Saturday, October 3, 2009

पुन्हा एकदा मराठीतुन ब्लॉग....महाराष्ट्र आणि पुण्याची भेट..

नमस्कार.आज पुन्हा एकदा लिहायला बसलो आहे.निमीत्त आहे ते महाराष्ट्रामध्ये सध्या तापत असलेलं वातावरण.कशामुळे ते तुम्हाला माहित असेलच.आणि सकाळ ने नुकताच सुरु केलेला एक नविन आणि स्तुतिपात्र असलेला असा उपक्रम.सकाळची याअगोदर वेबसाइट होती. www.esakal.com या नावाने.अजुनही आहे.पण आता त्यांनी यामध्ये अजुन एक नविन प्रकार सुरू केला आहे.www.epaper.esakal.com या नावाने.इथे सकाळ ने त्यांच्या सगळ्या विभागाच्या आवृत्त्या एकत्रपणे उपलब्ध करुन दिल्या आहेत.अगदी आपण घरात बसुन पेपर वाचत आहोत असं वाटतं.याअगोदर फक्त वेबसाइट वर मी बातम्या वाचायचो.पण कधी कधी काहीतरी तांत्रिक बिघाड व्हायचा किंवा मलाच वेळ मिळायचा नाही आणि मग पेपरवाचन राहून जायचा.पण आता या नविन प्रकारामुळे मात्र मी रोज चुकता पेपर वाचेल हे तर नक्की.सकाळचे याबद्दल मनापासुन आभार.
तर सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची धामधूम सुरु आहे.मी सध्या फक्त पुण्याबद्दल बोलतो.कालचं दादा आणि भाई यांचा मनोमिलन झालं.भाईंनी अगदी मासे आणि कोंबडी असा बेत केला होता.अगदी जोरात जाहीर करण्यात आलं की आम्ही आता मित्र आहोत.पुन्हा तिकडे कोथरुडमध्ये उज्वल केसकरांची बंडखोरी हा पण एक छान असा विषय मिळाला आहे लोकांना चर्चा करायला.शिवाजीनगर मधुन आधी शिवसैनिक असलेले आणि आता पंजा चे झालेले निम्हण रिंगणात आहेत.बाळासाहेब शिवरकर तिकडे कॅम्पातून आहेत.एकुणात वातावरण गरम झालेलं आहे.
मला खरं तर हा सगळा पोरखेळ वाटायला लागला आहे.काल शत्रु होते,आज काय मित्र झाले आणि उदया काय तर परत शत्रु झाले.अरे काय चाललं आहे हे.तिकीट नाही मिळालं,कर बंडखोरी.पुन्हा अर्ज मागे घ्यायला पैसे घे.आत्तापुरती करु हो मैत्री नंतर बघु काय ते.हे असा या लोकांचं बोलणं.या सगळ्यामध्ये जनता गेली तेल लावतं.आधी माझा खिसा भरु देत,मग जनतेचा विचार करेल मी.विकास काय हो,होत रहातो.आधी पैसे खा.ही असली यांची विचारसरणी.कसा विकास होणार आणि कसं जनतेचं भलं होणार काय माहित.
दुसरं असं की यापैकी किती उमेदवार खरोखर या पदाकरता लायक आहेत याचा तरी विचार पक्षनेतृत्वाने करावा ना.आता कोथरुडचचं उदाहरण घ्या ना.खर तर माझ्या मते उज्वल केसकर हा एक चांगला पर्याय होता भाजप साठी पण त्यांचा पत्ता कापण्यात आला.आता ते बंडखोर म्हणून उभे आहेत.मला असं वाटतं की तिथे सुधा पैसा बोलतो हो.इतके द्या आणि तिकीट घ्या.बाजारीकरण झालयं सगळीकडे.
या सगळ्याचा विचार केला की प्रश्न पडतो की मतदान करावं की नाही.कारण कोणताच उमेदवार योग्य वाटत नाही.पण मग एक जागरुक नागरिक म्हणुन मतदान केलं पाहिजे असं पण येतं. दुर्दैवाने मी सध्या भारतात नसल्याने मला मतदान करता येणार नाहिये.पण एकदा मला असं पण वाटलं की हे बरं झालं म्हणून.लोकसभा निवडणुकांच्या वेळेस मी अगदी विचार करून योग्य त्या उमेदवाराला मत दिलं होतं.पक्ष कोणता आहे याचा विचार नव्हता केला.पण आत्ता माझ्या मुळगावी म्हणजे जुन्नर ला सगळेच उमेदवार बंडल आहेत हो.त्यामुळे मत दिलेलं परवडलं असा विचार मनात येतो.
बाकी महाराष्ट्राचं म्हणाल तर मला यावेळेस पुन्हा एकदा पंजा आणि घड्याळ या आघाडीला जास्त जागा मिळतील असं वाटतं आहे.सेनेला पुन्हा एकदा मनसे चा फटका बसेल असं दिसत आहे.पण एक मात्र नक्की सांगेल की मनसे या निवडणुकीमध्ये एक पक्ष म्हणून आपली एक जागा नक्की निर्माण करेल.आणि कदाचित सत्तेच्या खेळीमध्ये महत्वाची भुमिका पण बजावेल. अंतिमतः सत्ता कोणाकडे जाते हे आपल्याला योग्य वेळी कळेलच.तेव्हा आणि त्याच्या अगोदर एकदा म्हणजे निकाल लागल्यावर,माझी आणि तुमची भेट होइलचं.तोपर्यंत राम राम.

1 comment: