Wednesday, March 22, 2017

रॉंग नंबर


तो लँडलाईन फोनचा जमाना होता. त्यावेळेस प्रत्येकाकडे कोणता ना कोणता रॉंग नंबरवाला फोन येत असे. माझ्या एका मित्राकडे जुन्नरमधल्या एका हॉटेलचे फोन येत असत. तो सुद्धा खुशाल जेवणाच्या ऑर्डर्स घेत असे. आमच्याही फोनवर असा एक रॉंग नंबर येत असे. बर तो साधासुधा नाही तर जुन्नर पोलीस स्टेशनचा असे. त्याला कारणही तसंच होतं. जुन्नर पोलीस स्टेशनचा नंबर २२०३३ तर आमचा २३०३३ होता. त्यामुळे नंबर डायल करायला थोडी चूक झाली की इकडचा फोन तिकडे जात असे. अशा या रॉंग नंबरवाल्या कॉल्सने करमणूक देखील होत असे. 

एक दिवस रात्री फोन वाजला. दादांनी फोन घेतला आणि पलीकडून आवाज आला, 

"हॅलो जुन्नर पोलीस स्टेशन का?"

दादांनी उत्तर दिले,  "नाही गुंड बोलतोय."

पलीकडचा माणूस बहुधा बावचळला असावा. त्याने पुन्हा विचारले. 

"जुन्नर पोलीस स्टेशनला लागला ना फोन?"

दादा म्हणाले, "नाही गुंडांना लागला."

काही कळेनासं होऊन तो पुन्हा म्हणाला,

"ओ साहेब का चेष्टा करताय."

इकडून दादा परत, "अहो खरंच गुंड बोलतोय."

त्या माणसाला काही कळेना. त्याने फोन कट केला आणि दोन मिनिटांनी पुन्हा केला. परत दादांनीच फोन उचलला. 

"हॅलो जुन्नर पोलीस स्टेशन का?"

"नाही हो. मी गुंड बोलतोय. खराखुरा गुंड."

"ओ साहेब, बास की आता. किती टिंगल करणार माणसाची."

इकडून दादा हसत, "मी टिंगल नाही करत. मी गुंडच बोलतोय. फक्त तुम्ही नंबर चुकीचा लावलाय. तुम्हाला २२०३३ लावायचा आहे आणि तुम्ही २३०३३ लावलाय. २२०३३ ला पोलीस आहेत आणि २३०३३ ला गुंड आहेत. आता सांगा कोणाशी बोलायचंय तुम्हाला."

"आयला असं झालंय काय. मी म्हणलं साहेब का अशी टिंगल करतात आज."

एवढं बोलून त्याने फोन ठेवला. आमची मात्र हसून हसून पुरेवाट झाली. 

Friday, March 17, 2017

बुवा आणि अभ्यास

मी दहावीत होतो तेव्हाची गोष्ट. त्यावेळी पहाटे लवकर उठून अभ्यास करायचो मी. दहावीचं वर्ष असल्यानं हे रोजच चालायचं. पहाटेच्या शांततेत अभ्यासात इतर काही व्यत्यय येत नसे. असाच एक दिवस अभ्यास करत बसलो होतो. साधारण चारच्या सुमारास अचानक कोणीतरी माईकवर बोलत असल्याचं जाणवलं. 

"मंडळी, चार वाजले, उठा."

एवढं होऊन शांतता. थोड्या वेळात पुन्हा तोच आवाज,

"मंडळी, चला लवकर उठा. बरोबर ५ वाजता आपण काकडा सुरु करणार आहोत."

थोडा वेळ गेला आणि पुन्हा तेच. हा माणूस पहाटे उठून माईक हातात धरून त्याच्या सहकाऱ्यांना उठवत होता. माझ्या लक्षात आलं की कुठल्यातरी मंदिरात किंवा आश्रमात हा काकड आरतीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त भजन किर्तन वगैरे कार्यक्रम या लोकांनी आयोजित केले होते आणि त्याच घोळक्यातल्या एका स्थानिक पुढाऱ्याला माईक हातात आल्यावर चेव चढला होता. इतका की वेळेचं भान न ठेवता तो खुशाल इतक्या पहाटे माईकवर बोलत होता. 

एव्हाना माझं अभ्यासातलं लक्ष उडालं होतं. दादांना सांगितलं तर ते म्हणाले होईल बंद थोड्या वेळात. मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली तोवर ह्याच्या अजून दोन तीन आरोळ्या देऊन झाल्या होत्या. मग ५ वाजता आरती सुरु झाली. ती सुद्धा माईकवर. मी आपलं दुर्लक्ष करत अभ्यास सुरु ठेवला. 

दुसऱ्या दिवशी परत पहिले पाढे पंचावन्न. भल्या पहाटे कालचाच माणूस पुन्हा माईक हातात घेऊन लोकांना झोपेतून उठवू लागला. हे असं रोजच चालू राहिलं तर आपल्या अभ्यासाची वाट लागेल हे माझ्या एव्हाना ध्यानात आलं. परत दादांकडे मोर्चा वळवला. त्यांनी पुन्हा मला तेच सांगितलं. 

तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार. मग मात्र मी दादांना म्हटलं, 

"या माणसाला काहीतरी करा."

दादांनीसुद्धा विचार केला असेल, 

"हे रोजच चालू राहिलं तर मोठा त्रास आहेच."

त्यावेळेस मोबाईल नव्हतेच. दादा उठून फोनकडे गेले. टेलिफोन डिरेक्टरी उघडून त्या मंदिराचा/ आश्रमाचा नंबर शोधला. फोन लावला. पलिकडून कोणीतरी फोन उचलला. 

"हॅलो, कोण बोलतंय?"

"मी जुन्नर पोलिस स्टेशनमधून बोलतोय. कोण बुवा आहे तिथं ओरडतोय? त्याला गप्प बसव. लोकांच्या तक्रारी आल्यात. च्यायला आमच्याबी झोपा उडवल्यात तुम्ही. ते स्पीकर बंद झालं पाहिजे लगेच." दादाच हिय्या करून फोनवर हे बोलले आणि फोन ठेवून दिला. 

फोन ठेवल्यावर फारतर ३ मिनिटं गेली असतील आणि स्पीकर बंद झाला. आणि बंद झाला तो कायमचाच. माझ्या अभ्यासात येणारा व्यत्यय दादांनी असा सोडवला. 


सांगायचं मुद्दा काय तर तुमच्या भक्तीला आमचा विरोध नाही. पण भावभक्तीच्या नावाखाली कल्ला करू नका. मग ते मंदिर असो की अजून काही, शांततेत देवही सापडतो आणि आमच्यासारख्या पोरांचा अभ्यासही होतो. 

Wednesday, March 15, 2017

एका कवितेची गोष्ट

फार वर्षांपूर्वी आंबेगाव तालुक्यातल्या एका छोट्याश्या खेड्यामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगा आणि तीन मुली. आई लहानपणीच निवर्तलेली. मुलींनी शाळेत जाण्याचे दिवस नव्हते ते. मुलगा मात्र शाळेत जात असे. शाळा गावापासून अडीच तीन किलोमीटर असे. गाडीचा पत्ता नव्हताच. मग दोन पायांच्या गाडीनेच गडी शाळेला जात असे. रस्ता म्हणजे खटारगाडीचा रस्ता असे. जाताना येताना सोबत कोणी नसे. रोज एकटाच. इतकं अंतर एकट्याने जायचं म्हणजे कंटाळा येणारच ना. तेव्हा आत्तासारखे मोबाईल नव्हते की लावले हेडफोन्स आणि गाणी ऐकत गेलाय. खेड्यात राहात असल्याने आहेत ती गाणी माहीत असण्याचा काही संबंधच नव्हता. 

एकट्याने चालताना येणाऱ्या कंटाळ्यावर औषध म्हणून तो मुलगा कविता म्हणू लागला. घर सोडलं की दप्तरातून (दप्तर कसलं साधी पिशवीच असायची) पुस्तक काढायचं आणि मोठ्या आवाजात कविता म्हणायला सुरुवात करायची. रस्त्याने जाणारं येणारं माणूस दिसणं त्यावेळी मुश्कीलच होतं. हा एकटाच मोठमोठ्याने कविता म्हणत जायचा. सूर बेसूर याचा विचार त्याच्या मनाला कधी शिवलाच नाही. पण त्याच्या नकळतपणे ह्या कविता म्हणण्याचा त्याला फायदा झाला. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा सगळ्या विषयांच्या कविता तोंडपाठ झाल्या. गुरुजींनी शिकवल्याने आणि  रोजच म्हटल्यामुळे प्रत्येक कवितेचा भावार्थ त्याला चांगला कळू लागला. 

अशात परीक्षा आली. गद्यावरचे प्रश्न तर त्याने सोडवलेच पण पद्यावरचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे सोडवता आले. मुळात तो हुशार होताच पण आता एकदम पहिला नंबर आला. त्याला काय आनंद झाला सांगू. पण हा आनंद सुद्धा त्याने एकट्यानेच साजरा केला. 

बऱ्याच वर्षानंतर त्याने मग आपल्या या अनुभवावर कविता केली. ती सहज माझ्या हाती लागली म्हणून तुमच्यासमोर ठेवतो आहे.


सावली उंबरी निघाली,
तशी शाळेची वेळ झाली 
काखे मारुनि बुकांची थैली,
स्वारी निघाली शाळेला 

मार्गी बहुतची काटे कुटे,
जोडीला गोटे अन सराटे 
पायताण असणे तेही खोटे,
सोबतीला नसे कुणी 

थैलीतून काढे एक बुक,
आननी  पसरे अमाप सुख
कविता म्हणाया 'हाच' एक,
आवाज तो उंचावूनी 

खड्या स्वरी कविता गाता,
हाच 'गाता' हाच 'श्रोता'
शरम कासया दुजा श्रोता,
दूर अंतरी नसे पै 

आली आली, शाळा आली, 
कविताही कधीच संपली
अहो ती 'पाठच' की झाली!!
अभ्यास न करिताची 

एकदाची परीक्षा होतसे,
सर्वच सवाल सोपे कैसे
फक्त उतरवणे उरले साचे,
बाकी काही नसेची

'हा घ्या' आला पहिला नंबर,
वर्गात झाला बहू गजर 
गळा दाटला अनिवार,
जागीच जिरविला तयाने

कौतुक कुणा नसे साचे,
हेचि वळण पडिले त्याचे 
समजावी आपुल्या मनाते,
उसासूनी पुन्हा पुन्हा 

- जी. बी. 

या गोष्टीतला मुलगा म्हणजे माझे दादा आणि त्यांची ही कविता. 









Sunday, March 12, 2017

जुन्नरची होळी

आज होळीचं नियोजन करायला म्हणून आमच्या सोसायटीमध्ये सकाळपासून लगबग सुरु होती. सोसायटीचा सभासद या नात्याने मीही गेलोच होतो. तेव्हा मग सगळ्यांनी आपापल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

"आदित्य आज संध्याकाळी होळीला येणार ना?" 

घराशेजारच्या विष्णूच्या मंदिरातला संतोष विचारत असे. जुन्नरला असताना दरवर्षी विष्णूच्या मंदिरात अण्णा होळी पेटवत असत. त्या होळीला नैवेद्य दाखवायला आई मलाच पाठवत असे. तिथे मग बोऱ्हाड्यांचा भाऊ, क्षीरसागरांचे विकी आणि मन्या, मिसाळांचा सागर असे बरेच जण येत असत. अण्णा आणि संतोष संध्याकाळपासून मेहनत करून होळी तयार करत असत. आम्हा सगळ्यांना हे नैवेद्य वगैरे निमित्तमात्र असे. खरी मजा होळीभोवती बोंबा मारत फिरण्यात येई. कितीतरी वेळ आम्ही बोंबा मारत होळीभोवती फिरत असू. शेवटी अण्णा ओरडत आम्हाला, "अरे बास आता. किती आरडाओरडा करताय." अण्णांच्या त्या ओरड्यानंतर आम्ही पळ काढत असू. कधीकधी डहाळ्यांचा लालू आणि रितू त्यांच्या घरासमोरच्या तिठ्यावर होळी करत असत. विष्णू मंदिरातली होळी संपवून आम्ही तिकडे पळत असू. तिथे पुन्हा तोच आरडाओरडा करायला मजा येई. बऱ्याचदा मग होळी संपवून घरी जाण्याऐवजी आमचा तिथेच लपंडाव रंगे. इतक्या रात्री लपंडाव खेळण्यात वेगळीच मजा होती. कोणाची तरी आई किंवा वडील येऊन त्याला हाताला धरून नेईपर्यंत डाव चालत असे. 

परदेशपुऱ्याची होळी हे एक अजब प्रकरण होतं. तिथले लोक पिंपळाजवळ एका सुकलेल्या झाडाचे दांडगे खोड उभे करत. ती होळी पहायला वेगळीच मजा असे. पुढचे एक दोन दिवस ते खोड तसेच जळत राही. 

होळीनंतर मग वेध लागत ते रंगपंचमीचे. जुन्नरला धूलिवंदनाला रंग फारसं कोणी खेळत नसे. शाळांनाही रंगपंचमीची सुट्टी असे. त्या दिवशी मग सकाळीच लवकर उठून मी दिवसभराचा अभ्यास उरकून घेत असे. साधारण ११ च्या आसपास बाहेर पोरांचा आवाज यायला लागला की आईने आधीच काढून ठेवलेले जुने कपडे घालून बाहेर पडत असे. कोणाकडे कोणता रंग आहे, कोणता रंग चांगला आहे अशा चौकश्या करून रंग विकत घ्यायला मी सुभाष जनरल स्टोअरकडे जात असे. त्यानंतर अगदी संध्याकाळपर्यंत आम्ही रंग खेळत असू.  डहाळ्यांचा लालू घरासमोर पाण्याचं एक पिंपच भरून ठेवत असे. एकमेकांना रंग लावून आम्ही त्या पिंपाभोवती घोळका करून मस्ती करत असू. ते करत असताना कोणी जाताना येताना दिसला की त्याला धरून रंग लावायचा आणि त्या पिंपात बुचकळून काढायचं हे असले उद्योग आम्ही करत असू. चुकून एखाद्याने हुलकावणी दिलीच तर त्याच्यावर पाण्याच्या फुग्यांचा मारा होत असे. आमच्यातले काहीजण रंग खेळायला येत नसत. ते चुकून आम्हाला कुठे दिसले तर त्यांची मात्र धडगत नसे. काहीजणांना तर आम्ही त्यांच्या घरात जाऊन रंग लावत असू. जसं वय वाढत गेलं तसं रंग खेळण्याचं प्रमाण कमी होत गेलं. पण तरी एखाद दोन तास तर नक्कीच जात असत.

रंग खेळून घरी आलं की आईच्या शिव्या खात आंघोळ करावी लागे. इतका वेळ गार पाण्यात खेळून आल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायला काय सुख असे. बऱ्याचदा तर ही सफाई झाल्यानंतर सुद्धा एखादा मित्र रंग लावायला घरी येई. मग मी आत्ताच आंघोळ केली आहे असं सांगून थोडक्यात सुटका करून घेतली जाई. 

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर कोण किती खेळलं, कोणी किती फुगे फोडले, कोणाला फुगा लागून दुखापत झाली, कोणाचा रंग अजूनही हाताला आहे अशा चर्चा पुढचे दोन दिवस चालत असत. काही शिक्षक रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांना पुढे बोलावून हाताला, पायाला, मानेला, कानाला कुठे रंग आहे का हे तपासून पाहत. जो कोणी सापडेल त्याला छड्या खाव्या लागत. या शिक्षक लोकांना रंग खेळायला मिळत नाही म्हणून त्याचा राग ते आपल्यावर काढतात की काय अशी शंका आमच्या बालमनात तेव्हा येई. 

पुण्यात गेल्यावरसुद्धा एखाद्या वर्षी रंग खेळल्याचे मला आठवते. रंग खेळून वैशालीमध्ये डोसे खाल्ले होते आम्ही. अमेरिकेत गेल्यानंतर इंडियन स्टुडंट असोशिएशनने आयोजित होळीच्या कार्यक्रमाला मी जात असे. पण रंग मात्र खेळल्याचे आठवत नाही.

आज होळी तर साजरी करतोय पण रंगपंचमीला रंग खेळावेत की नाही हा गोंधळ अजूनही मनात आहेच. 


Thursday, January 12, 2017

प्रवास 'शंभर मीटर'चा

"आज दंगल पहायला जातोय." मी चैत्याला फोनवर सांगत होतो. 

"आई बाबांना घेऊन जा. त्यांना आवडेल नक्की." तो पलीकडून म्हणाला. 

"हो त्यांनाच घेऊन चाललोय."

चित्रपट सुरु झाला आणि पहिल्या दहा मिनिटांनंतर मला प्रत्येक फ्रेमला आमच्या पूजाची आठवण होऊ लागली. चित्रपट जसजसा पुढे सरकत होता तसा मी नकळतपणे भूतकाळात जात होतो. 

मी पाचवीत आणि पूजा सहावीत होती. शाळेचे सामने सुरु होते. रनिंगमध्ये माझा टिकाव लागायचा नाही फारसा. मी बाद होऊन बाजूला बसलो होतो. अचानक माई (मी पूजाला माई म्हणतो.) स्टार्टींग लाईनवर दिसली. मी साधारणपणे ५० मीटरवर जाऊन थांबलो. क्लॅप वाजला आणि माई सुसाट सुटली. मी खुशीत येऊन पुढे पळायला सुरुवात केली. पुढच्या काही सेकंदात तिने ती शर्यत जिंकलेली होती. मी पळत जाऊन तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो. पाण्याची बाटली पुढे केली आणि तिच्याबरोबर परत स्टार्टींग लाइनकडे चालू लागलो. ही शर्यंत तिच्या आणि आम्हा सगळ्यांच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरली. 

मागच्या ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे याच शर्यतीनंतर ढमाले सरांनी पूजामधली गुणवत्ता हेरली होती. हिला आपण तयार करायचंच असा निश्चय करून सर दादांना भेटले. दादांनीसुद्धा लगेच परवानगी दिली आणि पूजाची तयारी सुरु झाली. 

शाळेचे संघदेखील भरपूर होते. १४ वर्षाखालील खो-खो, कबड्डी, १७ वर्षाखालील खो-खो, कबड्डी, मैदानी स्पर्धांचा वेगळा संघ. यात पुन्हा मुले आणि मुलींचे संघ आलेच. तयारी करून घ्यायला सर एकटे. सोबतीला चिमटे सर, खराडे सर असत. थोडा वेळ खो-खो, थोडा वेळ कबड्डी असं सर मॅनेज करत असत. मैदानावर गेलं की आधी मैदानाला पळत ३-४ फेऱ्या माराव्या लागत. एक फेरी चारशे मीटरची होत असे. यातून कोणालाही सुटका नसे. ते झाल्यावर इतर व्यायामप्रकार होत आणि मगच सराव सुरु होत असे.   

पूजाच्या वेगाला सरांनी तंत्राची जोड द्यायला सुरुवात केली. नुसतंच पळत सुटायचं याला काही अर्थ नव्हता. हिऱ्याला जवाहिरी जसा पैलू पाडतो तसंच काहीसं सरांनी करायला सुरुवात केली. म्हणायला खरं तर फक्त शंभर मीटर पण प्रत्यक्षात पळताना प्रचंड एनर्जी खर्ची पडते. रोज सराव करताना कमीत कमी दहा तरी स्प्रिंट व्हायच्या. त्याअगोदर वॉर्मअप सुद्धा भरपूर असे. एवढं सगळं केल्याने  तिचा पिट्टा पडत असे. घरी येऊन कधी जेवते आणि कधी झोपते असं तिला होई. सुरुवातीला पाय सुजत तिचे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी परत प्रॅक्टिस असेच. पायांना पुरेसा आराम मिळावा म्हणून मसाज करावा लागे. मग तो मसाज नक्की कसा करायचा हे दाखवण्यासाठी सर एक दोन दिवस घरी आले. त्यांनी स्वतःच्या हातांनी पूजाच्या पायाला मसाज केला. त्यातून मग घरचे आम्ही सगळेच शिकलो. रोज रात्री झोपण्याअगोदर अर्धा तास हा सेशन चाले. 

एवढ्या थकव्यानंतरसुद्धा पूजा पहाटे ४ ला उठत असे. गृहपाठ आणि थोडाफार सेल्फ स्टडी उरकून ६ ला मैदानावर जात असे. ६ ते ८:३० सराव करून घरी येई. घरी आल्यावर मग अंडी, भिजवलेले दाणे असा आहार घेऊन शाळेत जाई. संध्याकाळी परत सरावासाठी मैदानावर. यात ४ वर्षे कधीही खंड पडला नाही. ही सगळी मेहनत करत असताना ती अभ्यासदेखील जोरात करत होती. पहिल्या वर्षी सरांनी पूजाला कोणत्याच स्पर्धेत भाग घेऊ दिला नाही. ते तिला तयार करत होते. 

पुढच्या वर्षी पहिली स्पर्धा तालुका पातळीवर झाली. पूजाने १०० आणि २०० मीटर अशा दोन स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तालुका मारला!! आत्तापर्यंत तालुका मारणे म्हणजे काय असतं हे आम्हाला नुसतंच ऐकून माहित होतं. आता मात्र घरातलं कोणीतरी हे करून दाखवतंय याचा आनंद वाटत होता. पुढची स्पर्धा गट पातळीवर होती. तीन तालुक्यातून विजयी झालेले खेळाडू गट पातळीवर एकमेकांशी स्पर्धा करत. गट पातळीला पहिलाच प्रयत्न असल्याने थोडं दडपण होतं. इथे विजयी होणारे पहिले २ खेळाडू जिल्हा पातळीला खेळत. पूजा इथेही यशस्वी झाली. जिल्हा पातळीच्या स्पर्धा पुण्यात बालेवाडीला होत. तिथे पहिल्यांदाच जायचं म्हणून सरांनी पूजासाठी स्पाईक शूज घ्यायला लावले. स्पाइकचे शूज म्हणजे नक्की काय असतं याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. सरच एक दिवस पुण्याला गेले आणि शूज घेऊन आले. त्यावेळेस तिचे ते शूज बघून मी हरखून गेल्याचं मला पुसटसं आठवतंय. 

स्पाईक्स घालून पळण्यासाठी वेगळी तयारी करावी लागते. या बुटांच्या चवड्याखाली छोटे खिळे लावलेले असतात. पळताना पायाचा फक्त पुढचा भाग जमिनीला टेकावा असा हेतू. पळताना पाय पुढे पडला की ऍक्शन रिऍक्शनच्या नियमानुसार शूज पायाला अजून वर ढकलतात त्यामुळे नकळतपणे पळण्याचा वेग थोडातरी वाढतो. स्पाईक्स घालून पळताना थोडं पुढे झुकून पळावं लागतं. हे तिला जमावं म्हणून सरांनी एका टायरला दोर बांधून त्याची दोन्ही टोके तिच्या खांद्याला अडकवली. हळूहळू त्याचा फायदा दिसू लागला. पूजाचे वजन थोडं जास्त होतं. त्याचाच परिणाम म्हणून तिला पाठदुखी सुरु झाली. पण ती हटली नाही. आम्हाला आता पायांबरोबर पाठीलाही मसाज करावा लागत असे. मूव्ह क्रिमच्या ट्यूबच्या ट्यूब हातोहात संपत होत्या. पण ध्येय ठरलेलं असल्याने घरातलं कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. 

पूजा जिल्ह्याला गेली. पहिलीच वेळ असल्याने निकाल हवा तसा आला नाही. इकडे जुन्नरला आमची घालमेल सुरु होती. संध्याकाळी उशिरा सरांचा फोन आला. त्यांनी दादांना निकाल सांगितला आणि फोन पूजाकडे दिला. पूजा तिकडून ओक्साबोक्शी रडू लागली. इकडून दादा समजूत काढत होते. 

"आपलं पाहिलंच वर्ष आहे हे बाळ. आणि पहिल्या प्रयत्नात आपण जिल्ह्याला गेलो. पुढच्या वर्षी अजून जोमानं तयारी करू. मी आहे तुझ्याबरोबर."

दादांच्या त्या शब्दांनी तिला थोडा धीर आला असावा. दुसऱ्या दिवशी पूजा जुन्नरला आली. शाळेच्या शनिवारच्या असेम्ब्लीमध्ये सरांनी पूजाचं नाव पुकारून तिला पुढे बोलावलं. सगळ्यांच्या समोर तिचं तोंड भरून कौतुक केलं. आपल्या बहिणीचं कौतुक होतंय म्हटल्यावर माझीही छाती फुगून आली होती. ४-५ दिवस कौतुकात गेल्यावर पुनःश्च हरी ओम म्हणतात तसं पुन्हा तयारी सुरु झाली. सरांच्या मदतीला आता खोत सर येऊ लागले. वेळ मिळेल तसा पोकळे सर येऊ लागले. 

पुढच्या वर्षीचं लक्ष्य जिल्हा मारून विभाग खेळायचं होतं. शाळा तिला पूर्णपणे पाठिंबा देत होती. 

गावात लोक दादांना थांबवून सांगत होते.

"साहेब, काल फिरायला गेलो तेव्हा पूजाची प्रॅक्टिस बघितली. काय पळते पोरगी. कमाल आहे राव."

शाळेच्या ग्राउंडचीच सवय नको म्हणून सरांनी पूजाला ओतूर कॉलेजच्या ग्राऊंडवर नेलं. का तर तिथे सरळसोट शंभर मीटरचा ट्रॅक होता. मीही बरोबर होतोच. सरांनी स्टॉपवॉच सेट केलं. खोत सरांनी क्लॅप दिला. पूजाचा स्टार्ट उत्तम झाला आणि पहिल्या वीस मीटरनंतर तिने वेग वाढवायला सुरुवात केली. वाऱ्याच्या वेगाने ती पळत होती. अंतिम रेषा तिने पार केली आणि सरांचे डोळे चमकल्याचे मी पाहिलं. पूजाने तिची आतापर्यंतची सर्वोत्तम वेळ दिली होती. सरांनी अजूनही सांगितलेलं नाही पण माझ्या अंदाजे तिने १४ सेकंद वेळ नोंदवली होती. सर प्रचंड खुष होते. एव्हाना पूजा चालत स्टार्टींग लाईनला आली. आल्या आल्या तिचा पहिला प्रश्न,

"किती आलं टायमिंग?"

तिने हुरळून जायला नको म्हणून सरांनी दोन सेकंद वेळ वाढवून सांगितल्याचं मला आठवतंय. 

त्या वर्षी पूजाने तालुका आणि गट खिशात घातले. पुढच्या तयारीसाठी तिच्या वेगावर परिणाम नको म्हणून सरांनी पूजाला केसांचा बॉयकट करायला लावला आणि टीशर्ट ऐवजी तिच्यासाठी स्लिव्हलेस टॉप आणला. तो नेमका तिला थोडा ढगळ झाला. मला आठवतंय रात्री नऊ वाजता चिमटे सर स्वतःच्या हातांनी आमच्या घरातलं शिलाई मशीन चालवत होते. पूजाच्या टॉपला तिच्या मापाच्या टिपा मारत होते. काय नशीबवान होती पूजा!!! 


पूजा जिल्हा खेळायला पुण्याला गेली. स्पर्धेच्या दिवशी आम्ही सकाळपासून बैचेन होतो. स्पर्धा दुपारी पार पडली तरी निकाल आमच्या पर्यंत यायला संध्याकाळ होत असे. संध्याकाळी सरांचा फोन आला. 

" पेढे तयार ठेवा. पोरीने जिल्हा मारलाय."

काय आनंद झाला म्हणून सांगू. येस्स, येस्स म्हणत घरभर नाचलो मी. दुसऱ्या दिवशीच्या पेपरला पूजाचं नाव आलं. मला पेपर जपून ठेवायला सांगून दादा बँकेत गेले. त्यानंतरचे काही दिवस अदभूत होते. सबंध शाळेत पूजाचं कौतूक होत होतं. बरेच लोक घरी येऊन अभिनंदन करत होते. योगायोगाने त्या वर्षी आम्हाला तिघांना शाळेतल्या स्पर्धांमध्ये एकूण १६ बक्षिसे मिळाली होती. दादांनी फोटोग्राफर घरी बोलावून आम्हा सगळ्यांचा मिळालेल्या ढाली आणि कपांबरोबर फोटो काढून घेतला. त्या वर्षी पूजा विभाग पातळीला हारली. पण त्याचं दुःख फारसं नव्हतं. 

पुढचं वर्ष पूजाचं शेवटचं वर्ष होतं. त्यानंतर ती दहावीला जाणार होती. सरांचं लक्ष आता राज्य पातळीकडे होते. जीवतोड मेहनत करून पूजा राज्यपातळीला गेली. एवढ्या वरच्या लेव्हलला खेळायचं दडपण म्हणा किंवा अजून काही, पूजाने सलग तीन चुकीचे स्टार्ट घेतले आणि स्पर्धेतून तिला बाद  करण्यात आलं. तिचा तिसरा स्टार्ट योग्य होता असं सरांचं म्हणणं होतं पण पंचांचा निर्णय अंतिम यावर सरांचाही विश्वास होता. पूजाचा हा 'शंभर मीटर' चा विलक्षण प्रवास हा असा संपला. अर्थात याबद्दल घरच्यांना,सरांना किंवा तिला स्वतःला कधी खंत वाटली नाही. आपण प्रयत्न केले, जीवतोड मेहनत केली याचं समाधान सगळ्यांनाच होतं. 

पूजाच्या या प्रवासाच्या निमित्ताने ढमाले सर, खोत सरांसारखे गुरु भेटले. आजही ती ४-५ वर्षे आमच्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गेली असं आई दादा सांगतात. 

दंगल पाहताना माझेच डोळे माईच्या आठवणीने ४-५ वेळा भरून आले. तिचा तो सकाळचा सराव डोळ्यापुढं येत राहीला. आई दादांची अवस्था माझ्याहून बिकट होती. गीतामध्ये त्यांना आपली पूजा नक्की दिसली असेल. दादांचं शरीर कापताना जाणवलं मला दोन तीनदा. भरपूर रडले असतील ते दोघेपण. चित्रपट संपल्यावर बाहेर येताना मला म्हणाले, 

"कमाल चित्रपट आहे."

मी हसून पुढे चालू लागलो. त्यांना कळू न देता मीसुद्धा डोळ्याच्या कडा पुसल्या होत्या. 

Thursday, December 29, 2016

ढमाले सर

"अरे जा ना कोणीतरी एंट्रीला. घाबरता का तुमच्या आयला तुमचे." असं म्हणून मी एंट्रीला गेलो. अगोदरच पिछाडीवर असल्याने सेफ एंट्री मारून परत आलो. 

आणि मग लक्षात आलं की शाळेचे मुख्याध्यापक धरून सगळे शिक्षक सामना पाहायला आले होते. मी हा असा वेडेपणा करून बसलो होतो. सामन्याचे मध्यांतर झाल्यावर पंच असलेल्या ढमाले सरांनी मला हाक मारली, 

"गुंड्या इकडं ये जरा." 

थोडासा कावराबावरा होऊन मी गेलो. 

"अरे आजूबाजूला कोण बसलंय याचा विचार करून बोलावं की नाही?" 

"सर अहो ते लक्षात नाही आलं माझ्या. सॉरी." मी आपला डिफेन्सिव्ह मोडमध्ये. 

"जा पळ." 

सामना हारलो आम्ही पण सरांची ही आठवण कायम राहिली. 

ढमाले सरांबद्दल लिहावं असं बरेच दिवस मनात होतं. कच्चं स्क्रीप्ट मनात जुळवून ठेवलं होतं. आज लिहायला बसलो. 

ताई शाळेत माझ्यापुढे ४ वर्षे. ती आठवीला गेली तेव्हा घरात पहिल्यांदा सरांचं नाव ऐकायला मिळालं. फार कडक आहेत, त्यांच्या एका शिट्टीमध्ये आख्खी शाळा शांत होते अशा दरारा वाटणाऱ्या गोष्टी कानावर पडल्या. त्यांना पाहिलं होतं ते फक्त शाळेच्या बक्षिस समारंभामध्ये विद्यार्थ्यांची नावे पुकारताना. काळा रंग, पण चेहऱ्यावर मात्र प्रचंड तेज, दाबून व्यवस्थित बसवलेले केस, मैदानी खेळ खेळून घडवलेलं शरीर अशी त्यांची आणि माझी पहिली आठवण. 

माझी बहीण पूजाला सरांनी आमच्या शाळेच्या स्पर्धांमध्ये पळताना पाहिलं आणि तिच्यातलं कौशल्य लगेच हेरलं. काही दिवसांनी सर घरी येऊन दादांबरोबर बोलले. पूजाच्या सरावासाठी दादांनीसुद्धा परवानगी दिली आणि तिथून पुढे सुरु झाला तो एक अचंबित करणारा प्रवास. पूजावर सरांनी प्रचंड मेहनत घेतली. मला आठवतंय सर सकाळी ६ वाजता ग्राउंडवर येत असत. येताना आपल्याबरोबर आपले मित्र विनायक खोत सर यांना सुद्धा घेऊन येत. चिमटे सर, आवटे शाळेचे पोकळे सर वेळ मिळेल तसे येत असत. पूजाचा पळण्याचा वेग भन्नाट असे. तिच्याबरोबर पळायला कोणी मुलं तयार नसत.हिच्याबरोबर  हारलो तर आपलं हसं होईल अशी भिती पोरांना वाटे. स्पर्धा असल्याशिवाय सराव होणार कसा? मग हेच ३-४ जण वेगवेगळ्या टप्प्यावर जाउन थांबत. पूजाला स्टार्ट मिळाला की एका ठराविक टप्प्यापर्यंत एकजण पळे आणि तिथून पुढे मग दुसरा. असा तो सराव दिवस दिवस चाले. अर्थात त्याचं फळ पूजाला मिळालं. ती राज्य पातळीवर खेळून आली. या सगळ्या प्रवासामध्ये सरांशी एक कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला तो आजतागायत कायम आहे. सरांबरोबर असा कौटुंबिक जिव्हाळा असणारी अनेक कुटुंबे जुन्नरमध्ये आहेत. 

सरांची एक गोष्ट सगळ्यांना आवडे. आपली टीम जिंकण्यासाठी वाटेल तितकी मेहनत घायची त्यांची तयारी असे. त्यासाठी अर्थात पोरांना तेवढच कुथवत असत ते. मग सामना खो खो चा असो किंवा कबड्डीचा. माझा आणि त्यांचा संबंध कबड्डीच्या निमित्ताने आला. १४ वर्षाखालील गटात तेव्हा आम्ही खेळत असू. सागर देवडिगा, अरविंद एखंडेसारखे रायडर होते आमच्याकडे. आदित्य कुलकर्णी, गणेश चिमटेसारखे क्षेत्ररक्षक होते. मी त्या वेळेस डाव्या बाजूचा सातवा लावत असे. या सगळ्याच्या जोरावर आम्ही तालुका पातळीवर अंतिम फेरीपर्यंत सहज मजल मारली. अंतिम फेरीचा सामना खोडदच्या शाळेविरुद्ध होता. त्यांच्याकडे एक ६ फुटाहून जास्त उंची असलेला रायडर होता. त्याने पहिल्या चढाईपासून आमची दाणादाण उडवायला सुरुवात केली. मी सातवा लावत असे. त्याच्या एका एंट्रीला चवडा काढायला वाकलो तर त्याने एक जोरदार दणका दिला डोक्यात. डोकं झिणझिणलं माझं. कोणाला काही कळेना काय करावं. सगळ्यांनी उसनं अवसान आणून सरांकडे पाहिलं. इतक्या वेळ शांत बसलेले सर अचानक उठून पंचाकडे गेले. सबंधित मुलगा या वयोगटामधील नसून जास्त वयाचा आहे, त्यामुळे तो हा सामना खेळण्यास अपात्र ठरतो असा युक्तिवाद सरांनी पंचाकडे केला. सामना थांबवला गेला. तब्बल एक तासाच्या विलंबानंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ पंचाच्या देखरेखीखाली सामना पुन्हा पहिल्यापासून सुरु करण्यात आला. आता मात्र आम्ही पेटून उठलो होतो. पहिल्याच चढाईला त्यांच्या त्या रायडरचा मी चवडा काढला आणि सबंध मैदानात जल्लोष झाला. सामना आम्ही जिंकलाच. पण समोरचा खेळाडू आपल्यापेक्षा वरचढ असेल तर त्याचं मानसिक खच्चीकरण करून सामना आपल्या बाजूने फिरवता येतो हि शिकवण सरांनी घालून दिली. 

मल्लखांबावर सरांचं विशेष प्रेम. त्यांनी शाळेसाठी खास मल्लखांब बनवून घेतला होता. मल्लखांबाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या मुलांकडून चित्तथरारक कसरती ते करून घेत. मलाही मल्लखांब खेळायची इच्छा होती. पण नेमकं सरांनी मला खो खो मध्ये टाकलं. एक दिवस खेळलो खो खो. दुसऱ्या दिवशी मनाचा हिय्या करून सरांकडे गेलो आणि म्हटलं, 

"मला मल्लखांब खेळायचाय." त्यांच्यासमोर जाऊन आपलं मत एव्हढ्या ठामपणे कसं मांडलं माझं मलाच माहित. 

सरांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि विचारले, 

"तुझं नाव काय बाळ?" 

"आदित्य गुंड" मी उत्तरलो. 

दोन सेकंद विचार करून सर म्हणाले,

 "उद्यापासून लंगोट घेऊन ये आणि मल्लखांब खेळत जा."

ते ५-६ महीने माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या फार महत्वाचे ठरले. त्या वर्षानंतर सरांनी मल्लखांब ठेवला तो अजूनपर्यंत बाहेर काढलेला नाही. सुजान मोठा झाल्यावर एकदा मल्लखांब बाहेर काढेन असं ते म्हणाल्याचे मला पुसट आठवतं. पण ते बहुतेक झालंच नाही. 

सरांच्या शिस्तीचा सबंध शाळेमध्ये चांगलाच गवगवा होता. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी कोण गोंधळ करतोय हे त्यांच्या नजरेनं अचूक हेरलेलं असायचं. मग दुसऱ्या दिवशी त्या त्या मुलांना व्हरांड्यामध्ये बोलावून ते त्यांचा निकाल लावत असत. शाळेत इतक्या सगळ्या मुलांच्या गर्दीमधून कोण मुलगा/मुलगी एखाद्याला चिठ्ठी देतोय/देतेय हे ते बरोबर हेरत. आणि मग त्या दोघांना वेगवेगळ्या वेळेस बोलावून त्यांची खरडपट्टी काढत. यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, ती वाम मार्गाला लागू नयेत असा त्यांचा शुद्ध हेतू असे. कधीकधी काही पालक मग सरांची तक्रार घेऊन शाळेत येत. त्यांना मग वेगळ्या पद्धतीने शाळा आणि सर हाताळत असत. अधिक तपशील देणे इथे उचित ठरणार नाही. 

शिस्तीच्या बाबतीत काटेकोर असणारे सर पोरांची काळजीसुद्धा तितकीच घ्यायचे. त्यांच्यावर प्रेमसुद्धा तितकंच करायचे. मग एखाद्याच्या घरी जाउन त्याची चौकशी करणे असो, एखाद्याला प्रेमाने एका विशिष्ट नावाने हाक मारणे असो. सरांच्या हाताखालून गेलेल्या प्रत्येकाच्या त्यांच्या बाबतीत अशा आठवणी असतील. बरेच विद्यार्थी जाउन आता त्यांची पोरं सरांच्या हाताखाली आली आहेत. पण या माणसाचा उत्साह अजून कमी झालेला नाहीये. आजही तितक्याच जोमाने ते रोज संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळायला जातात. ओतूरला शेतावर जाऊन मेहनत करतात. या सगळ्यांत बाईसुद्धा त्यांना खंबीरपणे साथ देत असतात हे विसरून चालणार नाही. अगदी अलीकडे सुजानच्या आजारपणाने त्यांची कसोटी पाहिली. पण त्यातूनही ते समर्थपणे बाहेर पडले. 

आजही सर भेटले की गप्पांच्या ओघात जुन्या आठवणीना उजाळा दिला जातो आणि वेळ कसा निघून जातो हे कळतसुद्धा नाही.सरांच्या निवृत्तीला अजून वेळ आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या उरलेल्या शिक्षकी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन थांबतो. 

Thursday, December 22, 2016

"अण्णा उद्या सकाळी कितीचा गजर लावलाय?" झोपताना मी अण्णाला विचारलं.
"साडे तीनचा लावलाय." अण्णा कुस बदलत म्हणाला.
"बरंय मग मी काही गजर लावत नाही" म्हणत मी सुद्धा निद्रादेवीची आराधना करू लागलो.
पहाटे ३ वाजता जाग आली. शेजारी पडलेला मोबाईल उचलून डोळे किलकिले करत मी वेळ पाहिली तर तीन वाजले होते. अण्णाच्या मोबाईलचा गाजर वाजेलच असा विचार करून मी परत झोपी गेलो.
थोड्या वेळाने अण्णाचा फोन वाजला म्हणून जागा झालो. पाहतो तर सव्वा चार वाजले होते. अण्णा फोन उचलून बोलत होता. दादांचा फोन होता हे लक्षात यायला मला वेळ लागला नाही.
लगेच उठून दोघंजण रात्रीच बनवून ठेवलेल्या चुलाणाकडे धावलो. अण्णाने रात्री आजूबाजूला पडलेल्या पत्रावळी गोळा करून जाळ केला. मी टीपाडातून बादलीने पाणी उपसून कढईत टाकायला सुरुवात केली. एव्हाना दादा आणि काकू आजी जागे होऊन आमची धावपळ बघत उभे राहिले. जाळायला लाकडं कोणती वापरावीत हे आम्हाला कळेना झाल्यावर काकू आजीने भराभरा २-३ मोझीर झालेली लाकडं काढून दिली आणि एकदाची चूल पेटली.
लगीनघर असल्यानं हळूहळू का होईना पण जरा लवकरच घरात जाग येऊ लागली होती. थंडीचे दिवस असल्याने जो तो उठून कढईशेजारी येऊन उबेला बसत होता. एक एक जण आंघोळीला नंबर लागेल तसा उठून जात होता. माझे दोन धाकटे चुलत भाऊ आर्यन आणि अद्वैत सुद्धा शेकोटीला येऊन बसले होते. आर्यनची झोप अजून उडाली नव्हती. त्याने जांभया द्यायला सुरुवात केली तेव्हा मग फोटो काढायचा मोह मला आवरला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे ते निरागस भाव टिपताना माझी थोडी तारांबळ उडाली पण त्याची खंत नाही.