Wednesday, October 31, 2018

सूर्यवंशी सरांशी पहिली ओळख अकरावीत झाली. ते आम्हाला इंग्रजी शिकवत. आठवीत असताना इंग्रजीच्या व्याकरणाचा पाया डुंबरे सरांनी तयार करून घेतला. शाळेत नववी,दहावीला माकुणे सरांनी इंग्रजी विषय इंग्रजीतून शिकवला. पुढे अकरावी, बारावीला सूर्यवंशी सरांनी तेच केले. आपल्याकडे इंग्रजी विषय अनेकदा मराठीतून शिकवला जातो.सूर्यवंशी सरांनी ते करणे कटाक्षाने टाळले. कविता असो किंवा गद्य, त्याचा अर्थ त्यांनी कायम इंग्रजीमधूनच समजावून सांगितला.  त्यामुळे नकळतपणे आम्हाला इंग्रजी कानावर पडत असे. कधी कधी सर वर्गात येऊन एक दोन जणांना उभे करत.त्यांना एखादा विषय देऊन त्यावर इंग्रजीतून चर्चा करायला लावत.सुरुवातीला इंग्रजी बोलताना हसू येई.नंतर मात्र सवय होऊन गेली. बोलताना आम्हाला काही अडचण आली, योग्य शब्द सापडला नाही तर सर मदतीला असतच.मला या चर्चांचा पुढे बराच उपयोग झाला. मी माझं म्हणणं इंग्रजीतून मांडताना अनेकदा दोन वाक्यांच्या मध्ये 'म्हणजे' हा शब्द वापरे.तो आपसूक माझ्या तोंडी येई.सरांनी ते बरोबर पकडले आणि मला त्या ऐवजी 'आय मीन किंवा आय मीन टू से' हे वापरण्याचे सुचवले.मी आजतागायत ते करतो आहे.

आपल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन इंग्रजी बोलताना अडचण येऊ नये या भावनेतून सर आम्हाला इंग्रजी बोलायचा सराव करायाला लावत. या चर्चांचे विषयही आम्हाला आवडतील असे असत.कधी सचिनची बॅटिंग, कधी सध्याची राजकीय परिस्थिती तर कधी अगदी लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज असेही विषय असत.एक आठवण सांगतो. लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज या चर्चेत दोन्ही बाजूकडची मुलं आपली बाजू तावातावाने मांडत होती.सर आपल्या परीने तटस्थ राहून चर्चा पुढे नेत होते. सरांनी लव्ह मॅरेज केलेय हे माहीत असलेल्या मी एका मुद्द्यावर उभे राहून म्हटले,

"Even you chose to go ahead with Love Marriage. In that case, you should support us." 

माझं हे वाक्य ऐकताच सगळा वर्ग हास्यात बुडाला.सरांनाही हसू आवरले नाही आणि अखेरीस त्यांनी आमची बाजू घेतली.

बारावीनंतर जुन्नरमधून बाहेर पडलो.जुन्नरला गेल्यावर अधून मधून सरांना भेटणे होत असे.त्यावेळीही त्यांच्याशी इंग्रजीतूनच संवाद होई. बारावी संपून आता पंधरा वर्षे होतील.सर आजही संपर्कात असतात.माझे ब्लॉग नियमित वाचत असतात.काही चूक वाटली तर आवर्जून तसे सांगतातही. आज सर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा दाटून आल्या. सरांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.

Tuesday, October 30, 2018

पंधरा काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.माझी बहीण पूजाला मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्टला अॅडमिशन मिळाले.कॉलेजचं तर झालं पण राहण्याची व्यवस्था अजून झाली नव्हती. मरीन लाईन्सला असलेल्या मुलींच्या सरकारी हॉस्टेलला जेजेच्या विद्यार्थीनींसाठी काही जागा राखीव असतात. या जागाही लवकर भरतात. पूजाच्या अॅडमिशनला तसा  उशीर झाला होता.त्यामुळे हॉस्टेलला प्रवेश मिळेल की नाही याबाबत शंका होती. दादांना कुणीतरी सांगितलं,

"वळसे पाटलांना भेटा. ते करतील काम."

साहेब त्यावेळी महाराष्ट्राचे उच्चशिक्षणमंत्री होते. एक दिवस सकाळीच दादा साहेबांच्या मुंबईतल्या शिवगिरी बंगल्यावर गेले. भेट ३-४ मिनिटांचीच झाली. साहेबांनी काम होईल याची खात्री देऊन त्यांचे स्वीय सहाय्यक भोर यांच्या संपर्कात राहण्यास सांगितले.

त्यानंतर काय सूत्रे फिरली की काय झाले कल्पना नाही.दोन एक दिवसांनी भोर साहेबांचा दादांना फोन आला,

"उद्या मुलीला घेऊन हॉस्टेलला जा.तिथं सगळं होईल व्यवस्थित."

त्यांनी सांगितल्याप्रमाणे दादा आणि पूजा हॉस्टेलला पोहोचले.ते पोहोचतात तोच हॉस्टेलचा फोन वाजला. फोनवर बोलून रेक्टर मॅडम बाहेर आल्या आणि दादांना म्हणाल्या,

"तुम्ही गुंड का?"

दादांनी हो म्हणताच त्यांनी पूजा आणि दादांना ऑफिसमध्ये नेऊन पुजाचा हॉस्टेलच्या प्रवेशाची प्रक्रिया वेगात पार पाडली. 

आपल्या गावची एक मुलगी जे जे सारख्या कॉलेजला जातेय म्हटल्यावर तिच्या हॉस्टेलचं हे छोटंसं काम केलंच पाहिजे या भावनेने साहेबांनी पूजाचं हे काम करून दिलं.

आजही कधी पूजाच्या अॅडमिशनची आठवण झाली की साहेबांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा प्रसंग पुन्हा एकदा आठवला. 

साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Monday, October 22, 2018

द ड्रेनेज

परवा बाणेरच्या ड्रामालयला 'द ड्रेनेज' नावाची शॉर्टफिल्म पाहिली. गावावरुन एक माणूस स्मार्टफोन घ्यायला शहरात येतो. त्याचा जुना फोन देऊन नवा स्मार्टफोन विकत घेतो. नवा फोन घेतल्याच्या आनंदात गावाकडच्या आपल्या एका मित्राला फोन करतो. मी नवा फोन घेतलाय, टचस्क्रीन आहे असं कौतुक चाललेलं असतं. तितक्यात एका दुचाकीवाल्याचा धक्का लागून फोन त्याच्या हातातून खाली पडतो तो नेमका एका ड्रेनेजमध्ये. 

दहाच मिनिटांपूर्वी घेतलेला फोन ड्रेनेजमध्ये पडल्यावर त्या माणसाची काय अवस्था होते? तो फोन परत मिळवण्यासाठी तो काय काय करतो? या सगळ्याची गोष्ट म्हणजे 'द ड्रेनेज'. नंदू माधव यांनी भूमिकेला यथायोग्य न्याय दिला आहे. गावाकडचा माणूस, त्याचं शहरातील बावरत वावरणं, मोबाईल ड्रेनेजमध्ये पडल्यावर तो पुन्हा मिळवण्यासाठीची धडपड हे सगळं त्यांनी खूपच मस्त साकारलंय. एका प्रसंगात बरोबर त्यांचा फोन पडलेल्या ड्रेनेजच्या झाकणावर एक गाडी येऊन थांबते. एरवी कुणी असतं तर त्या गाडीवाल्याला सांगून गाडी दुसरीकडे लावायला सांगितली असती आणि फोन काढायचे प्रयत्न सुरु ठेवले असते.  बाजूला बसून गाडी कधी हलेल याची वाट बघत बसतात. यातून त्यांचा साधेपणाही जाणवला. 

तुम्ही म्हणाल एवढंच आहे का शॉर्टफिल्ममध्ये? तर नाही. शॉर्टफिल्म ज्याने लिहिली आणि दिग्दर्शित केली त्या विक्रांत बदरखेशी या निमित्ताने बोलायला मिळालं. शॉर्टफिल्मच्या शेवटच्या काही फ्रेम्समधून दिग्दर्शक त्याला द्यायचा असलेला संदेश देतो. मोबाईलचं व्यसन वगैरे विषय आजवर भरपूर चघळून झालेत. विक्रांत त्याही पलीकडे जाऊन विचार करतोय. गावात मोबाईलला रेंज नाही म्हणून विक्रांतच्या एका नातेवाईकाच्या शेतात मोबाईलचा टॉवर लावण्यात आला. त्याच महिन्याकाठी भाडंही सुरु झालं. मोबाईलला रेंजदेखील आली. मात्र त्यामुळे ही माणसं कुठेतरी शेती करायला आळसू लागली. हे सगळं कुठेतरी विक्रांतला खटकत होतं. आपल्या या नेहमीच्या जगासारखंच मोबाइलचंही एक जग आहे की काय? ते जग आपल्या जगाहूनही भयंकर आहे काय? या सगळ्या विचारांमधून 'द ड्रेनेज' ची  निर्मिती झाली. 

एका हलक्याफुलक्या विषयावर ही फिल्म आहे असे वाटत असताना शेवटची ३-४ मिनिटं मात्र तुम्हाला बराच वेळ विचार करायला भाग पाडतात. पंधरा मिनिटांत ही शॉर्टफिल्म तुम्हाला जिंकते. ड्रेनेजमध्ये केलेलं शूटिंग, आतमध्ये असलेला अंधार, घाण, त्यात शूटिंग करताना फवारलेले रूम फ्रेशनर आणि काय काय. हे सगळं करताना नक्की कसं केलं हे विक्रांतने सांगितलं तेव्हा त्याच कौतुक वाटलं. 

एक मुलगा अकोल्याहून पुण्यात येतो काय, स्पर्धा परीक्षांची तयारी करता करता लिहिता होतो काय, शॉर्टफिल्म लिहितो काय, आणि त्या शॉर्टफिल्मला जगभरातल्या अनेकानेक महोत्सवांमध्ये पारितोषिकं मिळतात काय!! एक लेखक, दिग्दर्शक म्हणून विक्रांतचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. चित्रपटांचा दर्जा खालावला असे म्हणणाऱ्या लोकांना द ड्रेनेजसारख्या फिल्म्स दाखवल्या की या क्षेत्राचं भवितव्य योग्य हातांत आहे याची त्यांना खात्री पटेल. 

टिप - ही शॉर्टफिल्म युट्युबवर उपलब्ध नाही. लवकर युट्युबवर येईल अशी शक्यताही नाही. वेळोवेळी या फिल्मचं स्क्रीनिंग पुणे, मुंबई आणि इतरही शहरांत होत राहील. तुमच्या शहरात आली की न चुकता पहा. 

Monday, October 8, 2018

अंधाधुन

आत्ताच अंधाधुन बघून आलोय. ट्रेलर न पाहता फक्त एका मित्राने सांगितलं भारी आहे म्हणून गेलो. बऱ्याच वर्षांनी एकट्यानेच चित्रपट पाहिला.हा चित्रपट पाहून कधी एकदा घरी जाऊन लिहीतोय असं आज झालं होतं. 

प्रेक्षकाला शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणे की काय म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण आहे हा चित्रपट. ब्लॅक कॉमेडी आहे. चित्रपटाची सुरुवात मिस करू नका. कारण ती मिस झाली तर अख्ख्या चित्रपटाची मजा जाईल. 

आयुष्यमान आधीच भारी अॅक्टिंग करतो. त्यात त्याला हा चित्रपट मिळाला ज्यात तो एक मुख्य पात्र आहे. त्याने आंधळ्याच्या (सॉरी आंधळ्याचं नाटक करणाऱ्या - हा स्पॉयलर नाही) भूमिकेत जीव ओतला आहे. तब्बू हे दुसरं मुख्य पात्र. तिच्याबद्दल न बोललेलंच बरं इतकी ती भारी आहे.तिचं वय जसजसं वाढत चाललंय तसतसा तिचा अभिनय जास्तच भारी होत चाललाय. राधिका आपटेने छोट्याश्या भूमिकेत हवा केली आहे. झाकीर हुसेन हा डॉक्टरच्या भूमिकेत मजा आणतो. 

तब्बूने केलेला एक खून आयुष्यमान पाहतो, त्याने आपल्याला पाहिलंय हेही तब्बूला माहित असतं. तरी चित्रपट तुम्हाला गुंतवून ठेवतो. का? ते चित्रपट पाहूनच माहित करून घेणे जास्त योग्य राहील. दिग्दर्शक श्रीराम राघवन फिल्म इन्स्टिट्यूटचा माजी विद्यार्थी असल्यामुळे पुण्यात चित्रीकरण करावे असे त्याला वाटले असू शकेल. संपूर्ण चित्रपट पुण्यात चित्रित झाल्याने सतत आपल्याला माहित असलेल्या जागा दिसल्या की काही भान नसलेले प्रेक्षक मोठ्याने "अरे गुडलक चौक आहे हा." वगैरे वगैरे ज्ञान पाजळत राहतात. (पुण्यात चित्रित झालेला चित्रपट पुण्यात पाहताना तरी हे ज्ञान पाजळु नये याचं त्यांना भान रहात नाही. असो.)

अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत चित्रपट तुम्हाला धरून ठेवतो. किती? तर माझ्याशेजारी बसलेलं १२-१३ वर्षांचं पोरगं निम्म्याहून जास्त वेळ खुर्चीच्या पुढच्या कडेवर बसलं होतं आणि संपूर्ण चित्रपटात न राहवून त्याने ५-६ वेळा 'फक' म्हटलं.   

हा चित्रपट शांतीत क्रांती करतोय. फक्त माऊथ पब्लिसिटीवर चालणार आहे. यावर्षीच्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. पाहिला नसाल तर विकेंडची वाट पाहू नका. पस्तावा होणार नाही याची खात्री माझी. 

Friday, October 5, 2018

समालोचनाचे दोन दिग्गज

रिची बेनॉ आणि टोनी ग्रेग हे दोघेही माझ्या पिढीला खेळाडू म्हणून तितकेसे आठवत नाहीत. दिग्गज समालोचक म्हणून मात्र निश्चित आठवतात. मला स्वतःला रिची बेनॉ यांची कॉमेंट्री फारशी आठवत नाही. टोनी ग्रेग यांची कॉमेंट्री न ऐकलेला माझ्या पिढीचा माणूस सापडणं मात्र अवघड आहे.

टोनी ग्रेग यांची कॉमेंट्री म्हणजे दर्शकांसाठी पर्वणी असे.एखाद्या फटक्याचे भरभरून कौतुक कसे करावे हे शिकावे तर त्यांच्याकडूनच.एखाद्या खेळाडूने सोपा कॅच सोडला तर सयंतपणे फक्त बोलण्यातून त्याची लायकी काढावी ती त्यांनीच.

भारतीय क्रिकेट रसिकांना टोनी ग्रेग जास्त लक्षात राहतील ते त्यांच्या शारजामधल्या कॉमेंट्रीमुळे. सचिन ऑस्ट्रेलियाच्या चिंध्या उडवत होता तेव्हा माईक टोनी ग्रेग यांच्याकडे होता हे बरंच झालं असं आता वाटतं. सचिनची तो स्फोटक खेळी  जगप्रसिद्ध करण्यात ग्रेग यांच्या कॉमेंट्रीचाही तितकाच मोलाचा वाटा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

आज रिची बेनॉ आणि टोनी ग्रेग या दोन दिग्गजांचा जन्मदिवस.आजच्या काही क्रिकेट समालोचकांची कॉमेंट्री ऐकून अक्षरशः कीव येते आणि या दोन दिग्गजांची आठवण आल्यावाचून रहात नाही.

क्रिकेटरसिक हे दोन आवाज येणारी अनेक वर्षे मिस करतील यात शंका नाही.

Friday, September 14, 2018

आवाज कुणाचा?

कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही मोठ्याने ओरडा, 

"आवाज कुणाचा?" 

तुमच्या आरोळीला प्रतिसाद म्हणून, "मेकॅनिकलचा." असं म्हणणारे आवाज सगळ्यात जास्त असतील. अर्थात मेकॅनिकलच्या पोरांचा त्यादिवशी मासबंक नसेल तर हं!  

प्रत्येक इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये अशीच परिस्थिती असते. पहिलं वर्ष सगळ्यांना सारखंच असल्याने फारसा फरक पडत नाही. दुसऱ्या वर्षांपासून मग त्या त्या शाखेचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरु होतो. डिपार्टमेंटच्या इमारती वेगवेगळ्या असतात. आमच्या कॉलेजला मॅकेनिकल डिपार्टमेंटचा पोर्च आहे. कॉलेज सुरु होण्याआधी तिथं सगळे जमायचे. वाटलंच तर लेक्चरला जायचे. दररोज लेक्चर्स सुरु होण्याआधी आमच्या कॉलेजात प्रार्थना होत असे. ही प्रार्थना सुरु असताना उभे राहणे अपेक्षित असे. एकदा प्रार्थना सुरु असताना मॅकेनिकल पोर्चला काही मुले शांतपणे बसून राहिली. पलीकडे असलेल्या ई अँड टीसीच्या पोर्चमध्ये उभ्या असलेल्या एका मॅडमने हे पाहिले. प्रार्थना संपल्यावर त्या न राहवून मेकॅनिकल पोर्चकडे आल्या आणि आम्हाला ओरडू लागल्या. एक तर आपल्या डिपार्टमेंटचे सोडून इतर शिक्षक माहित नसलेल्या आम्हाला त्या आमच्याशी बोलत आहेत हे कळायला दोन मिनिटं गेली. कळल्यानंतर ह्या आपल्या डिपार्टमेंटच्या नाहीत म्हणून त्यांच्याकडे कुणी लक्षही दिलं नाही. आपल्या बोलण्यावर मुलांची काहीच प्रतिक्रिया नाही बघून त्यांनी चिडून निघून जाणे पसंत केले. त्यानंतर मात्र पोर्चात हास्याचे फवारे उडाले हे सांगायला नकोच.  

कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकलची पोरं अतिशय टारगट म्हणून गणली जातात. लेक्चर्स बंक करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे मेकॅनिकलची पोरं वागतात. आपले ज्युनियर्स जर सिन्सीयरली लेक्चर्स करत असतील तर सिनियर्स येऊन त्यांना वेड्यात काढतात. इतकं की आपण लेक्चर्स करून मोठी चूक करतोय की काय असं त्या ज्युनियर्सला वाटू लागतं. हळूहळू मग तेही सिनियर्सचा कित्ता गिरवू लागतात. 'मासबंक' हा शब्द फक्त उच्चारायची खोटी की मेकॅनिकलची पोरं वर्गातून बाहेर असतात. इतर ब्रॅंचेसची पोरं लेक्चर्स इमाने इतबारे करत असताना मेकॅनिकलची पोरं मात्र निवांत असतात. 

किती निवांत? तर एकदा लेक्चर बुडवून पोर्चात बसलेल्या आम्हाला सर येऊन म्हणाले, 

"अरे इथे काय बसलात? चला सगळे लेक्चरला." एवढं सरांनी रंगेहाथ पकडल्यावर तरी लेक्चरला जावे. पण जातील ते मेकॅनिकलचे कसले? आमच्यातलेच एक दोन जण सरांना म्हणाले, 

"सर आज नको. उद्या आम्ही सगळे नक्की येऊ." काय बोलायचं आता? 

"उद्या नक्की यायचं." एवढं म्हणून सर बिचारे निघून गेले. 

हे लेक्चर बंक करणं दुसऱ्या वर्षांपासून सुरु होतं ते अगदी शेवटच्या वर्षापर्यंत सुरूच असतं. कॉलेजमधून घरी पत्रं वगैरे जातात पण पोरं पालकांनासुद्धा सांगतात, 

"ते पत्र फाडून टाका."

सबमिशन वगैरे प्रकार आपल्यासाठी नाहीच असं मेकॅनिकलची पोरं मानतात. वेळ आली की मग ज्याने एखाद्याने फाईल पूर्ण केली असेल त्याची फाईल संपूर्ण वर्ग कॉपी करतो. मग त्याचं काही चुकलं असेल तर सगळ्या वर्गाची तीच चूक होते. एखाद्या एक्सपेरिमेंटचे रिडींग सबंध वर्गाचे सारखेच असतात. इतर ब्रँचची पोरं दर आठवड्याला प्रॅक्टिकल करतात. मेकॅनिकलवाले सेमिस्टरच्या शेवटी एकाच दिवसात सलग बसून सगळे प्रॅक्टिकल करतात. चुकून एखाद्या विषयाचं प्रॅक्टिकल दर आठवड्याला झालं तर त्याचं जर्नल मात्र सेमिस्टरच्या शेवटीच पूर्ण केलं जातं. एखादा शहाणपणा करत मध्ये जर्नल घेऊन गेला तर प्रोफेसर लोकसुद्धा त्याला सेमिस्टरच्या शेवटी यायला सांगतात. मग एकाच दिवशी रांगेने सगळ्यांचे जर्नल तपासले जातात. आठ एक्सपेरिमेंट असतील तर आठ सह्या न करता, महिरप टाकून एकच सही केली जाते. 

बरं इतकं सगळं केल्यावर मार्क कमी पडले पाहिजेत. तसंही होत नाही. बऱ्याच पोरांना अगदी चांगले नाही तरी बरे मार्क पडतात. म्हणजे इतर ब्रँचची पोरं लेक्चर्सला बसून, जीवतोड अभ्यास करून जेवढे मार्क पाडतात तेवढे तर मेकॅनिकलची पोरं शेवटी शेवटी अभ्यास करूनही पाडतात. त्यामुळे आधीच मेकॅनिकलचा रुबाब असणाऱ्या पोरांना एखाद्या कॉम्प्यूटर किंवा इतर कुठल्या तत्सम ब्रँचच्या पोराने हटकले तर त्याची धडगत नसते. 

अभ्यास सोडून खेळाचा विषय घेतला तर तिथेही तेच. सगळ्या खेळांत मेकॅनिकलच विजेते. डायरेक्टर्स ट्रॉफी दर वर्षी मेकॅनिकलकडेच. नाही म्हणायला सिव्हिलवाले थोडीफार स्पर्धा करतात. पण त्यांच्यात अभ्यास करणारे फक्त अभ्यास करतात आणि खेळणारे फक्त खेळतात. 
कॉलेजच्या गॅदरिंगला दंगा करावा तर मेकॅनिकलच्याच पोरांनी. त्यांच्यासारखा दंगा कुणीच करत नाही. मग खुर्च्या हवेत फेकणे असो, खुर्च्यांवर उभे राहून नाचणे असेल, एखाद्याला विशिष्ट शब्दाने हाक मारणे असेल किंवा अजून काही. कॉलेजचं गॅदरिंग आपल्यासाठीच आहे अशा आविर्भावात मेकॅनिकलची पोरं वावरतात. 

या सगळ्या स्पर्धांमध्ये चियरिंगदेखील तेवढेच महत्वाचे असते. "आवाज कुणाचा?" असं म्हटलं की त्या त्या ब्रँचची पोरं आपल्या ब्रँचचं नाव घेऊन ओरडतात. या सगळ्यांत मेकॅनिकलचा आवाज सगळ्यात मोठा असतो हे सांगायला नकोच. माझ्या हॉस्टेलचा एक सिनियर केमिकल ब्रँचचा होता. त्याच्या ब्रँचच्या पोरांबरोबर चियरिंग करताना, "आवाज कुणाचा?" कुणी म्हटलं की त्याचे सगळे मित्र केमिकलचा म्हणायचे. हा एकटाच मेकॅनिकलचा म्हणायचा. त्यासाठी त्यांचा मारही खायचा. नंतर आम्हाला कायम सांगायचा, 

"मेकॅनिकल ब्रँच भारी असते राव. त्यावेळी ऍडमिशन मिळालं नाही म्हणून मी केमिकलला आलो. पण मेकॅनिकलबद्दल प्रेम अजूनही आहे." 

प्लेसमेंट सुरु होताना आम्हाला मार्गदर्शन करायला आमचे डीन आले. सगळ्याच ब्रँचची पोरं समोर बसली असताना डीनने आपल्या भाषणाची सुरुवात काही अशी केली, 

"खरं सांगायचं तर इंजिनीयरिंगच्या ब्रँच तीनच. एक सिव्हिल, दुसरी मेकॅनिकल आणि तिसरी इलेक्ट्रिकल. हे कॉम्प्युटर, ई अँड टीसी वगैरे सगळं खोटं आहे." 

त्यांचं हे वाक्य संपायची खोटी की मेकॅनिकलच्या पोरांनी अख्खा हॉल डोक्यावर घेतला. कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजच्या प्लेसमेंट हॉलमध्ये डीनसमोर पोरांनी शिट्ट्या मारल्याचा हा एकमेव प्रसंग असेल. इतर ब्रँचच्या पोरांची तोंड तेव्हा बघण्यासारखी झाली. 

इंजिनीयरिंगचा शेवटचा पेपर झाला तेव्हा आमच्यातला एकजण भर वर्गात उभा राहून ओरडला, 
"अरे आवाज कुणाचा?"

आपण परीक्षागृहात बसलो आहोत याचा विचार न करता आम्ही सगळे एका सुरात ओरडलो, 

"मेकॅनिकलचा."

ते होत नाही तोच काही जणांनी व्हरांड्यात सुतळी बॉम्ब फोडले. तेवढ्यावर न थांबता ढोल ताशे बोलावून त्याच्या तालावर नाचायला सुरुवात केली. कॉलेजच्या आवारात नको म्हणून सांगायला
आलेल्या सिक्युरिटी गार्डलासुद्धा नाचवले. पोरं इंजिनीयर झाली म्हणून तोही आनंदाने नाचला. त्यानंतर मात्र इतर सगळ्याच ब्रँचची पोरं एकत्र येऊन नाचली. कारण सगळेच इंजिनीयर झाले. आज दहा वर्ष झाली इंजिनीयरिंग पूर्ण करुन. माझ्या माहितीतला एक मुलगा नुकताच मेकॅनिकल इंजिनीयर झाला. एकदा सहज गप्पा मारता मारता त्याला विचारलं, 

"मग सध्या आवाज कुणाचा आहे?"

"प्रश्न आहे का हा सर? परीक्षांचे पॅटर्न बदलले, वेळही बदलली, मुलंही बदलली तरी आवाज कायम मेकॅनिकलचाच होता आणि मेकॅनिकलचाच राहील." हे त्याचं उत्तर ऐकून मीही गालात हसलो. 

Wednesday, September 12, 2018

पी.आर.

पी.आर. म्हटलं की जुन्नरकरांना डॉ. पी. आर. कुलकर्णीच डोळ्यासमोर येतात. लहानपणी एकदा काहीतरी निमित्त झालं आणि मी आजारी पडलो. दोन तीन दिवस उपचार करूनही काही फरक पडेना. मग दादा मला घेऊन पीआरकडे गेले. ती पीआर आणि माझी पहिली भेट. तशी माझा वर्गमित्र आणि आता जवळचा मित्र असलेल्या आदित्यचे वडील म्हणून ओळख होतीच. मात्र पेशंट म्हणून त्यांच्याकडे जाण्याची ही पहिलीच वेळ. नंबर आल्यावर मी दादांबरोबर आत गेलो. त्यांनी दादांना नमस्कार केला आणि विचारले, 

"बोला, काय होतंय?" 

पेशंटला हा प्रश्न विचारण्याची पीआरची शैली अशी काही आहे की पेशंटच्या चेहऱ्यावर आपले दुखणे सांगतानाही हसू येते. 

दादांनी त्यांना काहीतरी सांगितले असावे. त्यांनी समोरच्या टेबलावर मला झोपवून तपासले आणि काही गोळ्या लिहून दिल्या. 

"परत कधी येऊ?" म्हणून दादांनी विचारले तर ते म्हणाले, 

"परत कशाला येता आता? एवढ्यात बरा होणार आहे तो. बिनधास्त जा."

आपला पेशंट परत आपल्याकडे येऊ नये असे म्हणणारा हा अजब डॉक्टर आहे. तेव्हापासून अनेकदा पीआरकडून कधी डोकं फुटलं म्हणून, कधी डोळ्याच्या वर खोक पडली म्हणून, कधी गुडघा फुटला म्हणून पट्टी मारून घेणं हे नित्यनियमाचे झाले. त्यांचा दवाखानाही शाळेच्या जवळ असे.त्यामुळे काही झालं की मी आधी त्यांच्याकडे पळत असे. त्यांनाही कौतुक वाटे. मुलं म्हटलं की पडझड आलीच. त्यासाठी त्यांना रागावून काही होत नाही असंही हे पालकांना आवर्जून सांगत. 

दादा सांगतात त्याप्रमाणे पीआर जुन्नरमध्ये साधारणपणे १९७५-७६ मध्ये आले. जुन्नरमधल्या आपल्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी तेलीबुधवारातून केली. तेव्हा आठ आणे वगैरे फी घ्यायचे ते. पीआरचं पेशंटबाबतचे निदान अचूक असते अनेक जुने लोक आजही सांगतात. त्यामुळे योग्य उपचार होऊन पेशंटला गुणही येई. अल्पावधीतच पीआर जुन्नर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. अगदी लांब, मावळातूनसुद्धा पेशंट येऊ लागले. आजही त्यांच्याकडे तेव्हाचे काही पेशंट जे आता म्हातारे झाले आहेत ते येत असतात. कौतुकाने सांगतातही की "डाक्टर आठ आणे फी घ्यायचा तवापासून येतूय." याला कारण एकच. हा डॉक्टर आपल्याला नक्की बरं करणार ही श्रद्धा. 

आपल्याकडे येणारा पेशंट लवकरात लवकर बरा कसा होईल याच भावनेने पीआर त्याला तपासतात आणि औषधे देतात. बरं औषधं देताना भरमसाठ दिलीत असंही नाही. जेवढी गरजेची तेवढीच देणार. एमआरने सॅम्पल म्हणून दिलेली औषधे असतील तर एखादया गरीब पेशंटला तीच फुकट देऊन टाकणार. एखाद्या पेशंटकडे पैसे नसतील तर खुशाल पैसे न घेता "पुढच्या वेळी द्या" म्हणत त्याला जाऊ देणार. एखादा आजार दोन दिवसात बरा होणार असेल तर पेशंटला ते तसं स्पष्ट सांगतात. त्यासाठी त्याला उगाच दोन तीन दिवसांनी फॉलोअपला बोलावणे हा प्रकार अजिबात नसतो. बऱ्याचदा पेशंटला दोन दिवसात बरं वाटूनही जातं आणि 'डॉक्टर म्हणाले तेच बरोबर बरं का' अशा भावनेनं तो पुन्हापुन्हा येत राहतो. 

गेली पंचवीस एक वर्ष त्यांचा दवाखाना जुन्नरमधल्या ब्राह्मण बुधवार पेठ आणि सय्यदवाडा यांच्या सीमेवर आहे. सय्यदवाड्याच्या जवळ असल्याने साहजिकच मुसलमान पेशंट भरपूर असतात. मुसलमान स्त्रिया सहसा कुणासमोर आपला बुरखा उघडत नाहीत. पीआरसमोर मात्र त्यांना काहीही प्रॉब्लेम नसतो. कारण आहे डॉक्टरांवर असलेला विश्वास! आपल्या मुलाला/मुलीला डॉक्टर नक्की बरं करणार हा तो विश्वास आहे. 

पीआरची मला आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे त्यांचं शिट्टी वाजवणं आणि गुणगुणणं. पेशंट तपासता तपासता हा माणूस खुशाल शिट्टी वाजवत असतो. बरं ती शिट्टी काही हळू वगैरे नसते. चांगली जोरात असते. आता तर पेशंट लोकांनाही सवय झाली आहे. डॉक्टर गुणगुणत नसतील पेशंटलाही चुकल्यासारखे वाटत असावे. आदित्यमुळे माझे त्यांच्या घरीही येणेजाणे असते. घरी असतानाही पीआर मस्त शीळ घालत असतात. कधीकधी तर आदित्य, त्याची आई आणि मी काहीतरी गंभीर चर्चा करत असतो आणि पीआर मध्येच येऊन शिट्टी वाजवत आतल्या खोलीत जातात.    

डॉक्टर असले तरी पीआर श्रद्धाळू आहेत. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर त्यांच्या पहिल्या गाडीपासून ते आत्ता असलेल्या होंडा सिटीपर्यंत प्रत्येक गाडीवर पुढच्या काचेवर 'श्री' लिहिलेले असते. बाकी काहीच नाही. फक्त 'श्री'.  

पीआर म्हटलं की त्यांचा कंपाउंडर फारूकचा उल्लेख टाळता येत नाही. गेली कित्येक वर्षे फारूक त्यांच्याकडे काम करतोय. अगदी 'वन मॅन आर्मी' सारखं म्हटलं तरी हरकत नाही. डॉक्टरांना भेटायचं म्हणजे आधी फारुकला नमस्कार घालावा लागतो. अगदी आम्ही मित्रही आदित्यच्या घरी जाताना, "क्या फारुक, कैसे हो?" विचारल्याशिवाय वर जात नाही. तसं पाहिलं तर फारुक साधा कंपाउंडर पण पीआरने त्यालासुद्धा इतकी वर्षे जपलंय. आता त्यालाही वयपरत्वे काम जमत नाही. तरीही तो रोज जमेल तेवढा वेळ येऊन जातो. अनेक पेशंटलाही फारूक माहित असतो. त्यामुळे दवाखान्यात आलं की तेही फारुकची चौकशी केल्याशिवाय आत जात नाहीत. फारुकची जागा आता मनिषाने घेतली आहे. तीदेखील आपली जबाबदारी समर्थपणे निभावते आहे. 

डॉक्टर म्हटलं की लोक फोन करूनही सल्ला घेतात. काहीजण फोनवर औषधे विचारून दवाखान्यात येतच नाहीत. अशा महाभागांना बरेचदा फोन स्वतःच घेऊन पीआर "डॉक्टर बाहेर गेलेत" असं सांगून फोन ठेवून देतात. एकदोन वेळेस असं केलं की पेशंटलाही कळून चुकतं. 

लँडलाईनच्या जमान्यात बरेचदा रॉंग नंबरही येत. जुन्नरच्या भूषण हॉटेलचा असाच रॉंग नंबर पीआरकडे येत असे. रॉंग नंबर सांगूनही समोरचा माणूस ऐकत नसेल तर पीआर अनेकदा ऑर्डर घेऊन मोकळे व्हायचे. त्यानंतर तो फोन करणारा आणि भूषण हॉटेल यांच्यात काय संवाद होत असेल देव जाणे. 

स्वतः डॉक्टर असल्याने ते तब्येत सांभाळून असतात. रोजचे फिरणे कधीच चुकत नाही. अलीकडे कधी कंटाळा आलाच तर फिरायला जात नाहीत. आम्ही लहान होतो तेव्हा तर पंचलिंगाकडे पीआर आणि डॉ. निरगुडकर यांचे वेगात चालणे पाहण्यासारखे असे. अर्थात त्याचा फायदा दोघांनाही झाला.   

लोकांना डॉक्टर म्हणून माहित असलेले पीआर एक चांगले वाचकही आहेत. त्यांचं वाचन सतत सुरु असतं. चित्रपट आणि खेळातही ते रस घेतात. कित्येकदा आम्ही एकत्र क्रिकेट आणि टेनिसचे सामने पाहिलेले आहेत.  पाहताना पीआर आमच्यातलेच होऊन बोलत असतात. त्यावेळी मी डॉक्टर आहे किंवा आदित्यचा बाप आहे असा अविर्भाव कुठेही नसतो. देव आनंदचा ज्वेलथीफ त्यांनी पन्नास वेळा सहज पाहिला असेल. 

आता आदित्य त्यांचा वारसा पुढे नेतो आहे. पीआर स्वतः इतके यशस्वी डॉक्टर असताना आदित्यला स्वतःचा जम बसवायला सुरुवातीला अवघड गेले. अखेरीस तोही पीआरचाच मुलगा आहे. त्याचंही निदान त्यांच्या इतकंच अचूक आहे. (माझ्या दादांच्या हार्ट अटॅकचं निदान त्यानेच केलं होतं.) आदित्य जबाबदारपणे गाडा हाकतो आहे त्यामुळे आणि वयपरत्वे पीआरनी आता प्रॅक्टिस थोडी कमी केली आहे. जमेल तेवढी प्रॅक्टिस ते करतात आणि बाकीचा वेळ आपली नात रीवाबरोबर आणि वाचन करत घालवतात. 

काही माणसं अशी असतात की ती नकळतपणे आपल्या आयुष्यवर प्रभाव पाडून जातात. माझ्या मते प्रत्येकाचे फॅमिली डॉक्टर अशाच काही व्यक्तींपैकी एक असतात. त्या त्या पेशंटच्या बऱ्याच बाबी त्यांना माहित असतात. पेशंटही डॉक्टरांकडून वेळच्यावेळी मार्गदर्शन घेत असतात. म्हणूनच कदाचित त्यांना 'फॅमिली डॉक्टर' म्हणत असावेत. माझ्या बाबतीतही तसेच झाले. आज इतक्या वर्षांनी विचार करताना पीआरचा माझ्या आयुष्यातला थोडा का होईना वाटा नाकारता येत नाही. 

तुमच्या फॅमिली डॉक्टरबद्दल तुमचेही काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा.