वर्षानंतरसुद्धा ठळक आठवते. तुमच्यापैकी बऱ्याचजणांनादेखील आठवत असेल. कधीमधी आई विविधभारती वर गाणी लावत असे. पण त्यावेळेस आम्ही नेमके शाळेत असू. म्हणजे आपल्याला हवी ती गाणी फक्त कॅसेट्स नसल्यामुळे ऐकायला मिळत नाहीत म्हणून सगळं अडून बसायचं. 

अधूनमधून आम्ही दादांकडे तगादा लावायचो. 

"दादा कॅसेट्स कधी घेणार?"

"घेऊ, घेऊ" ते एवढंच म्हणायचे. 

नंतर एक दोन महिन्यांनी मग मला घेऊन दादा मुंबईला गेले. इकडे तिकडे कामं उरकली. संध्याकाळी आम्ही दोघं आणि अण्णा (माझा चुलता) एका कॅसेट्च्या दुकानात गेलो. कोणत्या कॅसेट्स घ्यायच्या हे दादांनी एका कागदावर लिहून आणलं होतं. त्या लिस्टमध्ये लता मंगेशकर अर्थात सगळ्यांत वरच्या नंबरवर होत्या. मी आपला माझ्या वयाला अनुसरून चित्रपटाच्या गाण्यांच्या कॅसेट्स घ्या असा हट्ट करत होतो. दादा फक्त "जरा थांब, जरा थांब" म्हणत मला थोपवून धरत होते.  

लता मंगेशकर मराठी व हिंदी, किशोरदा, आशा भोसले यांच्या गाण्यांच्या कॅसेट्स दादांनी घेतल्या. नंतर एक कॅसेट सुमन कल्याणपूरच्या गाण्यांची घेतली. एव्हाना माझा हट्ट वाढत चालला होता. तेव्हा बॉर्डर आणि येस बॉस हे चित्रपट आले होते. येस बॉस मधलं "मै कोई ऐसा गीत गाऊ" आणि बॉर्डरमधलं "संदेसे आते है" ही गाणी तेव्हा फिलिप्स टॉप टेनला वरच्या नंबरला होती.मी दादांना आपल्याला ह्या दोन्ही कॅसेट्स हव्यातच असा हट्ट धरला. दादा माझ्या बालसुलभ हट्टाकडे दुर्लक्ष करत बिलींग काउंटरवर गेले. अर्थात माझा हिरमोड झाला होता. त्या दुकानदाराने बहुधा ते ओळखले आणि दादांना म्हणाला,

"इतना सब कॅसेट्स लिया. एक कॅसेट बच्चे के लिये ले लो."

ही मात्रा लागू पडली. आणि दादांनी मला चित्रपटांची नावे विचारली. मी नावे सांगताच त्याने त्या दोन कॅसेट्स पुढ्यात टाकल्या. प्रत्येकीची किंमत तेव्हा ४५ रुपये वगैरे होती. अर्थात महाग!! मग दादा म्हणाले, 

"कोणती तरी एकच घे." 

मी विचारात पडलो. माझं वैचारिक द्वंद्व  दुकानदाराने बरोबर ओळखलं आणि पुढ्यात एक कॅसेट टाकली आणि म्हणाला, 

"ये लेकर जाओ. ए साईडको येस बॉस और बी साईडको बॉर्डर." एका झटक्यात त्याने माझा प्रश्न सोडवला होता. मी खुशीत होतो. सगळी खरेदी घेऊन आम्ही घरी आलो. कधी एकदा जुन्नरला जातो आणि गाणी ऐकतो असं मला झालं होतं. 

जुन्नरला आल्यावर मग रोज गाणी ऐकायची सवयच झाली. कोणती कॅसेट लावायची यावरून आम्हा तिघांत भांडण देखील होत असे. दादांची निवड किती "बाप"होती हे अर्थात आता लक्षात येत होतं. तोपर्यंत फारश्या माहित नसलेल्या गाण्यांच्या मी प्रेमात पडलो. दादांनी प्रत्येक कॅसेट अतिशय काळजीपूर्वक निवडली होती. कुठलीही कॅसेट लावली की अमुक एक गाणं आवडत नाही म्हणून फॉरवर्ड करा असा प्रकार कधी होतंच नसे.

जुन्नरला एका दुकानात रिकाम्या कॅसेटमध्ये गाणी भरून मिळत असत. मग दादांच्या नकळत एक दोन कॅसेट्स मी तशा भरून घेतल्या. दिल चाहता है वगैरे चित्रपटांची गाणी त्या कॅसेटमध्ये टाकल्याचं मला आठवतं. नंतर पुण्याला आल्यावर हॉस्टेलवर टेप वगैरे नव्हताच. इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी कॉम्पुटर घेतला. मग त्यावर गाणी ऐकायला सुरुवात झाली. तरी सुट्टीला जुन्नरला गेल्यावर टेप लागत असे. आईदादा तेव्हासुद्धा सकाळच्या बातम्या लावत असत. २००९ मध्ये मी अमेरिकेला जाईपर्यंत टेप व्यवस्थित चालू होता. नंतर कधी तरी त्याने जीव टाकायला सुरुवात केली. हळूहळू आईदादांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलं.मागे एकदा जुन्नरला गेलो होतो तेव्हा येताना टेप घेऊन आलो. तो चालत नाहीच पण एक आठवण म्हणून असावा म्हणून आपला आणला. नंतर कधीतरी अँटिक म्हणून डिस्प्लेला ठेवता येईल!!

Saturday, August 26, 2017

गणपती आणि मी


गणपतीच्या निमित्ताने एक गोष्ट शेअर करावीशी वाटते..एरवी कधी मंदिरात न जाणारा मी गणपतीच्या दिवसात मात्र का कोण जाणे सगळं मनोभावे करतो..

जुन्नरला आमच्या घरी गणपती नसायचा..पण टेमगिरे आत्याच्या (माझी आत्या) घरी असायचा..तो जणू काही माझ्याच घरचा गणपती आहे असं मला वाटत असे,अजूनही वाटते..अगदी गणपती मूर्ती बूक करण्यापासून ते विसर्जनापर्यंत मी त्यात सहभागी असे.. रविदादा आणि मी दोघंही उत्साहाने सगळं करत असू..मला आठवतं त्याप्रमाणे बऱ्याचदा गणपती प्रतिष्ठापनेच्या वेळी आत्याच्या घरी पौरोहित्य मीच करत असे.. रोज सकाळ संध्याकाळची आरती न चुकता करत असे..ते दहा दिवस उत्साहाचे असत...

नंतर नोकरी निमित्ताने रविदादा पुणे, मुंबईला असायचा..कधी त्याला रजा नाही मिळाली तर आत्या माझ्याकडूनच गणपती बसवून घ्यायची..सगळं काही मी आणि नाना करायचो..माझ्या घरी गणपती नसताना अशा रीतीने का होईना गणपती बाप्पा माझ्याकडून सेवा करून घ्यायचा..हा योगायोग म्हणायचा का?? 

एका वर्षी माझा मित्र आदित्यच्या घरी गणपती विसर्जनाला तो नव्हता..त्याच्या बाबांचे कसलेसे ऑपरेशन झाले होते..त्याने मला पुण्याहून फोन करून सांगितले,

"बाबांबरोबर जाऊन आमच्या घरच्या गणपतीचे विसर्जन कर."  त्या निमित्ताने त्याच्याही घरच्या गणपतीची सेवा झाली..हाही योगायोगच का??

आता पुण्यात आल्यावर गेली ३-४ वर्षे माझ्या बायकोच्या घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना मीच करतोय.. आयुष्यात कुठेही असलो तरी या ना त्या प्रकारे कधीतरी कुठेतरी बाप्पा मला संधी देतोय..

या वर्षीपासून आमच्या सोसायटीमध्ये गणपती आहे.त्याच्या नियोजनात माझा पुरेपूर सहभाग आहेच. 

देव नसला तरी काहीतरी शक्ती हे जग सांभाळतेय असं मी मानतो. "हाच देव आहे" हा भाबडेपणा झाला. या प्रचंड विश्वात जे नियमित व अनियमितही घडते त्यामागे मोठी शक्ति आहे. ह्या आकाराचा, ऊकाराचा, हा देव हे कोणी ठरवले? तर माणसाने. मग माणूसच आधी व मग देव असे समीकरण बसते. नियती सनातन आहे, माणसापूर्वीही ती होती आणि माणूस संपला तरी असणार आहे.नम्र कुठे व्हावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण अंती नियती जे ठरवते तेच घडते. देव माणसाला काही देत नाही व त्याकडून काही घेत नाही. आपल्यासाठी नदी वाहत नाही तर ती वाहते म्हणून आपल्याला पाणी मिळते.आमच्या गावात, थोरांदळ्यात नदी नाही. ती नियती आहे. कोणत्याही देवाला ती आणता आलेली नाही. आता अमूक देव मानला तर सर्व धर्मात ते वेगवेगळे कसे? तुम्हाला जिथे नम्र व्हायला होते तिथे व्हा.मग तो गणपती असेल, अल्ला असेल, येशू असेल किंवा अजूनही काही असेल. फरक काहीच पडत नाही. मी तरी ह्या मताचा आहे.

श्रद्धेत बळ असते असे म्हणतात. मला योग येतोय त्याचा अर्थ  नियती कल्याण करते आहे असा मी घेतो..त्यात मी वाहत जाणार नाहिये हे निश्चित..

Sunday, July 9, 2017

सायकलचोरीची गंमत

पुण्यात असताना आई दादा डेक्कनला रहायला होते. दादांची बँक भवानी पेठेत होती. डेक्कनहून भवानी पेठेत जायला लांब पडे म्हणून दादांनी सायकल घ्यायची ठरवलं. त्यासाठी बँकेतून कर्ज काढून ४२४ रुपयाला सायकल घेतली. कर्जाचा २५ रुपये हफ्ता पगारातून कापला जाई. पुढे जुन्नरला बदली झाल्यावर दादांनी सायकलसुद्धा जुन्नरला नेली. आयुष्यातली पहिली मोठी खरेदी असल्याने दादांचा विशेष जिव होता सायकलवर. 

जुन्नरला असताना बँकेची शाखा सय्यदवाड्यात होती. तिथले लोक हिंदीमध्ये बोलताना मात्र वाडा न म्हणता "बाडा" असा उल्लेख करत. बँक घरापासून फार लांब नव्हती. त्यामुळे दादा पायीच जात असत. सायकल घरीच असे. एकदा त्यांच्या मनात आलं, "आज सायकलवर बँकेत जाऊयात." बँकेत पोहोचल्यावर त्यांनी दारासमोरच्या भिंतीला सायकल लावली. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आले. घरी येताना आपण आज सायकल घेऊन गेलो होतो हे त्यांच्या लक्षात राहिलेच नाही. जेवण करून बिनधास्त झोपलेसुद्धा ते. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना लक्षात आलं की आपली सायकल बँकेतच विसरली आहे. पण अगदी पहाटे जाऊन काही होणार नव्हते. "नंतर बघू" असा विचार करून सगळं आटोपल्यावर मग दादा बँकेत गेले. पाहतात तर सायकल गायब. दादांना धक्का बसला पण स्वतःला सावरून त्यांनी आवाज चढवला,

"यहाँ मेरी सायकल थी. कौन लेके गया?" 

दादांचा मोठा आवाज ऐकून सय्यदवाड्यातले लोक चक्रावले. कारण वाड्यात असे होणे शक्य नव्हते. लोक गरीब होते पण चोर नव्हते. 

"शामतक मेरा सायकल नही मिला तो देखो. मै बराबर देखेगा!!" दादा संतापात जवजवळ ओरडलेच. 

दादांचा पारा चढलेला पाहून २-३ जणांनी जवळ येऊन चौकशी केली. त्यांना दादांनी घडलेला प्रकार सांगितला. 

"सायकल नही मिला तो बाडेकी बदनामी होगी!!" असं बोलून दादा बँकेत गेले. बरीच वर्षे जुन्नरला असल्याने सय्यदवाड्यातले लोक दादांना चांगले मानत. त्यामुळे आता काहीतरी होईल अशी आशा दादांना होती. 

दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास एक पोरगं नाक ओढत दादांकडे आलं आणि म्हणालं,

"साब, ये चाबी लो. सायकल बाहर लगाया है."

दादांना इतका आनंद झाला की त्यांनी पटकन खिशात हात घालून पाच रुपयाची नोट काढली आणि त्या पोराला दिली. 

सायकल चोरीला जाऊनही केवळ बाड्यातले लोक म्हणून ती परत मिळाली असं दादा अजूनही सांगतात. त्या दिवशी मात्र दादांनी न चुकता दुपारीच सायकल घरी नेली. हा किस्सा मात्र आमच्या सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहिला. 

Wednesday, June 28, 2017

गेल्या महिन्यात एका नातेवाईकाच्या घरी लग्न होतं..साखरपुड्याचा कार्यक्रम अगोदरच उरकला होता. त्यामुळे नवरदेवाच्या घरचं वऱ्हाड जरा उशीरानेच विवाहस्थळी पोहोचलं. हळदीचा कार्यक्रम उरकला आणि नवरदेवाला मिरवणुकीला काढायची गडबड सुरू झाली. हळदीचं अंग वगैरे धुवून झाल्यावर नवरदेवाच्या एका मित्राने कपड्यांची पिशवी उचलली. पिशवी हाताला थोडी हलकी लागली म्हणून डोकावून पाहीलं तर त्यात कुर्ताच नव्हता.फक्त सलवार आणि ओढणी. आता आली का पंचाईत!! 

मग सुरू झाली धावपळ.हा म्हणतो इथं असंल तो म्हणतो तिथं असंल.. कुर्ता काही सापडेना.. मग नवरदेवच म्हणाला , "अरे तो अल्टर करायला टाकला होता.तो अजून आणलाच नाहीये."

आता नवरदेवाचीच चूक असली तरी कोणाला त्याला शिव्याही देता येईनात. मग त्याचाच एक मित्र गाडीला किक मारून कुर्ता आणायला गेला. इकडे नवरदेवाच्या भावाने आपले नवे कपडे त्याला घालायला दिले आणि मिरवणूक निघाली. 

मित्र दुकानात पोहोचला खरा.पण पावती न्यायला विसरला. पावती नाही म्हटल्यावर दुकानातले लोक काही ऐकेनात. पावती असल्याशिवाय कपडे मिळणार नाही अशी त्यांची भूमिका. नवरदेवाच्या मित्राने त्याचा आयफोन ठेवायची तयारी दाखवली, पॅन कार्डसुद्धा ठेवतो म्हणाला पण काही जमेना.. मावळी गडी शेवटी तो. काहीच होईना म्हटल्यावर त्याने शेवटचा पर्याय म्हणून आवाज वाढवला. ही मात्रा मात्र लागू पडली आणि कुर्ता घेऊन तो लग्नाच्या हॉलच्या दिशेने सुसाट निघाला.. तोपर्यंत मिरवणूक अर्ध्या रस्त्यात आली होती. पण हा मित्र वेळेवर पोहोचला. मग हॉलवर पोहोचण्याआधी मिरवणूक मध्ये थांबवली गेली.  सगळ्यांनी कोंडाळे केलं आणि नवरदेवाला बाजूला घेऊन त्याला कुर्ता घातला आणि मिरवणुकीच्या रथात बसवला..

असा हा विवाहसोहळा शेवटपर्यंत उत्कंठावर्धक आणि आलेल्या पाहुण्यांची करमणूक करणारा ठरला.. 


Monday, May 22, 2017

डुंबरे सर

"देवः देवौ देवाः --- प्रथमा
 देवम् देवौ देवान् --- द्वितीया"

"इकडे लक्ष द्या." शब्द चालवत असताना मध्येच थांबून आपल्या ठराविक शैलीमध्ये सर मुलांना बोलत असत. 

सरांचा आणि माझा संबंध आठवीत आला. तोपर्यंत सर शाळेच्या नॊकरीतून निवृत्त झाले होते. पण आठवी ते दहावीच्या वर्गांचे संस्कृत आणि इंग्रजीचे क्लास मात्र सरांनी सुरु ठेवले होते. माझ्या अगोदर माझ्या दोन्ही बहीणी सरांकडे क्लासला जात होत्या. त्यामुळे मीही जाऊ लागलो. 

आमची शिकवणी सरांच्या घरी पहिल्या माळ्यावर एका मोठ्या हॉलमध्ये होत असे. दोन शिकवण्यांच्या मध्ये सर खाली जात असत. तेवढ्या वेळात आम्ही वर जाऊन बसत असू. सर नाहीयेत म्हटल्यावर दंगा सुरु असे. दाराजवळ बसलेला मुलगा मध्येच बाहेर डोकावून सर आलेत की काय याची खात्री करत असे. तो आमचा पहारेकरीच म्हणा ना. बऱ्याच वेळेस तो केतन पडवळच असे. सरसुद्धा आमचे सरच होते शेवटी!! कधी कधी सर दारात येऊन शांतपणे आमचा दंगा बघत असत. शेवटी कोणाला तरी कळे आणि आम्ही गप्प बसत असू. दारात उभं राहून मुलांचा दंगा पाहण्यात त्यांना बहूधा मजा वाटत असावी. कारण त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळेस एक मिश्किल हसू असे. 

आठवीत आम्हाला सरांनी पाठ्यपुस्तकापेक्षा व्याकरण जास्त शिकवलं. त्यासाठी आमची भरपूर तयारी त्यांनी करून घेतली. माझं आणि माझ्यासारख्या अनेकांचं इंग्रजी व्याकरण सरांमुळेच पक्कं झालं.मी आठवीत असताना माझी ताई बारावीत होती. तिचा बारावीचा इंग्लिशचा पेपर झाल्यावर सरांनी मला सांगितलं, 

"गुंड, उद्या येताना दीप्तीचा इंग्लिशचा पेपर घेऊन ये."

दुसऱ्या दिवशी आमच्याकडून बारावीच्या इंग्लिशच्या पेपरमधलं सगळं व्याकरण त्यांनी सोडवून घेतलं. आठवीत असणाऱ्या आम्हा सगळ्यांना स्वतःचाच फार अभिमान वाटला त्यावेळेस!! 
आपल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम सर हे असं करत असत. 

व्याकरणात रोज काहीतरी नवीन शिकवायचे सर. त्याची तयारी करून घ्यायचे आणि मग आम्हाला घरी सोडायच्या आधी होमवर्क द्यायचे. दुसऱ्या दिवशी गेलं की त्यांचा प्रश्न ठरलेला असे,

"होमवर्क दिलाय का?"

मग आधी तो होमवर्क आमच्याकडून सोडवून घेत आणि त्यानंतर पुढे शिकवायला सुरुवात करत. 

तीन शब्दांचं एक वाक्य १२ काळांत चालवायला सरांनीच आम्हाला शिकवलं. आणि रोज शिकवणीला सुरुवात करण्याअगोदर कोणातरी एका विद्यार्थ्याला एक वाक्य देऊन ते १२ काळांत चालवायला सर सांगत. नकळतपणे सगळ्याच विद्यार्थ्यांची तयारी होत असे. इंग्रजी नुसतं बोलता आलं पाहिजे यावर सरांचा कधीच विश्वास नव्हता. तर व्याकरणदृष्ट्या बरोबर इंग्रजी बोलता आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे आम्ही सगळेच चांगलं इंग्रजी बोलू लागलो. आजही बोलताना एखाद्याने काही चूक केली तर ती मला खटकते. 

आमच्या घरी इंग्लिश पेपर सुरु करण्याचं श्रेय सर आणि बाईंना जातं. सरांचा मुलगा आशुतोषचं जेव्हा यूपीएससीमध्ये सिलेक्शन झालं तेव्हा त्यांचं अभिनंदन करायला आमचे दादा त्यांच्या घरी गेले होते. बाईंशी बोलताना दादांनी त्यांना विचारलं,

"हे कसं जमवलं तुम्ही?"

"साहेब माझी नोकरी होती. घरातही काम असेच. अशात मग पेपर वाचायला वेळ सापडत नसे. मग मी आशुतोषला पेपर वाचून दाखवायला सांगत असे. तोही अगदी मोठ्या माणसासारखा पेपर धरून वाचीत असे. जसा जसा तो मोठा होत गेला तसा तो पेपर वाचायला चटावलाच जणू. पेपरवाल्याची वाट बघू लागला. थोडा उशीर झाला तर बैचेन होऊ लागला."

हे एकूण दादा त्यांना म्हणाले,

"बाई तुम्ही दोघंही नोकरीला होतात. त्यामुळे तुम्हाला २ पेपर घेणं परवडलं. पण मी मात्र एकटा. माझं गणित कसं बसणार?"

त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडिया दोन रुपयाला असे. ते डोक्यात ठेवून बाई म्हणाल्या,

"माझा हिशोब साधा होता. मुलाने एक नवीन शब्द शिकला की माझे २ रुपये वसूल असे मी समजत असे. तुमच्याकडे तर दोन मुली आणि एक मुलगा असे तिघेजण आहेत. प्रत्येकाने एकेक शब्द शिकला तर तीन शब्दांचे सहा रुपये होतात. तुम्ही उलट चार रुपये फायद्यात जाणार."

हे ऐकून दुसऱ्याच दिवशी दादांनी घरी इंग्लिश पेपर सुरु केला तो आजतागायत सुरु आहे. 

इंग्रजीचा क्लास झाला की आमचा संस्कृतचा क्लास असे. इंग्रजी शिकवताना वाक्यरचनेवर भर देणारे सर संस्कृत शिकवताना मात्र कशीही वाक्यरचना करायची मुभा आम्हाला देत. आणि आम्हाला सांगत सुद्धा,

"संस्कृतच हे एक बरं आहे. सिंटॅक्सचा फारसा प्रश्न येत नाही इथे."

वर सांगितल्याप्रमाणे देव, वन, मालापासून सगळे शब्द सर आमच्याकडून म्हणून घेत. संस्कृतमध्ये पाठांतराला पर्याय नाही हा त्यांचाच धडा. त्यामुळे शाळेत कधी संस्कृतमध्ये आम्हाला अडचण आली नाही. 

सरांची स्मरणशक्तीसुद्धा अतिशय तल्लख होती. एकदा आम्हाला होमवर्क म्हणून सरांनी चाळीस शब्द दिले होते. त्या दिवशी आमचा एक मित्र नेमका उशिराने आला. त्याच्यासाठी ते शब्द सर पुन्हा सांगू लागले. सांगायला सुरुवात करण्याअगोदर आमच्यातल्या एकाला सर म्हणाले,

"आत्ता दिलेले शब्द मी पुन्हा सांगतो. ते त्याच क्रमाने येतात का हे चेक कर."

आम्ही सगळे सावरून बसलो. सर कुठे चुकतात का हे आम्ही पहात होतो. सर त्याच क्रमाने एकेक शब्द सांगत होते. असं करत करत सरांनी चाळीसच्या चाळीस शब्द आधी सांगितलेल्या क्रमानेच पुन्हा सांगितले. आम्ही सगळे सरांकडे आश्चर्याने बघतच राहिलो होतो. 

त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते. पण कॉर्डलेस फोन असत. सरांकडेसुद्धा असाच कॉर्डलेस फोन होता. शिकवताना तो बाजूला ठेवून ते शिकवत असत. एखाद्या वेळेस कधी फोन आलाच तर तो उचलून त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये ते "हॅलो" म्हणत असत. आम्हा सगळ्यांना त्याची तेव्हा मजा वाटे आणि आम्ही भरपूर हसत असू. 

शिकवणीच्या हॉलला एक बाल्कनी होती. तिथे २-३ बरण्यांमध्ये बाई गुलकंद बनवायला ठेवत असत. एक दिवस शिकवणी सुरु होण्याअगोदर मी आणि विन्या बाल्कनीमध्ये जाऊन चोरून गुलकंद खात होतो. सर कधी आले आणि आमच्याकडे पहात उभे राहिले आम्हाला कळलंसुद्धा नाही. थोडा वेळ झाल्यावर आम्हाला आवाज आला, 

"तुमचं झालं असेल तर या आता आतमध्ये."

सरांच्या बागेतल्या कैऱ्या,स्ट्राबेरीज शिकवणीला येणारी मुलं चोरून खात असत. एवढंच काय शिकवणीच्या हॉलच्या मागच्या बाजूला असलेले कांदेसुद्धा मुलं खिशात भरून नेत असत. पण सर कधीही कोणाला काही बोलल्याचं मला आठवत नाही. 

शिकवणी संपल्यावर मुलांना घरी सोडायची सरांची स्वतःची एक खास पद्धत होती. सगळ्यात लांब राहणाऱ्या मुलांना ते आधी सोडत. पण हे करत असताना जुन्नरमधल्या वेगवेगळ्या पेठांची नावे ते घेत. म्हणजे पणसुंबा पेठ, सदाबाजार, ब्राम्हण बुधवार, राष्ट्रीय तेली बुधवार असे करत करत सगळ्यात शेवटी कल्याण पेठ येत असे.मग आम्हाला घरी जायला मिळत असे. 

सरांनी शिकवलेल्या संस्कृतचा बारावीपर्यंत उपयोग झाला. इंग्लिशचा अजूनही होतोच आहे. हळूहळू सरांनी शिकवण्या बंद केल्या. आताही सर या ना त्या कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात. इतक्या वर्षानंतरदेखील तब्येत अजूनही राखून आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो.